Followers

Sunday, 2 May 2021

संभाजीराजे

 संभाजीराजे



व्यक्ती आणि कृती या संदर्भातील हे दुसरं व्यक्तिमत्त्व ,  ज्याबद्दल लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न .

संभाजी राजे हा शब्द ऐकला की खरंच काय येतं मनात ? आदराची भावना , बरोबर ना ? त्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला नतमस्तक होतो आपण . त्यांचा जीवनपट डोळयांसमोरून झरकन जातो . त्यांचं आईशिवाय असणार बालपण , जिजाऊंनी त्यांच्यावर केलेली मायेची पाखरण , त्यांना निरनिराळ्या प्रसंगातून मिळालेले राजकारणाचे धडे . शिवाजी महाराजांनी लहानपणापासून त्यांना दिलेले शिक्षण ,  शारीरिक कवायती पासून ते घुड्सवारी पर्यंत . तसेच भाषा , अर्थव्यवहार  राजकारणी डावपेच आणि इतरही   . एक एक प्रसंग डोळ्यांसमोर जेव्हाही येतो , नेहमी असच वाटतं , इतक्या लहान वयात कस केलं असेल त्यांनी ? या वयात तर साधं भाजी आणायलाही आपण मुलांना पाठवत नाही त्या वयात संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगांकडे ओलीस म्हणून पाठवले ? धन्य ते वडील आणि धन्य तो पुत्र . 


  














संभाजीराजांचा पूर्ण जीवनपट हा आत्ताच्या भाषेत बोलायचं तर सुरुवातीपासून शेवट पर्यंत चित्तथरारक आहे . मिर्झा राजे जयसिंगांकडे ओलीस म्हणून राहणं असो की वडिलांबरोबर आग्राहुन सुटका अगदी शिवाजी महाराज गेल्यानंतर अण्णाजी पंत आणि बाकी लोकांनी केलेली बंडाळी मोडून काढणं . कुठलीही गोष्ट सहजासहजी न मिळणे हे जाणवतं . तस पाहिलं तर एका छत्रपती चा मुलगा  . मात्र छत्रपतींचा मुलगा असूनही प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी केलेली प्रामाणिक आणि जीवापाड धडपड .  ती करण्यातच त्यांचं खूप आयुष्य  खर्ची पडलं , मग ते त्यांच्यावर आलेलं 'गोदावरी' नावाचं बालंट असो की अपमानित झाल्यामुळे रागाच्या भरात घेतलेलं दिलेर खानाला जाऊन मिळण्याचा निर्णय  . यातले काही निर्णय हे शिवाजी राजांची रणनीती होती असंही सांगितलं जातं , असो तो ऊहापोह करणं या लेखाच उद्दीष्ट नाही . त्यांचं चरित्र  वाचतांना जाणवते ती प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा .  

असे कितीतरी प्रसंग आहेत की जे वाचतांना त्यांच्या मनाची होणारी तडफड जाणवते . मग ते दिलेर खानाकडून आल्यावर 'राजे तुम्ही चुकलात ' म्हणून शिवाजी राजांनी त्यांच्याकडे पाठ फिरवणं असो की त्यावेळेच्या परिस्थितीत नाईलाजाने  स्वतःच  स्वतःला राजा म्हणून घोषित केल्यावर सोयराबाईंना नजरकैदेत ठेवाव लागण .  ज्या पुतळाबाईंनी त्यांच्यावर अखंड , अविरत अशी माया केली त्या सती जातांना असहाय्य होऊन पाहणं अथवा राजरामांनी 'मलाही तुम्ही कैदेत ठेवणार का ' हे विचारल्यावर वाटणारं  दुःख   . प्रत्येक ठिकाणी जाणवते ती त्यांनी दुसऱ्यांच्या मनाला जपण्याची केलेली धडपड . स्वतःला त्रास झाला तरी तो न दाखवता कसोशीने केलेली अंमलबजावणी , मग ती वयक्तिक कर्तव्याची असो अथवा राजकीय . 



रणांगणात तसेच इतर प्रसंगात निरनिराळे  निर्णय घेतांना , घेतलेला निर्णय अंमलात आणतांना  जाणवलेली धडाडी आणि दृढनिश्चयी वृत्ती.   स्वतःच्या लोकांना प्रेरित करून जंजिऱ्याचा समुद्र बुजवुन सिद्धी पर्यंत पोहोचण्याची असो अथवा अवघे 9 वर्षाचे असतांना  कुणाला न कळत रायगडावर पोहोचण्यासाठी केलेली आग्रा ते रायगड ही  पायपीट .  बटूसारखे  नुसते वेषांतरच नाही तर संध्या , पूजा सगळं आत्मसात करून , त्याचं पालन करणं .  नाटक बेमालूम होणं  आवश्यक नाहीतर   पकडल्या जाण्याची भीती . काय आणि किती प्रसंग आहेत .  लिहावं तेवढं कमी . हे सर्व आठवतांना एक मात्र नेहमी जाणवतं , शिवाजीराजांना लोकांची जी साथ मिळाली ती मिळायला संभाजी राजांना फार कष्ट करावे लागले . शिवाजीराजांना घरची फारशी काळजी कधी करावी लागली नाही . ती बाजू जिजाऊंनी सांभाळली .  या बाबतीत मात्र संभाजींना घरचे कलह , राजकीय आंतरिक  बंडाळी तसेच बाहेरचे औरंगजेबाला सामील होणारे सरदार या सगळ्या बाजू सांभाळायला तारेवरची कसरत करावी लागली .


संभाजी राजांच्या हयातीत जी एकजूट साध्य झाली नाही ती त्यांच्या बलिदानाने साध्य झाली . त्यानंतर कितीतरी वर्ष महाराष्ट्र ने झुंज दिली , एकवेळ तर अशी आली की दिल्ली देखील काबीज केली . बरोबर ना ? पण हे सर्व होण्यासाठी संभाजी राजांना सर्वोच्च बलिदान द्यावे लागले . जर त्यावेळी एकजूट असती ,  छोट्या जहागिरीची इच्छा बाळगून त्यावेळच्या सरदारांनी औरंगजेबाला साथ दिली नसती  तर आज कदाचित महाराष्ट्राचा  इतिहास अजून काही निराळा असता . असो . 


दूरदर्शनवर मागे संभाजी serial झाली . ती फक्त त्यांच्या लढाया आणि रणनीती यावर आधारित नव्हती तर त्यांच्या आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगात त्यांना काय वाटलं असेल हेही त्यात शोधायचा , त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचाही प्रयत्न त्या serial मध्ये  केला गेला  .  त्यांच्या स्वभावाचे निरनिराळे कंगोरे दाखवण्याचाही तो एक प्रयत्न होता .  ती serial बघतांना पुष्कळदा जाणवलं की आपल्या प्रत्येकातही एक संभाजी असतो , ज्याला खूपदा आजूबाजूच्या आपल्याच लोकांबरोबर स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढा द्यावा लागतो . कधी स्वतःच चुकत नसल तरी ते  दुसऱ्याला पटवून देण्यात शक्ती  खर्च करावी लागते . कधी न आवडलेला निर्णय स्वीकारावा लागतो . आवडत नसतांनाही कुणा दुसऱ्याच्या चांगल्यासाठी ते करावं लागतं . कुणी दुय्यम वागणूक देत आहे हे जाणवून अपमानित वाटलं तरी ते नातेसंबंध टिकवण्यासाठी स्वतःला समजवाव लागतं . कधी कुठली व्यक्ती , तिचं वागणं हे चुकीचं आहे हे माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग अवलंबावा लागतो , एक ना अनेक . 


संभाजीराजांच व्यक्तिमत्त्व फार उत्तुंग आहे यात काही वादच नाही . त्याबद्दल वाचतांना , जाणते अजाणतेपणी जाणवलेला हा एक कोपरा  खूप जणांना त्यांच्या अजूनच जवळ घेऊन जातो . काही प्रसंग वाचतांना कधी कधी आपणही कुठेतरी अनुभवलेले , आपल्यावर आलेले छोटे मोठे प्रसंग आठवतात आणि त्यावेळी त्यांच्या मनाची झालेली घालमेल मनाला स्पर्शून जाते .  आपणही कधी स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी केलेली धडपड  त्यावेळी चटकन डोळ्यांसमोर येते आणि ते उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्या फार परिचयाचं आहे असं जाणवतं . तुमचा अनुभव काय सांगतो ? 



#संभाजीराजे# 

32 comments:

  1. Wonderful script. Keep writing dear

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर आणि सटीक, प्रत्येक संभाजी ने जाणून अनुसराव की पिता शिवाजी पण संभाजी प्रमाणे असंख्य अडचणींवर मात करून शिवाजी झालेय...,����

    ReplyDelete
  3. Chatrapati Sambhaji Raje asun hi sadharanansachya vatyala yete ashi upeksha barechda tyanchya vatyala aali ani varvar Raja mhanun kathor vagava lagat asla tari aat komal antakaran hota tyancha.....sanglyansathi prem hota. Uttam ritya sangad ghatli Sambhaji Raje ani awati bhawti aslelya( Sambhaji ) sarkhya lokanchi ani paristhititi chi.nice write up.

    ReplyDelete
  4. Chatrapati Sambhaji Raje asun hi sadharanansachya vatyala yete ashi upeksha barechda tyanchya vatyala aali ani varvar Raja mhanun kathor vagava lagat asla tari aat komal antakaran hota tyancha.....sanglyansathi prem hota. Uttam ritya sangad ghatli Sambhaji Raje ani awati bhawti aslelya( Sambhaji ) sarkhya lokanchi ani paristhititi chi.nice write up.

    ReplyDelete
  5. प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून लेखन केले आहे. छानच लिहिलंय.👌👌

    ReplyDelete
  6. आम्हाला शाळेतून आणि वाडमयातून शहाजीराजे आणि संभाजीराजे जेवढे समोर आले तेवढे संभाजी राजे आले नाहीत. पण अलिकडे जे सामोरं आलं त्यावरून संभाजीराजे अतिशय कर्तृत्ववान, सरसच होते असं वाटतं. समाजाक्रमणाचे टप्पे असतातच. कायम जीत होत नाही. जेव्हा अंतर्गत परिस्थिती विपरीत असते तेव्हा, तग धरून रहाणं हाच विजय असतो. तो संभाजी राजांनी मिळवला. शिवाजी राजांना तोलामोलाचे सहकारी होते. संभाजी राजांनी अनेक कर्तृत्व स्वतःच अंगी बाणली होती..

    ReplyDelete
  7. संभाजी राज्यांचे व्यक्तिचित्र,व्यक्तिमत्व छान माहिती👌👍

    ReplyDelete
  8. छत्रपती संभाजी महाराजांच्या ईतिहासाचा सखोल अभ्यास करूनच एवढे छान अतिशय सुंदर लिखाण केलेत.मैथिली खुप छान बेटा......👌👌👍👍

    ReplyDelete
  9. Gr8 संभाजी राजे ...खूप छान माहिती.. मस्त लिहिले

    ReplyDelete
  10. Gr8 संभाजी राजे ...खूप छान माहिती.. मस्त लिहिले

    ReplyDelete
  11. नितांत सुंदर लेख....मनीचे विचार लेखणीतून छान उतरवले....संभाजी राजे यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही....अगदी अटके पार मराठी साम्राज्याचा झेंडा फडकवला गेला ...जितके तेजस्वी वडील तितकाच तेजस्वी पुत्र ....अशी फार विरळी उदाहरणे आहेत इतिहासात...पण यासम हेच ...संभाजी राजे...जय भवानी 🙏

    ReplyDelete
  12. अनिता श्रौति

    ReplyDelete
  13. संभाजी राजे यांच्या बद्दल लिखाण फक्त आणि फक्त त्यांच्यावरील अभ्यासाशिवाय शक्यच नाही... त्यामुळे या लेखातील त्यांचे वर्णन वाचून त्यांचा इतिहासातील व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच व अज्ञात असलेल्या इतिहासाचा उलगडा होतो.. उत्तम प्रयत्न...

    ReplyDelete
  14. अतिशय सुरेख लिहिले आहे. संभाजी महाराजांच्या जीवनातले पैलू छान उलगडले आहेत.खूप संघर्
    श मय जीवन

    ReplyDelete