व्यक्ती आणि कृती
श्रीराम
आज पहिल्यांदाच व्यक्ती आणि कृती या विषयावर लिहायला घेतलंय . जेव्हा व्यक्ती आणि कृती या विषयी लिहावं अस वाटलं तेव्हा असंही वाटलं की जशी नवीन काही सुरुवात करतांना आपण जसा देवाला नमस्कार करतो किंवा काही खायला जरी केलं तरी आधी आपण बाप्पाला नेवेद्य दाखवतो ना तसच आधी एखादा लेख लिहून बघावा म्हणून देवाचं नाव घेतलं . ' श्रीराम ' इतक मोठं व्यक्तिमत्त्व . हे म्हणजे एखाद्या वाफेतल्या पाण्याच्या अणु ने समुद्रबद्दल लिहिण्यासारखं आहे . समुद्र जसा अथांग तसच या व्यक्तिमत्वाचे पैलू अथांग . ते पूर्णतः कळणं हेही कठीण आणि ते हा लेख लिहिण्याचं उद्दिष्टही नाही .
कुणी साधं " श्रीराम " जरी म्हंटल तरी पटकन , ' जय श्रीराम ' किंवा , " जयराम जय जय राम " हे तोंडात येत . देवांची नाव मुलांना ठेवण्याची पद्धत पूर्वी जास्त होती . त्याच कारणही हेच असावं की एकतर दिवसभरात देवाचं नाव आपोआप घेतल्या जाईल आणि दुसरं म्हणजे मुलांबरोबर बोलतांना अपशब्द उच्चारले जाणार नाहीत . देवाचं नाव घेतलं की आपसूकच मेंदूला , जिभेला , मनाला तशा सूचना जातात . बरोबर न .
कुठलीही व्यक्ती आपल्या लक्षात राहण्याचं कारण नक्की काय असतं ? का ती आपल्याला आवडते किंवा आवडत नाही ? खूपदा याच उत्तर लगेच मिळत नाही . आज जेव्हा मी श्रीराम हा शब्द लिहिला तेव्हा पहिले काय काय पटकन आठवलं मला ? चेहऱ्यावरचा शांत भाव . जरी आपण बघतो ती देवांची चित्र "राजा रवी वर्मा " यांनी काढलेली असली तरी ती सगळी चित्र पाहिल्यावर आपल्या मनातला देव अजून निराळा आहे असं कधी वाटलच नाही .
पुढचा त्यांचा गुण आठवतो तो त्यांची पितृभक्ती . वडिलांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी पत्करलेला वनवास . वनवास पत्करतांना वारसाहक्काने मिळालेल्या राज्याचा , ऐश्वर्याचा त्याग करणं ही साधीसुधी गोष्ट नाही . आज आपल्या आजुबाजुला कित्ती लोक आपण बघतो जे थोडया थोडक्या स्वार्थासाठी सुद्धा एखाद काम करायला कधी हो तर कधी नाही म्हणतात . इथे तर संपूर्ण राज्य , ऐश्वर्य , सुखसोयी , पूर्ण परिवार त्याग करण्याचा प्रश्न होता .सामान्य व्यक्ती जो विचारही करू शकत नाही तो विचारच नाही तर जबाबदारीने त्याच आचरण करणं हे मनाला फार भावतं आणि त्यामुळे देवत्वही जाणवतं .
मनाला भावतं ते त्यांचं पत्नीवरच प्रेम . सीतेच अपहरणानंतर झालेल्या पराकोटीच्या दुःखानंतर तिला सोडवण्यासाठी तयार केलेली युद्धनीती . त्यात मग कधी केलेली कुणाबरोबरची मैत्री तर कधी युद्ध तर कधी अजून काही रणनीती . तसा विचार केला तर अपहरण झाल्यावर ते रावणाबरोबर लढण्यासाठी सैन्य आयोध्यहून मागवू शकले असते . हनुमानाची भेट झाल्यावर तर ते फारच सोपं होतं. अशोकवनात निरोप द्यायला न जाता हनुमंत अयोध्येला गेले असते . ते त्यांनाही काहीच कठीण नव्हतं . भरताने ते पाठवलेही असते . तो स्वतःही आला असता . येऊ शकला असता . रामांच्या वनवासाच्या 14 वर्षात भरत त्यांच्या पादुका गादीवर ठेऊन त्याचा सेवक म्हणूनच राज्यकारभार करत होता हे तर श्रीरामांनाही ठाऊक होतं . तरीही हे त्यांनी केलं नाही . का ? असा प्रश्न लहानपणी पडायचा . असो . काही वर्षांपूर्वी एक चर्चा ऐकली होती , की ते सगळे वानर खरंच इतके शूर होते का ? की त्यांनी रावणाच्या सैन्याचा बिमोड करावा ? काही ठराविक अंगद , सुग्रीव सारखे वानर सोडले तर बाकी सर्व साधारण वानर होते मग इतक्या प्रचंड आणि बलवान सैन्याचा सामना त्यांनी कसा केला ? त्याच उत्तर एकच , सामान्य वानरांच्या सेनेच नेतृत्व असामान्य नेता करत होता .
या व्यक्तिमत्वात सगळ्यात प्रकर्षाने जाणवणारा स्वभाव म्हणजे त्याची सत्यासाठी लढण्याची वृत्ती , वचन पाळण्यासाठी केलेली पराकाष्ठा . ते आपल्यासारखे साधारण लोक करू शकत नाही . त्यामुळे त्या व्यक्तिमत्वाची भक्ती करणाऱ्यांमध्ये भक्तीबरोबरच आदरही तेवढाच ओसंडून वाहतो . म्हणूनच त्यांना , "सत्यवचनी राम " " निश्चयाचा महामेरू " , "एकपत्नीव्रता " मर्यादा पुरुषोत्तम अस कितीतरी विशेषणांनी संबोधल्या जातं .
व्यक्ती कृती करत असते आणि कृती व्यक्ती घडवत असते . एखाद्या व्यक्तीच व्यक्तिमत्त्व तेव्हाच उजागर होतं जेव्हा ती काहीतरी वेगळं करत असते . श्रीरामांच्या बाबतीत तस वागणारी , कृती करणारी कुणीही व्यक्ती त्याकाळातही नव्हती ना आज आहे . रामराज्य हे या युगात तर एखाद मृगजळ असावं तसं आहे . असो .
एखाद्या व्यक्तीचा आदर्श ठेवणं , त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालणं हे सर्व अशक्यप्राय आहे हे जाणवतं , त्या व्यक्तिमत्वाला नतमस्तक होऊन देवत्व बहाल केलं जातं . बरोबर ना .
आपण नक्की कशाला नतमस्तक होतो ? व्यक्तीला ? की कृतीला ? अर्थात त्या व्यक्तीच्या कृतीला , त्या कृतीमागच्या विचारप्रक्रियेला आणि कृतीमुळे व्यक्तीला .
काय वाटतं तुम्हाला ?
#रामनवमी# , #व्यक्ती# , #व्यक्तिमत्त्व#
