गुढीपाडवा
सर्वांना माझ्या कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा . खरतर दरवर्षी गुढीपाडवा येतो , आपण सगळे तो साजराही करतो . हो न , मात्र यावर्षीचा गुढीपाडवा नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणार आहे . जरी तो निराळा नसला तरी आपण भारतीयांचं जग , जगण्याची पद्धत , विचारांची दिशा मात्र आजपासून बदलणार हे निश्चित .
सर्वांना माझ्या कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा . खरतर दरवर्षी गुढीपाडवा येतो , आपण सगळे तो साजराही करतो . हो न , मात्र यावर्षीचा गुढीपाडवा नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणार आहे . जरी तो निराळा नसला तरी आपण भारतीयांचं जग , जगण्याची पद्धत , विचारांची दिशा मात्र आजपासून बदलणार हे निश्चित .
तुम्हाला तसही लक्षात आलंच आहे की मी काय म्हणते आहे ते , बरोबर न . हा वागण्यातला , विचारातला बदल नक्की खरंच कशामुळे आहे . हे जे आपण आत्ता सगळं करतोय ते तर आपले आईबाबा , आजीआजोबा , आपण सर्व करतच होतो , होतो न ? त्यात थोडेफार बदल आपल्या पिढीने केले . सर्वच बदललं असं नाही , कुठे कुठे सोयी पहिल्या गेल्या , कधी गरज तर कधी कुठल्या रूढी ज्या वेळेनुसार relevent राहिल्या नाही असं वाटलं . अर्थात हे सर्व व्हायला भरपूर काळ जावा लागला . आज मात्र एका जादूच्या कांडीने एका झटक्यात खूप काही परत मूळ पदावर आणून ठेवलंय . ही जादू नक्की आहे कशाची ? ही जादू झालीय कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनात असलेल्या भीतीची . कुणी बोलून दाखवतात कुणी नाही . भीती मात्र प्रत्येकाला वाटतेय . कुणाला वाटतंय मला काही झालं तर ? कुणाला वाटतंय माझ्या कुटुंबियांना काही झालं तर ? कुणाला किती दिवस घरात राहायचं , काय करू इतके दिवस ? कुणाला वाटतंय , मला काम तर बंद करता येणार नाही , बाहेर गेलं आणि काही झालं तर ? कुणाला मी बाहेर नाही जाणार , काम नाही करणार तर पैसे कसे मिळतील ? घर कसं चालणार ? कुणाला कशाची तर कुणाला कशाची , व्यक्ती तितक्या प्रकारच्या भीती , काय बरोबर न .
आपण नेहमी म्हणतो " होनी को कौन टाल सकता है " । हे जरी खरं असलं तरी सध्याच्या परिस्थितीत आपण ते काही प्रमाणात टाळू शकतो हेही सर्वांना माहिती आहे . ही जादू तस पाहिलं तर एक दिवसात झाली असंही नाही . हळूहळू 1, 2 महिन्यात या भीतीच्या रोपाच झाड झालंय आणि आता तो वृक्ष होण्याच्या मार्गावर आहे . एक गोष्ट वाचलीय सगळ्यांनी लहानपणी , एका ठिकाणी एक अंबाडीच छोट रोप आलं . ते एक पक्षी त्याच्या चोचीने तोडू लागला . त्याच्या पिल्लाने विचारलं , या झाडाला दाणे नाहीत , फळ नाहीत , याची पानही आपण खात नाही ,यावर आपण घरटंही बांधत नाही , मग हे झाड तोडण्यात तू तुझी शक्ती का खर्च करते ? त्या पक्षाने पिल्लाला सांगितलं , अरे हे रोप आपल्याला काही देत नसलं , त्याचा जरी आत्ता आपल्याला उपयोग अथवा अपाय होत नसला तरी जेव्हा हे झाड मोठं होईल , त्याच्या तंतुपासून फासेपारधी जाळ तयार करेल आणि आपल्याला त्यात पकडेल त्यावेळी ते तंतू इतके मजबूत झाले असतील की आपल्याला चोचीने ते तोडता येणार नाहीत म्हणून आत्ताच हे झाड जर तोडलं तर पुढे येणारा धोका टाळता येईल . आठवली ही गोष्ट ? तसच काहीसं आपलं सगळ्यांच होतंय . सुरुवातीलाच आवश्यक ती काळजी घेणं जरुरी आहे मात्र मनातल्या भीतीमुळे कुठेतरी physically fit असणारी व्यक्तीही मानसिक रित्या स्वतःला दुर्बळ करते आहे . आपण सर्वांनी वाचलंय की आधी माणूस मनाने हरतो . कितीतरी यशस्वी व्यक्तींच्या मुलाखतीत ऐकलंय सर्वांनी की यशस्वी होण्यासाठी , त्या मार्गावर चालण्यासाठी mentally strong असणं किती आवश्यक आहे . ती व्यक्ती खेळाडू असो , व्यावसायिक , actor असो किंवा अगदी social worker सुद्धा . प्रत्येकाचा अनुभव हेच सांगतो . परिस्थिती ही मनुष्याला नमवण्यासाठी प्रयत्न करते , कधी आजूबाजूचे लोकही त्या परिस्थिलाच मदत करतात , कधी कधी आपले सुद्धा . त्यावेळी जी व्यक्ती स्वतःच्या मानसिक प्रबळतेचा आवश्यक तो उपयोग करते तीच त्या परिस्थितीशी मुकाबला करून जिंकते आणि स्वतःला सिद्ध करते .
आजकाल खेळाडूंना साठी mental trainer असतात . Brain trainer किंवा mind trainer हे त्या athlete किंवा ज्या कुठल्या sport साठी तो खेळाडू तयारी करतोय त्याची mental strengh वाढवण्यासाठी training देतात . लहान मुलं जेव्हा मोठ्यांना कधी विचारतात हे मी करू का ? मला जमेल न ? तेव्हा काय सांगतो आपण त्यांना , अरे जमेल तुला . करशील तू आणि कितीतरी निरनिराळ्या व्यक्तींची उदाहरण देतो त्यांना आपण आणि त्यांनी परिस्थितीवर कशी मात केली हे सांगतो , बरोबर न . यामुळे त्यांच्या मनात आलेल्या शंकेच निरसन तर होतच तसच त्यांच्या मनाला ही उभारी मिळते .
आज हवाय तो असाच मनाला उभारी देणारा आत्मविश्वास वाढविणारा आदर्श . प्रत्येकाचे आदर्श वेगळे असू शकतील , ध्येय मात्र एकच आहे . आज नवचैतन्याची गुढी मनामनातही उभारली जाणार . संकट कितीही बिकट असो , आपण सर्व , मनातील सगळी मरगळ झटकून अत्यंत दक्षतेने , निर्धाराने, एकजुटीने या संकटाला परतावून लावु हा संकल्प करू या .
हे नूतन वर्ष आपणा सगळ्याना आनंदाचे , भरभराटीचे , सुख समाधानाचे व आरोग्यदायी आणि मनोकामना पूर्ण करणारे जावो हीच मनीषा .
#gudhipadwa# , #गुढीपाडवा#
