Followers

Sunday, 29 September 2019

खोगीर

खोगीर

परवा घरासमोरून एक माणूस उंट घेऊन चालला होता . एक छोट्या मुलाला उंटावर बसून चक्कर मारायची होती .  त्याला वर बसवण्यासाठी  त्या उंटाला त्या माणसाने खाली बसवलं आणि उंटाच्या पाठीवर त्या मुलाला बसवलं , पण जसा तो उंट उठायला गेला , तो मुलगा बुदूक पडला. आधी रडला मग परत बसला आणि यावेळी त्याने ती दोरी घट्ट धरली जशी त्या उंट आणणाऱ्या माणसाने सांगितलं तशी . खूप हसत आला छान चक्कर मारून . तो माणूस म्हणाला खोगीर थोडं मोठं आहे न म्हणून हा आधी नीट बसू शकला नाही . .....तो उंट आणि माणूस तर गेले पण हा खोगीर शब्द खूप दिवसांनी ऐकल्यावर माझ्या मनात मात्र घर करून राहिला .

खोगीर म्हणजे घोड्याच्या , उंटाच्या किंवा कुठल्या प्राण्यांच्या पाठीवर घालण्याचे जीन....बरोबर  .....हा शब्द आता जास्त वापरल्या जात नाही .......खोगीर हा शब्द ज्यावेळी प्राण्यांवरून प्रवास करायचे तेव्हा जास्त वापरात होता ......जसे जसे माणूस इंजिन वर चालणाऱ्या वाहनांकडे येत गेला तसे तसे खोगीर हा शब्द मागे पडला ......... आजकाल याचा शब्दप्रयोग फार तर खोगीरभरती इतपत केला जातो........खोगिरभरती म्हणजे नुसत भरलेलं सामान  ज्याची फार कमी वेळा गरज  पडणार आहे ....नुसता भरणा जो कधी कधी नकली किंवा रद्दी असतो ...... जशी कधीकधी एखादया खात्यात  लोकांची भरती  केली जाते ,  त्यावेळी फक्त त्या रिकाम्या जागा भरणं एवढंच उद्दिष्ट असतं .......त्या लोकांची कुवत किंवा क्षमता पाहिल्या जात नाही  . त्यामुळे खात्यातली काम करणार कोणीच नसल्यामुळे काम रखडतात , अशावेळी  हा शब्दप्रयोग नेहमी केल्या जातो .......कोणाला कामच येत नाही इथे , सगळी खोगीरभरती दिसतेय ....... बरोबर न .

खोगीर चा इंग्लिश समानार्थी शब्द  saddle  ......या  भाषेत मात्र खोगीर चा अर्थ फ़क्त प्राण्यांच्या पाठीवरच खोगीर , जीन एवढाच होत नाही तर saddle शब्दाचा अर्थ एखाद्याला कशात तरी अडकवणं , कशाने तरी बांधून ठेवणं , गळ्यात लोढणं टाकणं , काही काम गळ्यात घालणं  किंवा दोषी ठरवणं असाही केल्या जातो .


खोगीर चा इंग्लिश मध्ये अजून एक समानार्थी शब्द आहे  pillion ........हा शब्द जर वापरला तर अजून निराळा अर्थ निघतो यातून .........साधं पाहिलं तर दोन चाकी गाडीवर चालकाच्या मागे बसण्याची जागा .........हेच जर कार किंवा अजून कुठल्या दुसऱ्या मोठ्या वाहनात बसलो तर passenger seat म्हणू आपण यालाच .....बरोबर न .....अशा एकाच वाहनात या passenger सीट एकापेक्षा जास्त असतात .......मात्र जरा अजून विचार केला तर लक्षात येत की pillon  किंवा पॅसेंंजर सीट वर बसणारी व्यक्ती ही परावलंबी असते जस चालक वाहन चालवेल तस जावं  लागतं ........सगळे कंट्रोल हे चालकाच्या हातात असतात ........म्हणजे अगदी समोर येणारी दुसरी गाडी किंवा गड्डा जरी दिसत असला तरी ती व्यक्ती ते चालकाला सांगू शकते पण ते टाळण मात्र चालकच करू शकतो ........समोर स्पीड ब्रेकर दिसला तरी गाडी स्लो चालकाने केली तरच हळू धक्का लागतो नाहीतर मस्त उडते pillion वरची व्यक्ती ........क्वचित अपघातही होतात .......ते टाळण्यासाठी गाडी हळू चालवणं , हेल्मेट  घालणं हे उपाय आहेत तरी स्वतः गाडी चालवणं हा त्यावरचा अजून एक उपाय , बरोबर न ......आता साधंच उदाहरण पहा जेव्हा आपण गाडीत कुणाच्या बाजूला किंवा मागे बसतो त्यावेळी आपलं  लक्ष सारखं कोण कुठून येतंय .....काय करायला हवं याकडेच असतं  ....अथवा ब्रेक लाव , हळू कर स्पीड असे सारखे  सल्ले देत राहते बाजूला बसलेली व्यक्ती चालकाला आणि  अस्वस्थ होते.......अशावेळी चालक हा नवरा आणि बाजूला बसलेली बायको असेल तर मग .......त्या वेळी जे मजेदार संवाद होतात ते लिहिले तर रस्ताच बदलेल आत्तापर्यंत लिहिलं त्याचा ....असो..........चालकांवर विश्वास ठेवून शांतही बसतो  आपण किंवा बस , ट्रेन मधून जातांना काहीच करू शकत नाही म्हणूनही शांत बसतो ......कधी कधी चालकांवर आपला तेवढा विश्वास असतो म्हणूनही निर्धास्त असतो .......मात्र ज्यावेळी चालकावर तेवढा विश्वास नसतो , रस्ता नीट नसतो , आपल्याला त्यावरचे गड्डे , स्पीड ब्रेकर दिसत असतात .....धक्के लागत  असतात त्यावेळी आपली  काळजी वाढत जातेच त्याबरोबर अस्वस्थता सुद्धा .......अशावेळी कधीकधी आपण स्वतः चालवायला बसतो गाडी आणि मग समोर येणारे गड्डे , अडथळे , स्पीड ब्रेकर हे छोटे वाटायला लागतात , त्यातून लीलया गाडी चालवत जातो आपण .......त्यावेळी बसणारे धक्के सुध्दा तेवढे जाणवत नाही .  स्पीड पण त्या रस्त्यासाठी perfect आहे असं वाटत आणि आपण हा रस्ता नीट पार करू असा विश्वास  वाटतो .....हो न .......हे केव्हा तर आपण जेव्हा चालक होतो तेव्हा ........याच कारण एकच ..... आपला स्वतः वरचा विश्वास. असच तर होतं न आयुष्यात सुद्धा , जोपर्यंत निर्णय घेणारा दुसरा असतो , आपण त्या व्यक्तीच्या मागे जात राहतो त्यावेळी जास्त काळजी वाटते ....... जस जसे आपण आपल्या आयुष्यं चे चालक होतो .......निर्णय घेतो ......पडलो तरी आपली जबाबदारी समजून दुसऱ्या कुणाला दोष न देता परत उठतो ......तो विश्वासच या रस्त्यावरून न डगमगता जाण्याचं धैर्य देखील देतो. हे धैर्य आणि  स्वतःवरचा  विश्वास मिळवण्यासाठी सुरुवातीला एखाद्या कुशल चालकाच्या  मागे pillion वर बसून चांगला चालक कसं होता येईल याचं प्रशिक्षणही घ्यायला हवं  .

आपण सर्व कुठेही स्वतःची खोगिरभरती होऊ न देता , कुणाचं saddle न होता ,  pillion वर नेहमी बसून न राहता , स्वतः प्रयत्नशील राहून , गरज पडल्यास कधी कुशल चालकाची मदत घेऊन नंतर स्वतः , स्वतःच्या आयुष्याचे चालक होऊन
 हा आयुष्याचा रस्ता निर्भयपणे , धैर्याने विश्वासाने पार पाडू हीच मनीषा ...



#खोगिरभरती

Sunday, 22 September 2019

पूजा

पूजा

श्रावण संपला , महालक्ष्मी , गणपती सगळं आटोपल ......आज शांत बसले असतांना सहज विचार आला मनात ,  पूज्य भावनेने केली जाते ती पूजा , बरोबर ? तरीही .........आपण कुठलीही पूजा का करतो ? गणपती . , सत्यनारायण असो किंवा ऑफिस मधली दिवाळीतली लक्ष्मीपूजा असो ........एक get together  करायचं म्हणून ......  पूजा करायची परंपरा आहे म्हणून ..... सगळेच करतात म्हणून ..... पूजा केल्याने आपल्याला देव प्रसन्न होईल  म्हणून ....... आपल्या आयुष्यातली संकट संपावीत म्हणून .........सगळ्या समस्यांवर उपाय सुचेल , किंवा सापडेल म्हणून......संकट , समस्या येऊच नयेत म्हणून .........की अजून काही .

पूर्वीच्या आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांनी .......मग तो कुठलाही धर्म असो .......ती का सुरु केली असावी ........पूजेला , प्रार्थनेला  वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळी नाव आहेत .....अस असलं तरी
 नीट जर पाहिलं तर सगळ्या पूजा , प्रार्थना या थोड्याफार फरकाने  सारख्या आहेत .

पहिली समानता म्हणजे कुठल्याही धर्मात  पूजा किंवा प्रार्थना करतांना सजावट करतात ......कुठे फुलांची , पानांची तर कुठे दिव्यांची , कुठे मेणबत्ती तर कुठे रंगीत सुंदर तलम झालर असलेल्या कापडाची तर कुठे अजून कशाची .

दुसरी अजून एक समान बाब म्हणजे कुठलीही पूजा करतांना गाणी म्हंटतात . त्या त्या धर्मात त्या त्या धर्माच्या संतांनी  शब्दबद्ध केलेली गाणी . ज्यांना कुणी स्तोत्र मंत्र म्हणत कुणी नमाज , तर कुणी नुसतं प्रार्थना ,  carol तर कुणी अजून काही . शीख , इसाई , मुस्लिम लोकांमध्ये तर  वेळेनुसार प्रार्थनेला नाव सुद्धा वेगळी आहेत .  एक मात्र नक्की की कुठल्याही धर्मात कुठल्याही वेळी प्रार्थना , पूजा करतांना काहीतरी म्हणतच ती करतात .

पूजा कशी करावी हे सांगण्या करता गुरुजी , मौलवी , फादर , भन्ते असे धर्मगुरू असतात . ते सांगतील तशी पूजा केली जाते . हे अजून एक साम्य .

या मागे नक्की असे प्रयोजन काय असावे .

घरी रोज जी पूजा , प्रार्थना केली जाते त्यातही हे सगळं जमेल तसं केलं जातं , फक्त ते आपण एकटे करतो , कधी कामाला जायचं असल्याने वेळ कमी असतो आणि प्रत्येकाची प्रार्थना करायची पद्धत त्या व्यक्तीला असलेल्या वेळेनुसार , वयानुसार , त्या त्या व्यक्तीच्या समजुतीनुसार आणि विश्वासाप्रमाणे बदलत जाते .

लहानपणी आई बाबांनी जे कर म्हंटलं ते केलं जातं.........नंतर हळूहळू ती व्यक्ती  स्वतःला जमेल आणि पटेल तसे त्यात बदल करते ......कोणी घरी 5 , 10 , 15 मिनटं ,  1/2 तास बसून पूजा  , प्रार्थना करेल तर कुणी रोज देवळात चर्च, मस्जिद , गुरुद्वारा त जाईल . कुणी नुसता नमस्कार करेल , तर कुणी दिवा लावेल , कुणी आरती करेल,  कुणी फक्त फुल वाहील तर कुणी अजून काही.......कुणी नमस्कार खूप वेळ करेल तर कुणी पटकन एखादा salute मारल्यासारखा , कुणी साष्टांग नमस्कार  , कुणी शांतपणे त्या वास्तूत डोळे बंद करून ध्यान करत बसेल . याचाच अर्थ पूजा कशी ,कधी, केव्हा , कितीवेळ , कितीवेळा ,  कुठे करायची हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे , तरी हा प्रश्न उरतोच की हे का सुरु झालं असावं .

पूजा मोठ्या प्रमाणात करतांना नातेवाईक , शेजारी लोकांना बोलावलं जात त्यामागे घरातील लहान मोठ्या सर्वांनी एकत्र यावं , आजूबाजूच्या लोकांबरोबर संपर्क वाढवा , मैत्री व्हावी हा हेतू आहे असं जरी मानलं तरी तो तेवढाच होता का ?

पूजा , प्रार्थना करतांना मग ती कुठल्याही धर्माची असो ......त्यात तुम्ही मानता त्या देवाच , गुरूंच , त्या शक्तीच स्मरण करणं हे अपेक्षित असतं .   हिंदु धर्मात देवाला निर्गुण , निराकार संबोधलं गेलं आहे तरी देवांना नाव आहेत निरनिराळी , समोर मूर्ती किंवा नाव असेल तर स्मरण करणं सोपं जातं म्हणून असेल कदाचित . कुणी त्याला ईश म्हणेल , कुणी अल्ला , कुणी वाहे गुरू तर कुणी अजून काही . आपल्याला  कुणाची आठवण ही तर अशीच नाव ऐकल की येते  न .

डोळे बंद करणं हे मन एकाग्र करण्यासाठी असावं . लक्ष विचलित झालं तर स्मरण करणं कठीण जातं . हे सगळं जरी केलं तरी आपले कान , ते ही तर लक्ष विचलित करतात , तसच आजूबाजूला चाललेली चर्चा ......अगदी कुठेतरी दूर रेल्वे ची होणारी announcement सुद्धा ऐकू येते आपल्याला शांत पहाटे.....म्हणूनच कदाचित हा स्तोत्र , गाणी म्हणण्याचा  उपाय तर नसेल त्यावरचा ?


अजून थोडा विचार केला तर असं लक्षात येत की साधं झाडाची फुल गोळा करतांना , दुर्वा तोडतांना दुसरा कुठलाच विचार ती व्यक्ती त्यावेळी करत नसते ......गम्मत म्हणजे एखादे आजोबा किंवा आजी जेव्हा फुल तोडतात तेव्हा ते कधी कधी  एखाद्या दगडावर चढून किंवा भिंतीवरून वाकून त्या फुला पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात स्वतःच वय विसरून . सजावट करतांना , फुल रचून ठेवतांना ,  रांगोळी काढतांना , फुलांचा हार करतांना किंवा अजून कुठल्याही प्रकारची सजावट करतांना एक प्रकारचा सात्विक आनंद मिळतो .

 आपण नेहमी पाहतो पूजा , प्रार्थना खूप प्रकारचे लोक तर करतातच पण खूप प्रकारांनी ही ती केल्या जाते .

एकाच घरात , देवळात किंवा अजून कुठे .........एका पेक्षा जास्त लोकांनी एका वेळी प्रार्थना , पूजा जरी केली तरीही प्रत्येकाला आलेले अनुभव , अगदी सारख्या प्रकारच्या  समस्यांवर सुचलेले उपाय  हे ही वेगवेगळे असतात. ते कसे आणि का ?

प्रार्थना करतांना काही स्तोत्र , गाणी किंवा अजून काही लयीत म्हणतांना किंवा कुणी म्हंटलेलं ऐकतांना , एकट्याने अथवा सामूहिक पूजा करतांना मन एकाग्र होत , शांत वाटतं , त्यावेळेपुरत का होईना पण कुठेतरी आतपर्यंत मनातली खळबळ शांत झाल्यासारखं वाटतं . कधी कधी आधी कधी न सुचलेला विचार मनात येऊन मनाला सुखावून जातो . स्वतःच मन शांत करणं हा तर पूजा , प्रार्थना करण्यामागचा हेतू नसेल ?

तरीही अजून एक विचार मनात येतोय .....


अस म्हणतात , जस जेवण तसे विचार . तसंच आपण आजपर्यंत खूपदा वाचलंय जसे  विचार असतील , जशी संगत असेल  तस आयुष्यात घडतं  ,  विचार चांगले असण्यासाठी चांगलं वाचन ,  संगत ,  आचरण ,  जेवण हे आचरणात आणलं तर चांगली कृती करण्याकडे त्या व्यक्तीचा मानसिक कल असेल   आणि  जर वाईट विचार केले , वाईट संगतीत राहील तर तशी कृती करण्याकडे त्या व्यक्तीच्या मनाचा कल  राहिल . बरोबर ?  तर मग वाईट विचार करणारे , वाईट संगतीत असणारे , वाईट कर्म करणारे , हेही तर पूजा करतात . ते का ?


अस म्हणतात शांत मनाने घेतलेले निर्णय सहसा चुकत नाहीत ,  ते वाईट असोत अथवा चांगले .
ते  कसे असावेत आणि का ? हा अजून एक चर्चेचा विषय आहे , असो .

पूजा, प्रार्थना करण्यामागे  मन सबळ करणं , शांत,  एकाग्र करणं हा विचार जर असेल  कदाचित. मन सहजपणे एकाग्र , शांत होत नाही . त्यासाठी  सजावटी पासून ते खूप जणांनी मिळून एकत्र प्रार्थना करण्याचे  विविध उपाय तर सुरू झाले नसतील ? आज पर्यंतच्या झालेल्या संशोधनात मनाच्या वेगापेक्षा कशाचाही वेग जास्त आढळलेला नाही .........मनाच्या वारूला आवरण्याचा ,  त्याला  नियंत्रणात ठेवण्याचा किंवा काही वेळा त्याला अनिर्बंध करून हवे तसे धावू देण्याचा अथवा शांत करण्याचा , समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी तर पूजा प्रार्थना करणं सुरु झालं नसेल ?

काय वाटतं तुम्हाला ?

Sunday, 15 September 2019

लपंडाव

लपंडाव

लपंडाव हा बालपणी चा खेळलेला पहिला खेळ .......अगदी 3 , 4 महिन्याच्या छोट्या बाळाला कळणारा आणि आनंद देणारा. त्याचा किंवा आपला चेहरा यावर  पदर , ओढणी किंवा रुमाल ठेवला अगदी हात जरी ठेवला की  तो ते बाजूला करणार आणि आपला चेहरा दिसल्यावर ,  त्याच्या चेहऱ्यावर जो निरागस आनंद दिसतो तो केवळ अवर्णनीय .....तसच पडद्याच्या , दाराच्या किंवा भिंतीच्या मागे उभ राहून त्या बाळाकडे पाहून मग परत दारामागे जाणं .....खूप हसत ते बाळ आणि आपण परत कधी तस करतो याची वाट बघत .......अस तर कधी कधी एखाद्या अनोळखी बाळा बरोबर ही करतो आपण कुठे कधी एखाद्या लग्नात , हॉटेल मध्ये , प्रवासात .....वा मजा येते न असा लपंडाव खेळायला .

जसे जसे मग मुलं चालायला शिकतात तस मग आधी घरात नंतर बाहेर अंगणात मग कॉलनीत हा लपंडाव खेळू लागतात ...त्याच्या कक्षा रुंदवतात .......आधी लिंबोणीच्या झाडेमागे खरच चांदोबा लपलाय का हे आईबरोबर शोधायला जाणार बाळ त्याच आईबरोबर लपंडाव खेळून तिला बेजार करू लागत ......कधी लपंडाव खेळतांना तीचा आडोसा म्हणून उपयोग सुद्धा करू लागत जसं कधी मित्रांबरोबर movie ला किंवा  बाहेर जायचं असलं की आईच्या मागे लपून बाबांची परवानगी घ्यायला .

तसं पाहिलं तर लपंडाव हा साधा खेळ . लपलेल किंवा लपवलेलं  शोधण्याचा . तो खरंच कित्ती प्रकारे खेळता येतो . लपाछपी ही घरात , बाहेर तर खेळता येतेच तशी ती वस्तूंची ही करता येते ......मला आठवतं लहानपणी दिवाळीच्या वेळी थोडा फराळ आई नेहमी लपवून ठेवायची..... कुणी पाहुणे एकदम आले तर द्यायला ...... कारण आम्हाला सुट्या असल्याने दिवसभर आमचा फराळ सुरूच असायचा आणि कुणी आलं तर वेळेवर आईची पंचाईत व्हायची . प्रत्येक घरात आई  कुठे कुठे पैसेही लपवून ठेवते . ते कधी कधी कुठेतरी अनपेक्षित जागी आपल्यालाही सापडतात . आता आठवले ते प्रसंग की आईच्या त्या अदृश्य बँकेची कमाल तर वाटतेच तसाच तिचा अभिमानही वाटतो कारण हीच तिची बँक वेळोवेळी जेव्हा कधी पैशांची गरज पडते तेव्हा कामात येते .

लपंडाव हा सुरूच असतो मोठं झालं तरी ...... मित्रांबरोबर तर खेळल्या जातोच हा खेळ . आपण सगळे कुणाबरोबर तरी  एरवी देखील खेळत असतो लपंडाव ....कधी homework झालं नसेल तर शिक्षकांबरोबर , त्यांना आपण दिसणार नाही अशा प्रकारे वर्गात बसायचा  प्रयत्न करतो न ......कधी एखादा एखादा विषय नीट कळत नसेल , आवडत नसेल तर त्या विषयाबरोबर सुदधा लपंडाव खेळतो आपण , ते पुस्तक नजरेआड ठेवून  किंवा वर्गात लक्ष आहे हे भासवून दुसरंच काहीतरी करत राहतो आपण कारण जे शिक्षक शिकवत असतात ते कळत नसतं आणि कधी कधी ते सांगायला लाज वाटते किंवा भीती तर कधी हिम्मत होत नाही  .....हो न. अशा वेळी जर त्या शिक्षकांना आपण सापडलो तर मग काही खैर नसते ..... त्यावेळी वाटत न आपण लपुन जावं किंवा अदृश्य तरी व्हावं आणि सापडूच नये क्लास संपेपर्यंत तरी . असो .

चोर पोलिसांचा लपंडाव नेहमीच सुरू असतो . त्या लपंडावाच्या खेळात चोराला पकडायला बाकी लोक , कधी सापडलेल्या वस्तू , तर कधी चोरी झालेल्या वस्तूही पोलीसांना मदत करतात. त्यात कधी पोलीस लपलेल्या चोराला पकडण्यात यशस्वी होतात कधी नाही . हा खेळ थोडा वेगळा , थोडा सारखा .

लपंडाव बघा कसा खेळल्या जातो , घरातले मोठे लहानांपासून त्यांच्यातले वाद लपवतात . आईबाबा त्यांना असणाऱ्या काळज्या मुलांपासून लपवतात . मुलं कधी कधी घरच्यांपासून त्यांना शाळेत मिळालेली बोलणी , किंवा दिलेली ताकीद लपवतात .......होते तरीही कधी छोटी मिटिंग , आई बाबा आणि शिक्षकांची . काय आहे न  कधीतरी लपवलेलं सापडतच .


मोठे होत गेलो की लपंडाव खेळण्याची पध्दत आणि खेळाडू बदलत जातात .....मनात एक असत , ते लपवून दुसरच काही बोलणं शिकतो आपण ......कधी समोरच्या व्यक्तीला आवडणार नाही म्हणून, कधी वाईट वाटेल , कधी त्या व्यक्तीची काळजी घ्यायची म्हणून तर कधी त्या व्यक्तीची भीती वाटते म्हणून , होतं न अस . हा विचारांचा लपंडाव  असतो  .

जसा आपण दुसऱ्यांबरोबर लपंडाव खेळत असतो तसेच दुसरेही आपल्याबरोबर लपंडाव खेळत असतात .....कधी ते कळत , कधी नाही . आपल्यापासून ही काही गोष्टी , वस्तू दुसरे लपवून ठेवतात , त्याचे विचार लपवतात . ते शोधून त्या व्यक्तीला ओळखणं , परखणं हा सुद्धा एक लपंडावाचा खेळच .....हा पुढे नेहमीच खेळावा लागतो आणि त्यात कौशल्य जर मिळवलं तर पाठीवर धप्पा देऊन दुसऱ्याला आश्चर्यचकित करता येतं .

सगळ्यात जास्त जर कशाचा लपंडाव खेळल्या जात असेल तर तो आहे भावनांचा आणि विचारांचा .......कितीही काळजीत असली व्यक्ती तरी बाहेर तिला ते दाखवणं खूपदा शक्य नसतं .....ज्यांच्या समोर ती काळजी लपवायची गरज नाही असे लोक आजकाल फार कमी वेळा जवळ असतात ......त्यामुळे मग कोणी , कसा आहे विचारलं की मस्त ...असच उत्तर दिल्या जात . कधी कुठल्या , कुणाच्या आनंदाच्या प्रसंगात स्वतःला झालेलं दुःख लपवल्या जातं तर कधी याच्या उलट ही होतं .....कधी आपण लपवतो तर कधी दुसरे . ती व्यक्ती जर जवळचा मित्र अथवा नातेवाईक असेल तर हे जेव्हा कधी त्याला किंवा आपल्याला कळत तेव्हा हक्काने एकमेकांना रागवल्या जातं ..... असे ऋणानुबंध असणं फार भाग्याच .....कधी कुणापासून त्याच आजारपण लपवल्या जात तर कधी अजून काही . काही वेळेला एखाद्या व्यक्तीबद्दल म्हंटल्या जातं की या व्यक्तीच आयुष्य हे "खुली 'किताब" आहे ......अस दुसऱ्यांनी म्हणणं हेच महत्वाचे .

 विचार आणि भावनांचे लपंडाव खेळता खेळता नंतर कधी कधी या खेळाचा कंटाळा यायला लागतो . असं वाटत आता बस्स . आता सगळे बाहेर या . कुणीही लपू नका आणि काहीही  लपवू पण नका . सगळे छान एकत्र बसु , गप्पा मारू , एकमेकांना मनातलं सगळं सांगू . सुख वाटलं की वाढत आणि  दुःख वाटलं की कमी होत जे म्हणतात त्याचा अनुभव घेऊ . ऊन पावसाचा लपंडाव जसा पावसाळ्यात सुरू असतो तसा सुख दुःखाचा आयुष्यात . आपण सर्वच जमेल तेव्हा दुःखाला लपवून सुखाला शोधायचा प्रयत्न करू आणि  दुःखाला पाठीवर धप्पा देऊन आश्चर्यचकित करण्यात यशस्वी होऊ हिच मनीषा .


#लपंडाव

Sunday, 8 September 2019

प्रवास

प्रवास


प्रवास शब्द जरा जड वाटतो न ......म्हणजे पहा ....भटकंती म्हंटल की मजेशीर किंवा उत्साहपूर्ण वाटत पण प्रवास शब्दात एक वजन आहे ......गावाला पोहोचल्यावर किंवा परत आल्यावर जेव्हा कुणी विचारत .....कसा झाला प्रवास .....या एका वाक्यात सगळं येतं म्हणजे अगदी बसायला जागा मिळाली का पासून  ते थेट थकले तर नाही न , काही त्रास तर झाला नाही पासून ते अगदी जेवण नीट झालं न पर्यंत .

आता प्रवास म्हटला की , तो  कधी बस तर कधी आगगाडी तर कधी विमानाने होतो......पूर्वी पायी प्रवास करत तेव्हाचे परत आल्यानंतरचे प्रश्न वेगळे असत  . पायी प्रवास हा कितीतरी दिवस होत असे . त्यात येणाऱ्या अडचणी वेगळ्या असत .....मग झाले प्राण्यावरून प्रवास सुरु ....नंतर जहाज  , बोटी आणि आज विमानापर्यंत मानव येऊन पोहोचला आहे .....आता तर अंतराळात प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे . भारताचे चंद्रायान चंद्रावर पोहोचले. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे .....तोही होईल .  यावर लिहिलं तर लेखाच्या प्रवासाची दिशा बदलेल.

लहानपणी प्रवास म्हंटल की मजा वाटायची . कुठेतरी जायला मिळणार यातच खूप आनंद व्हायचा . आपण कसे जाणार पासून ,  काय तयारी करायची ,  कशी ..... केव्हा पासून तयारीला सुरुवात करायची यात सगळे अगदी मनापासून हिरीरीने भाग घ्यायचे . ते सगळं ठरवताना सुद्धा एक प्रकारची मजा यायची . हळूहळू जसे आपण मोठे होत गेलो तसे मात्र या प्रवासाचे संदर्भ बदलत गेले.....लहानपणी सुट्ट्यांमध्ये मजेसाठी प्रवास करणारे आपण आधी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी प्रवास करू लागलो आणि मग तो प्रवास म्हणजे मजा हे वाटणं हळूहळू कमी व्हायला लागल आणि हाच जर मुंबईच्या लोकल मधला रोजचा प्रवास असेल तर ......तर तो एखाद दिवशी काही कारणामुळे केला नाही तर जास्त बरं वाटत . त्यातही काही जणांना छान मित्र मिळतात या प्रवासात ......अगदी 2 स्टेशन पर्यंत भेटणारे , किंवा एखाद्या स्टेशन वर किंवा कधी एखाद्या वेळेच्या ट्रेन मध्ये भेटणारे.....कधी कधी तर त्यांची फक्त तोंड ओळख असते पण भेटलं की छान वाटत .......काही जण मात्र अशा प्रवासात देखील भजन गाणी गाऊन .....अशा लोकांचा एक छान ग्रुप तयार करून त्यातही आनंदी राहतात आणि तो प्रवास स्वतःबरोबर दुसऱ्यांचाही तेवढाच आनंदी करतात .

प्रवास हा फक्त वाहनानेच होतो का ? प्रवास हा खूपदा मनाने  करून त्यात सुदधा आनंदी होतो माणूस . बघा तुमचं लहानपण आठवा . त्यावेळी atlas वर वेगवेगळ्या जागा शोधण्याचा खेळ खेळतांना कधी कधी समुद्रातून , पहाड , डोंगरातून , दऱ्यांमधून , नद्यांमधून , रस्त्यांवरून आपल्या बोटांनी केलेला प्रवास........आठवला ? किती वेळा असा प्रवास लहानपणी केलाय. कधीकधी तर अगदी या गावातून त्या गावात ......जिथे जिथे आपले कुणी काका , मामा किंवा अजून कुणी आहे म्हणून तर कधी अगदी कुठे काय छान मिळत , कुठे कशाचा कारखाना आहे हे भूगोलात वाचल्यामुळे वाटणारी उत्सुकता तर कधी कुठे असणाऱ्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात जावसं वाटल्यामुळे ते पाहण्याची तीव्र इच्छा ......असा पूर्ण जगाचा प्रवास हा मनाने आणि बोटाने मित्र मैत्रिणी बरोबर कितीतरी वेळा atlas वर लहानपणी केला असेल सगळ्यांनी  ......यातलं वाहन आपलं मन असत , ते बोट आणि मित्र धरून छान प्रवास करून येतं ....काय आठवलं का ?  भूगोल हा विषय फक्त यासाठी च तर जास्त आठवतो .

प्रवास आणि वेग हे दोन शब्द हातात हात घालूनच फिरतात...... मित्रांसारखे . कुठलाही प्रवास असो त्याला वेग हा असतोच , मग तो बैलगाडीतला असो की space shuttle मधला , तरी सगळ्यात जास्त वेग मात्र मनाने केलेल्या प्रवासात असतो .....घरापासून ते चंद्रापर्यंत पोहोचायला एक क्षण पुरेसा असतो .

प्रत्येक प्रवासाला वेग असला तरी तो निरनिराळा असतोच . कुणी पायी येणार असेल तर त्या व्यक्तीला यायला वेळ लागेल हे आपण गृहीत धरतो ....कुणी आगगाडीने , विमानाने किंवा अजून कशाने येणार असेल तर त्या त्या वाहनांनुसार  त्या व्यक्तीला पोहोचायला किती वेळ लागेल हा अंदाज आपण बांधतो . तो अंदाज नेहमी बरोबर येतोच अस मात्र नाही कारण प्रवासात येणाऱ्या आणि माहिती नसणाऱ्या अडचणी , कधी traffic jam तर कधी पाऊस तर कधी अजून काही . हे आराखडे कधी कधी चुकतात.  ते स्वीकारून पुढे जातो माणूस .

थोडा  अजून विचार केला तर जाणवतं , आयुष्य हा सुद्धा तर एक प्रवासच आहे . लहानपणापासून मोठे होईपर्यंतचा प्रवास . कधी निवांत वेळ मिळाल्यावर आठवून बघा . किती दूर आलोय आपण सगळेच . लहानपणी ज्यावेळी हा आयुष्याचा प्रवास सुरु होतो त्यावेळी किती आनंदाने प्रवास सुरु असतो. प्रत्येक नवीन गोष्ट करताना , शिकतांना आनंद मिळतो . हळूहळू या प्रवासात मित्र मिळत जातात . काही दुसरीकडे जातात , काही वेगळ्या वाटेवरून जातात, काहींचा वेग जास्त असल्याने ते पुढे जातात ,काहींचा वेग कमी असल्याने आपण त्यांच्या  पुढे जातो......काही जणांच्या बरोबर जायला आवडत म्हणून वेग वाढवायचा प्रयत्न केला जातो तर काही वेळेला काही जणांसाठी व्यक्ती स्वतःचा वेग कमी करते , बरोबर न . आपल्याबरोबर जे आहेत त्यांच्या बरोबर जाण्यात कधी आनंद मिळतो तर कधी पुढे जाण्याची किंवा वेगळ्या वाटेने जाण्याची इच्छा होते . लहानपणी प्रवास करताना मिळणारा आनंद नंतर मात्र हा आयुष्याचा प्रवास करतांना ........कुणाचा वेग किती आहे ? मग माझा वेग कसा हवा ? किती हवा ?  मी काय केलं तर अजून पुढे जाईन ? कसा जाईन ? कसा पटकन पोहोचेन यावरच मन  विचार जास्त करू लागत आणि प्रवासात पूर्वी लहानपणी मिळणारा आनंद हा नंतर नंतर त्या वेगावर अवलंबून राहू लागतो........ त्यातली मजा कमी होऊन त्यात त्रास जाणवायला लागतो आणि कधी कधी थकवा सुद्धा जाणवतो . अर्थात जो त्यावेळी कधी कधी कळत नाही किंवा पोहोचण्याच्या घाईत .....अस तर होईलच म्हणून त्याकडे खूपदा दुर्लक्ष केल्या जात ....... खूपसे नेहमी बरोबर असणारे लोक मागे पडतात ........त्या वेगाने धावता धावता ज्यावेळी कधी मग बाजूला लक्ष जातं त्यावेळी आपल्या बाजूला अनोळखी लोकं दिसतात ........कधी कोण्या व्यक्तीला ओळखीच्या लोकांसाठी थांबावस वाटतं  तर कधी कुणी एकटच वाटचाल पुढे चालू ठेवत.........त्यावेळी ते आवडत असतं किंवा हवं असतं .......ते त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असत  . आयुष्याचा प्रवास हा सुरू तर राहतो पण त्यातला आनंद मात्र कधी कधी वेगाला बळी जातो . प्रत्येकाचा प्रवास निराळा , प्रवासाचा वेग निराळा .......प्रवासाच्या वाटा निराळ्या ......प्रत्येकाचं शेवटचं ठिकाण ही निराळं .....ते  कधी ,  केव्हा ,  कुठे येईल हे  माहिती नसलं तरी प्रवास हा सुरूच असतो ........चैरेवती चैरेवती  हा संदेश तर सर्वश्रुत  आहे .......माकड ते माणूस हा प्रवास त्याशिवाय साध्य होऊ शकला नसता . थांबला तो संपला .........मात्र कधी कधी नुसता प्रवास करणं हे जास्त समाधान देत . कुठे जायचंय हे ठरलेलं नसताना जेव्हा कधी बाहेर पडते व्यक्ती , त्यावेळी प्रवासात येणाऱ्या सगळया  प्रसंगांना सामोरं जाण , येणाऱ्या अडचणींवर मात करणं हे जास्त सोपं जातं ......याच कारण आपणच स्वतःला देतो .......सगळं ठरवून निघालो नाही न , आता करू adjust. त्यात खरी मजा येते   . सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावेळचे सर्व प्रसंग एक सुंदर आठवण म्हणून आपल्याबरोबर नेहमी राहतात . ते आठवून कधी हसू येत , कधी झालेला त्रास आठवून परत कुठे जातांना काय लक्षात ठेवायचं याची मनातल्या मनात उजळणी करतो तर कधी स्वतःचा सार्थ  अभिमान वाटतो त्यावेळी आलेल्या  सर्व अडचणीतून मार्ग काढल्याबद्दल ,  त्यातून काय काय शिकलो हे देखील आठवतं ........म्हण आहे न , प्रवासाने शहाणपण येतं , खरंय .  प्रत्येकाने हे मात्र लक्षात ठेवायला हवं  की या आयुष्याच्या प्रवासात जिथे कुठे जायचंय ते नक्की माहिती असो वा नसो  , तिथे पोहोचेपर्यंतचा प्रवास , त्या प्रवासात मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत ,  कुणाच्या बरोबर तर कधी गरज पडल्यास एकट्याने  , स्वतःला पेलणाऱ्या वेगाने करण्याचा प्रयत्न केला तर पोहोचल्यावर मिळणारं  समाधान हे जास्त आनंददायी ठरेल . सर्वांचा हा प्रवास आनंदी , सुखकर आणि समाधानी होवो हीच मनीषा.