Followers

Sunday, 8 November 2020

Horn Please

 Horn  




आज संध्याकाळी बागेत  बसले असतांना  विचार मनात सुरू होते . समोरून जाणाऱ्या गाडीने जोरात हॉर्न वाजवला आणि माझी समाधी भंग पावली . विचारांची शृंखला तुटली पण हेही वाटलं ,  बरं झालं हॉर्न वाजला आणि मनातले विचार थांबले कारण मनात सुरू असणारे विचार हे काही फारसा आनंद देणारे नव्हते . असो . 

खूपदा नकळत असे विचार मनात कधी सुरू होतात कळतच नाही आणि ते थांबवायला कधी कधी मनाची तयारी नसते तर कधी त्यामुळे निर्माण  होणारा राग , चीड , दुःख , हतबलता यांना क्षणिक वाट मिळून मोकळं वाटलं अस मनाला वाटत असतं , हो ना ? 


रोज सकाळी घरची काम आटोपून रस्त्याने ऑफिस ला जातांना जशी रस्त्यावर लोकांची असते तशीच  मनात विचारांची गर्दी असते ,  हो ना ? घरी काय करायचं राहिलय ?   ऑफिस मध्ये गेल्यावर पाहिलं काम कुठलं करायचं आहे ?  कुणाला काल काय करायला सांगितलं  होतं ? आज जमलं तर घरी जातांना भाजी न्यायची आहे  एक ना अनेक .  डोक्यात विचार सुरू असतात आणि सवयीने ठरलेल्या रस्त्यावरून आपण जात राहतो . त्यावेळी बाजूने जाणाऱ्या व्यक्तीकडे देखील कधी कधी लक्ष नसतं . ती व्यक्ती नंतर कधी भेटली तर सांगते , मी तुमच्या समोरून गेलो पण लक्षच नव्हतं तुमचं , होतं ना अस ?  दिसत असतं सगळं पण मेंदूपर्यंत कदाचित ते पोहोचत नसतं .  एखादी गाडी बाजूने जोरात हॉर्न वाजवत जाते तर कधी red signal येतो , थांबायला लागतं आणि त्या तंद्रीतून आपण वर्तमानात येतो . होतं ना असं ?😊


असे हॉर्न हे फक्त विचारांसाठी आवश्यक आहेत का ?


कधी  मित्रांच्या whatsapp ग्रुप मध्ये चॅटिंग करतांना किंवा कुठे एकत्र जेवायला बाहेर गेलो असतांना तर कधी कुठे एकत्र गप्पा मारत असताना संभाषण  निराळं वळण घेत आणि नकळत वातावरण तंग होतं . त्यावेळी  कुणाला आलेला खोकला  , लागलेला ठसका किंवा अगदी साधी शिंक किंवा waiter ने आणलेलं पाणी हे सुद्धा तो वाद थांबवण्याचा हॉर्न असू शकतो .  अर्थात हॉर्न चा आवाज येईलच अस मात्र नाही , ती साधी एखादी छोटी हालचालही असू शकते मग ते खुर्ची सरकवत मागे जाणं असो वा अजून काही .  नंतर  वाटतं , अस म्हंटल नसतं तर पुढचा वाद टळला असता किंवा त्यावेळी हसायला नको होतं किंवा अजून काही  . पण तो हॉर्न मात्र नेमक्या वेळेला वाजायला हवा . अशा वेळी असा हॉर्न वाजण्याची सोय असती तर किती बर झालं असतं .  


आपलं शरीर सुद्धा आपल्याला वेळोवेळी हॉर्न देतंच असतं .  डोळे दुखणं ,  डोकं दुखणं . पोट दुखणं हे तर अगदी नॉर्मल आहे . कधी कधी सारखं थकल्यासारखं वाटतं . कधी पाय दुखतात , कधी दात अथवा हिरड्या दुखतात , कधी जिना चढतांना धाप लागते तर कधी अजून काही . आपल्या सर्वांना हे कशामुळे होतं असावं हा अंदाज बहुतेकवेळा येतो . त्यावेळी त्याकडे जर वेळेवर लक्ष दिल्या गेलं तर संभाव्य धोका टाळता येतो . बरोबर ना ? 


समुद्रात जहाज रात्री अंधारात पाण्यात प्रवास करत असतात त्यावेळी दिपस्तंभांवरचा प्रकाश त्यांना जमीन जवळ आहे हे दर्शवत किंवा कुठे खडकाळ भाग आहे , धोका आहे अशी धोक्याची घंटा वाजवून सांगत त्यामुळे अपघात  टाळायला मदत होते  . अशी धोक्याची घंटा कधी कधी आपल्या मनातही वाजते , वाजते ना ? काही करत असताना , कुठला निर्णय घेत असतांना कधी कधी उगीचच मनात एखादी शंकेची घंटा वाजते . ती कधी आपण ऐकतो आणि ते काम करत नाही , कधी ती ऐकू येत नाही तर कधी ऐकू आली तरी ते करणं किंवा तो निर्णय घेणं त्यावेळी जास्त महत्वाच वाटल्याने त्या वाजणाऱ्या घंटेकडे दुर्लक्ष केल्या जात . 


अस म्हणतात  " From fear of the unknown, both horns and wings have grown " 


हे वाक्य खरंच किती अर्थपूर्ण आहे .  


आपण घरात असतांना किंवा आपल्या शहरात  ओळखीच्या रस्त्यांवर वावरतांना खूपदा फारसा विचार न करता फिरत असतो तेच ज्यावेळी अनोळखी गावात , दुसऱ्या देशात किंवा अगदी आपल्याच गावात पण अनोळखी area त गेलो तर आपलं लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे , दुकानांकडे असतं . जास्त सतर्क असतो त्यावेळी आपण . त्यामुळे  हॉर्नस पटकन ऐकू येत असतात आपल्याला . कान टवकारले असतात , डोळे नुसतेच उघडे नसतात तर ते सगळं नीट अवलोकन करत असतात . होतं ना अस ? 


कुठल्याही नवीन क्षेत्रात व्यक्ती ज्यावेळी पहिल्यांदा जाते मग ते कुठलंही असो , भ्रमंती , व्यवसाय , खेळ , अभ्यास त्यावेळी मनात , मला हे जमेल का ? रस्ता सापडेल का ? मी यशस्वी होईन का ? अजून कितीतरी प्रश्न त्या त्या क्षेत्राप्रमाणे मनात येतात . थोडी भीतीही वाटत असते . हीच भीती मनातले हॉर्नस अधिक सतर्क करते तसेच त्या भीतीवर मात करण्यासाठी , उंच भरारी घेण्यासाठी  पंखांमध्ये बळही देते . हो ना ?  


Horn कुठेतरी कुठलेतरी सतत  वाजत असतात .  कधी ते ऐकू येतात ,  कधी नाही .  कधी लक्ष असत ,   कधी नाही . काहीवेळा  लक्ष नसेल तर अपघातही होतात .  कधी लहान तर कधी मोठे .  कधी हॉर्न छोटे असतात तर कधी मोठे कर्कश .  कधी निसटते आवाज तर कधी मंजुळ .  निरनिराळे स्वरही असतात ,  कधी खर्जातले तर कधी एखादी शिट्टी अगदी कुकर ची का असेना . असे हॉर्न जेव्हा वेळोवेळी वाजतात त्यावेळी ते प्रत्येकवेळी आपल्याला ऐकू आले तर ?  तर कितीतरी नकळत अथवा भावनेच्या , आवेशाच्या भरात बोलल्या जाणाऱ्या , केल्या जाणाऱ्या  , सांगितल्या जाणाऱ्या ठरवल्या जाणाऱ्या गोष्टींना , वादांना  थांबवता येईल . चुकीच्या वेळी चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत .  पटकन ब्रेक मारता येईल आणि संभाव्य धोका टाळता येईल . " सूनने की क्षमता तो है सबमे "  काय ? काय वाटतं तुम्हाला ? 


 




Sunday, 4 October 2020

फुलपात्र




फुलपात्र



आज फुलपात्र  शब्द वाचण्यात आला . फार दिवसांनी वाचला . हा शब्द आजकाल फारसा बोलण्यातही येत नाही आणि वाचण्यातही . पूजेच्या वेळी मात्र कधी कधी आपण सगळे फुलपात्र शब्द वापरतो . त्याचं कारण कदाचित तीर्थ किंवा जल हे फुलपात्रात आहे म्हणायला छान वाटतं , हो ना ? एरवी आपण सगळे त्याला ग्लास , पेला , प्याला असच म्हणतो . कधी mug , कप असंही म्हणतो , पण फुलपात्र ?  ते आपण फक्त पूजेच्या वेळीच वापरतो . असो


फुलपात्र हे सहसा चांदी किंवा तांब्याच असतं .  पेला हा मात्र कशाचाही असू शकतो , हो म्हणजे स्टीलचा , पितळेचा , अल्युमिनियम चा , चांदीचा , सोन्याचा. त्याचप्रमाणे  आपल्या मनात ग्लास ची प्रतिमा ही  काचेचीच असते . त्याचे आकार निरनिराळे असू शकतात पण तो असतो मात्र काचेचाच . 


प्याला शब्दात , तो  छोटा , कमी उंचीचा असणार , जुन्या वेळचा वापरात असणारा असं प्रतीत होतं . तसच त्या शब्दातुन अजून दुसराही एक अर्थ निघतो आणि त्याच बरोबर आठवतं ते.     ' राम गणेश गडकरी ' यांचं ' एकच प्याला ' हे नाटक '.  तोही शब्द फारसा कुणी रोजच्या व्यवहारात बोलत नाही .  बरोबर ? 


चषक म्हटलं की तो  कधी काचेचा असेल तर कधी सोन्याचांदीचा तर कधी दुसऱ्या कुठल्या धातूचा . तो नाजूक असणार  , उंच असणारं तसंच त्यावर नाजूक नक्षीकाम असणार हेही लगेच मनात येत  . संस्कृत बोलतांना किंवा लिहितांना मात्र ' चषके औषधं अथवा जलं अस्ति । '   इतर वेळी चषक म्हंटल की अरेबियन नाईट्स च्या गोष्टी आठवतात . ती उंच लांब कलाकुसर केलेली रत्नजडित सुरई सुद्धा आठवते . त्याचप्रमाणे आठवतो कुठल्यातरी स्पर्धेत जिंकलेला चषक , काय ? 


Cup किंवा Mug  म्हंटल की तो सिरॅमिक चा असणार हे मनात उमटतं . आजकाल प्लास्टिक आणि कागदाचे ही कप असतात . ' World Cup '  देखील आठवतो काहीवेळेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉफी किंवा चहाची लगेच आठवण येते .   एक वाक्य नेहमी ऐकिवात येतं , ' This is my cup of tea '  किंवा  This is not my cup of tea '  एखादी आवडणारी , जमणारी अथवा न आवडणारी ,  न जमणारी कुठलीही गोष्ट दर्शवतांना हा शब्दप्रयोग नेहमी केल्या जातो . हा झाला इंग्रज इथे आल्यानंतरचा इ . स . 1800 नंतरचा वाक्यप्रयोग . इ.स. 1800 च्या आधी चहा ,  cup , glass , mug हे शब्द नसले तरी पेला होताच की आपल्याकडे . त्यामुळे  ' पेल्यातलं वादळ ' हा शब्दप्रयोग खूप आधीपासून साहित्यात दिसतो . पेल्यातलं वादळ पेल्यातच शमणार असलं तरी त्याचा बागुलबुवाही तयार करता येतो ,  असो  .  


आशावादी आणि निराशावादी कोण आहेत हे ठरवण्याचा छोटा प्रयोग आपण सर्व जाणतोच . खरचं पेला अर्धा भरलेला आहे किंवा अर्धा रिकामा आहे , इतक्याच उत्तराने हे ठरवता येतं ?  


' मंगेश पाडगावकर '  म्हणतात


पेला अर्धा सरला आहे

असं सुद्धा म्हणता येत;

पेला अर्धा भरला आहे

असं सुद्धा म्हणता येत!


सरला आहे म्हणायचं

कि भरला आहे म्हणायचं?

तुम्हीच ठरवा!


आता पेला म्हंटला की त्यात काहीतरी असणारच . पेला रिकामा कधीच नसतो . त्यात कधी पाणी असेल , तर कधी सरबत तर कधी अजून काही . काही द्रव नसेल तरी हवा तरी असतेच असते . 


पेला कशाचा आहे म्हणजे , काचेचा , कुठल्या धातूचा , कागदाचा किंवा अजून कशाचा हे जेवढं महत्त्वाच तेवढंच पेल्यात काय आहे , पेला कुणाच्या हातात आहे  हे ही महत्वाच . त्यात चमचा आहे की straw . चमचा नुसताच ठेवलाय की खाली  तळाला काही उरलं आहे जे चमचा  फिरवून द्रवात मिसळायच आहे , ते एकजीव होणार  आहे की नाही हेही महत्त्वाच .  यावरून पारशी समाजाची आणि  दुधात साखर एकजीव करण्याची गोष्ट आठवली . जसा चमचा का ठेवलाय हे महत्वाचं तसच straw देखील . ती Straw फक्त छान दिसण्यासाठी ठेवलीय की त्याने आतला द्रव प्यायचा आहे ? ती सजवलेली आहे , छत्री , लिंबू , मोसंबी , संत्र , पुदिना  किंवा कुठल्या फळांनी की साधी आहे ?  पेल्यातल्या द्रवात  गोडवा आहे ? आंबटगोड आहे ? खारट आहे ? की तुरट ? गरम आहे की थंड ? फेसळलेलं पेय आहे ?  की ज्याचा फेस जास्त आणि पेय कमी अस आहे ? फेस आपोआप कमी होणार आहे ? की फुंकर घालावी लागणार आहे ? बुडबुडे हळूहळू फुंकर घालत ते फोडायची मजा घ्यायची इच्छा आहे ? की तसच पाहायला आवडतंय ? पेल्यातला द्रव हे  नारळाचं पाणी , साधं पाणी आहे ?  तृष्णा घालवणार आहे ?  की पोट भरणार आहे ? की मनाला मदमस्त करणार आहे ? अबब कित्ती हे प्रश्न ?  


पेला अर्धा भरायचा की पूर्ण भरायचा ? उतू जाऊ द्यायचा की एकही थेंब सांडू न देता प्यायचा ? की भरलेला पेला दुसऱ्याला देऊन रिकामा करून परत भरायचा ? त्यातला आतला द्रव प्यायचा ? की हातातल्या  straw ने फूररर करून वर आलेले बुडबुडे उडवत थोडी मजा अनुभवायची  की  चमच्याने  घोळून सगळं एकजीव करायचं  की त्यात  छोटंसं वादळ निर्माण करायचं  ?  तृष्णा भागवायची ? की काय करायचं ?  




पेला कशाने भरायचा ?  किती भरायचा ? ओतप्रोत भरून सांडू द्यायचा की काय करायचं ?  हे तर सगळं  आपल्याच हातात आहे म्हणजे  आपल्या मनात ही शक्ती आहे .   पेला जर अर्धा भरलेला असेल किंवा अर्धा रिकामा  झाला असेल तरीही तो परत आपल्याला पूर्ण भरता येऊ शकतो हेच आपण सगळे विसरतो . हो ना ?

आयुष्याच्या फुल्ल पात्रात जे काही आपल्या वाट्याला आलंय त्यात सकारात्मक विचार चमच्याने घोळून तो प्याला की mug तक्रारींची कपात होऊन तो पेला मनाला समाधान तर देईलच तसच त्यातला गोडवा प्रयत्नांच्या    straw ने शोषून घेतांना चषक जिंकल्याचा आनंदही देईल ,

 काय वाटतयं ?








#फुलपात्र  , #मंगेशपाडगावकर , #CupOfTea  , #एकचप्याला  #रामगणेशगडकरी

 





Saturday, 19 September 2020

कॅलिडोस्कोप

 कॅलिडोस्कोप


कॅलिडोस्कोप म्हंटला की लहानपण आठवतं  , छोटे छोटे ,  रंगीत  रंगीत काचांचे तुकडे असलेली एक बासरीसारखी लांब नळी  .  या बासरीमध्ये जेव्हा आपण एका बाजूने बघतो तेव्हा आत दुसऱ्या बाजूला खूप सुंदर आकार दिसतात  आणि ती  हळूहळू फिरवली की आकर्षक सुंदर सुंदर बदलत्या रंगीत आकृत्या दिसत जातात .  सुरुवातीला भावतात त्यातले रंग , आकर्षक रंगसंगती ,  त्यातलं सौन्दर्य , प्रमाणबद्धता  symmetry .  कुणी हातही न लावता हे असे कसे आपोआप सुंदर आकार , रांगोळ्या तयार होतात ? याचं अप्रुपही वाटतं आणि कुतुहलही निर्माण होतं , त्यात आरसे असतात हे जरा नंतरच कळतं .  मग ते स्वतःला तयार करून पहायची इच्छा होते . आरसे हे विशिष्ट कोनात ठेवायचे असतात हेही कुणी सांगितल्याने किंवा वाचल्याने  कळतं . काचेचे रंगीत तुकडे शोधणं , किंवा घरी असलेल्या रंगीत बांगडया , " आता तू या वापरत नाही न अस विचारून " किंवा कधी कधी स्वतःच ठरवून त्यांना या प्रयोगाचा भाग केलं जातं . या सगळ्या प्रक्रियेत खूप मजा येते . आरसा म्हणून वापरण्यासाठी शोधून आणलेले काचांचे तुकडे जरा जपुनच वापरावे लागतात नाहीतर त्यामुळे जर दुखापत झाली तर प्रयोग बंद करण्याची वेळ येते आणि मेहनतीने जमवलेल्या या संपत्तीचा त्यागही करावा लागतो . यावरही उपाय असतोच म्हणा , आहे तो कॅलिडोस्कोप उघडून परत तसाच करून पाहण्याचे उपद्व्याप . ही मात्र एक  फार मोठी जोखीम असते . " हातचं सोडून पळत्याच्या मागे " अशी गत होण्याचीही भीती असते , असो . 


कॅलिडोस्कोप या शब्दासाठी मराठी पुष्कळ समानार्थी शब्द वापरले जाऊ शकतात जस , शोभादर्शक , चीत्ररूपदर्शक , बहुरूपदर्शक , बहुमूर्तीदर्शक . या शब्दांमध्येही अर्थ फार छान प्रतीत होतो . ते खेळणं म्हणजे नक्की  काय हे लगेच कळतं . कालौघात कुठेतरी हे शब्द हरवले म्हणा किंवा विस्मृतित गेले म्हणा , आपण सर्व याला कॅलिडोस्कोप म्हणूनच जास्त पटकन ओळखतो , म्हणूनच की काय या शब्दाचा उपयोग इंग्रजीत जास्त दिसतो . 


कॅलिडोस्कोप शब्द अलंकार , उपमा म्हणून जेव्हा कधी ,  कुठे वापरल्या जातो त्या त्या वेळी तो विभिन्न प्रकारच्या अनेक गोष्टींचा बांधेसूद समूह आणि त्यांचं निरंतर बदलणार स्वरूप याचं प्रतीक असा प्रतीत होतो .  त्या गोष्टी कुठल्याही असू शकतात . बरोबर  ?


कधी विचार करतांना किंवा जुने फोटो पाहतांना अथवा कुणाबरोबर बोलतांना जुन्या आठवणींचे प्रसंग अगदी झरझर एकामागून एक डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखे  दिसतात , ते पाहतांना ,त्यावर बोलतांना होणारी  भावनांची  चेहऱ्यावर उमटलेली , मनाला जाणवणारी सरमिसळ आपण सर्वांनी कितीतरी वेळा अनुभवली आहे , हो ना ? अशावेळी  ' kaleidoscope of   emotions ' हा शब्द फार समर्पक वाटतो  . 


जगात कुठेही तुम्ही रहात असाल तरी आजूबाजूला समाजात दिसणारी वैविध्यपूर्ण राहणी , भाषा , कुठलाही सण साजरा करण्याच्या निरनिराळ्या पद्धती पाहतांना  ' kaleidoscope of cultures , language असे शब्द आपण नेहमीच ऐकतो किंवा बोलतोही . 


अशी अजून कित्ती उदाहरण देता येतील ,  kaleidoscope of  colours , kaleidoscopic origami , wonderful kaleidoscope of orchestral sound , kaleidoscope of  pattern , kaleidoscopic effect  हे आणि असे कितीतरी. 


तस पाहिलं तर कॅलिडोस्कोप म्हणजे प्रकाश , रंगीत काचांचे तुकडे ,  ठराविक कोनात ठेवलेले आरसे आणि त्यावरून परावर्तित होणारा प्रकाश यांचा खेळ . त्यामुळे तयार होणार आणि थोडं हलवल्यावर बदलत जाणारं रंगीत काचेच्या तुकड्यांच प्रतिबिंब . बरोबर ?  प्रतिबिंब हे प्रत्येक  गोष्टीच पडत . म्हणजे पहा हं , पाण्यात आपलं प्रतिबिंब पडतं , आजूबाजूच्या झाडांचं पडतं , आकाशच पडतं ,वरून उडणाऱ्या पक्षांचं पडतं तसच आपण असंही म्हणतो की  त्या त्या भाषांमध्ये , त्या त्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या  पुस्तकात   ' त्यावेळच्या समाजाच प्रतिबिंब ' जाणवतं   फक्त त्यासाठी प्रकाश , आरसा , कोन हे निराळे असतात .  


जसं समाजाचं प्रतिबिंब पुस्तक , लोकगीतं , सिनेमा , गाणी अजून इतर गोष्टींमध्ये दिसतं तसच प्रत्येक व्यक्तीच प्रतिबिंब हे त्या व्यक्तीला ओळखणाऱ्या व्यक्तीच्या मनातही पडतं . बरोबर ना ?  व्यक्ती एकच ,  ती कधी बाबा/ आई असते तर कधी ती व्यक्ती कुणाचा तरी मुलगा/मुलगीही असते . कुणाची  मित्र / मैत्रीण असते तर कधी कुणाची गुरुही असते .  प्रत्येक व्यक्ती समाजात निरनिराळ्या व्यक्तींबरोबर निरनिराळ्या स्वरूपात संपर्कात येत असते .  मुलगा/ मुलगी म्हणून ती आईबाबांना वेगळी दिसते तर मित्रांसाठी ती अजून निराळी असते . ऑफिस मध्ये सहकाऱ्यांना निराळी दिसते तर त्याच्या employer ला ती वेगळीच भासते . मुलांना निराळी दिसते तर नवरा/ बायको ला निराळी . व्यक्ती असते तर तीच मात्र तिचं प्रत्येकाच्या मनातलं प्रतिबिंब मात्र निराळं असतं . त्या प्रतिबिंबात काही रंग , आकार सारखे असतातही मात्र काही  त्या त्या व्यक्तींनाच दिसतात . 



 कॅलिडोस्कोप मध्ये आरशावर ठराविक  कोनातून  परावर्तित झालेल्या प्रकाशाने पडलेली प्रतिबिंब जशी थोडं थोडं फिरवत गेल्यावर  बदलत जातात तसच एकाच व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीच्या मनात असणार प्रतिबिंब हे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या (दृष्टी) कोनाप्रमाणे , त्यांच्या नातेसंबंधांचा प्रकाश परावर्तित होऊन बदलत जात . प्रत्येक व्यक्ती  एक कॅलिडोस्कोपच  , हो ना ?









#कॅलिडोस्कोप  , #प्रतिबिंब  , #Kaleidoscope  , #Reflection  , #MirrorImage

Sunday, 6 September 2020

शिक्षण

 शिक्षण

भारतात आपण सगळे डॉ . राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा  शिक्षकदिवस म्हणून साजरा करतो . जगात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिवशी शिक्षकदिवस  साजरा केल्या जातो . काही देश '  युनेस्को ने घोषित केलेल्या 'World Teachers Day' म्हणजेच  5 ऑक्टोबर ला साजरा करतात .

 ज्यांनी आपल्याला शाळेत , कॉलेज मध्ये शिकवलं आहे किंवा जे आपल्या ओळखीचे लोक शाळेत कॉलेज किंवा अजून कुठे शिक्षक म्हणून शिकवतात त्यांच आपण त्यादिवशी अभिनंदन करतो . त्यांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देतो , काय बरोबर ना ?

शिक्षक कोण ? तर शिक्षण देणारा शिक्षक . ही झाली साधी सोपी सरळ व्याख्या .   कित्ती वेळा जाणवतं आपल्याला , अरे हे शिकायला हवं  , ते राहीलच शिकायचं . जगात इतकी ज्ञानसंपदा आहे  की एखाद्याने आयुष्यभर  ज्ञान संपादन करत राहायचं ठरवलं तरी आयुष्य कमी पडेल  .


शिकणे ही एक मानसशास्त्रीय क्रिया आहे तर शिक्षण या संकल्पनेची व्याप्ती खुप मोठी आहे .  शिक्षण हे शाळेबरोबर संपत नाही , तर ते  शाळेबाहेरही  जन्मभर सुरूच असत .


 संपूर्ण  आयुष्यात  मनुष्य खूप निरनिराळ्या प्रकारच शिक्षण घेतो . बरोबर ना ? तस जर पाहिलं तर शिक्षण हे जन्म झाल्यापासूनच सुरू होत . सुरुवात होते ती मोकळ्या हवेत श्वास घेण्यापासून . मग हळूहळू भूक लागल्यावर रडल की कोणीतरी जेवायला देत , जवळ घेत हे कळत . हे शिकण्यासाठी कुठल्या शाळेत जावं लागतं नाही . हळूहळू ते बाळ शिकत जातं . इतकचं कशाला छोटं कुत्र्याचं , मांजरीच पिल्लू सुदधा घरी आणलं  की ते ही छोट्या छोट्या गोष्टी शिकतं  . कोण जेवायला देतं , कधी देत , कोण लाडवत , कोण खेळत , कोण फिरायला नेत . हो ना ?  अर्थात त्या मुलांना किंवा छोट्या पाळीव प्राण्यांना काही सवयी लावण्यासाठी शिकवावं लागतं . ते ही एक प्रकारचं  शिक्षणच आहे . हे शिक्षण घरात आई , बाबा , आजी , आजोबा इतकंच काय कधी कधी मोठा भाऊ बहीण सुदधा देतात .


मुलं थोडी मोठी झाली की शाळेत त्यांना शिक्षक तर शिकवतातच पण बऱ्याच गोष्टी ते मित्रांकडून ही शिकतात . हो ना ? . कधी त्या चांगल्या सवयी असतात तर कधी वाईटही .  भाषा असो , गणित असो की विज्ञानाचा किचकट न समजलेला पाठ ......हे सुदधा शाळेत एकमेकांना शिकवल्या जातं . हेही शिक्षणच आहे आणि ते शिकवणारा शिक्षक हा कधी  मित्र असतो तर कधी आईबाबा , दादा , ताई तर कधी घरचें किंवा शेजारी राहणारे काका काकू तर कधी आजोबा आजी देखील  असतात  , बरोबर ना ?


 शाळा कॉलेज संपल्यावर नौकरी करतांना  काही बाबी शिकत जातो आपण आपल्या सहकाऱ्यांकडून ,  कधी boss कडून तर कधी अगदी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून सुद्धा . ज्या गोष्टी पटतात , मनाला भावतात , आवडतात त्या आपसूक शिकल्या जातात मात्र काही गोष्टी आपल्याला आपलं काम सुकर करायला शिकाव्या लागतात तर कधी त्या आपल्याला नौकरीत ,  व्यवसायात आवश्यक असणाऱ्या असतात .  त्या प्रयत्न करून शिकाव्या लागतात  , बरोबर ना ?

विचार करता करता कित्ती लोक आठवतील आपल्या सर्वांना ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलो आहे  , मग ती लहानपणी शिकलेली कागदाची नाव असो की  ऑफिस मध्ये computer वर लिहितांना उपयोगी असणारी एखादी trick .

आपण फक्त लोकांकडूनच शिकतो का ? प्राण्यांकडून सुद्धा खूप काही  शिकण्यासारखं असत . त्यांच्या कडून  सगळयात महत्वाचं शिकण्यासारखं असत ते म्हणजे गरजेपुरते खाणं . कुठलाही प्राणी हा भूक नसतांना खात नाहीं . काय , बरोबर ना ?

वृक्ष असोत किंवा छोटी झाडं , त्यांच्या आयुष्यभर ती फक्त दानच करत असतात . कुणी सावली देतील तर कुणी दुसऱ्या प्राणांना अन्न तर कुणी सुगंधी फुल तर कुणी काही . जे  आहे ते आनंदाने भरभरून देऊ करणं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे .

पाणी मार्गात कितीही अडथळे आले तरी मार्ग काढून पुढे जात राहतं , हे पाण्याकडून शिकण्यासारखं आहे . इतका विशाल समुद्र , त्याची सर्वकाही सामावून घेण्याची वृत्ती  शिकण्यासारखी आहे  . डोंगरांची ऊन,  पाऊस , थंडी  अश्या आलेल्या सर्व परिस्थितीत  निश्चल उभं राहण्याची वृत्ती  शिकण्यासारखी आहे .  निसर्ग आणि निसर्गातल्या  छोट्या मोठ्या प्रत्येकाकडे मग ती जैविक असो अथवा अजैविक ,  काही न काही शिकण्यासारखं नक्की आहे जे त्याच्याकडून आपण शिकायला हवं . हो ना ?


आयुष्याच्या प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण .  शिक्षित  व्यक्तीला सुसंस्कारांची जोड देऊन सुशिक्षित बनवते  ते  शिक्षण .  शरीराला श्रमाकडे , बुद्धीला सत्याकडे आणि  भावनेला माणुसकीकडे वळविणे म्हणजे शिक्षण . शिक्षण हा एक आयुष्यभर सुरू असणारा प्रवास आहे .  काय वाटतं तुम्हाला ?




#शिक्षकदिवस , #WorldTeachersDay ,  #शिक्षकदिन ,


Sunday, 30 August 2020

वर्तुळ

वर्तुळ


आज बागेत काम करतांना थकून  एका पायरीवर बसले असतांना चाळा म्हणून सहज हातातली काडी मातीत फिरवत होते . थोड्यावेळाने लक्षात आलं , अरे मी तर  गोल , त्रिकोण , चौकोन , षटकोन असे सगळे भूमितीतले आकार काढते आहे . शाळेत असतांना  compass , स्केल , divider वापरून भूमितीत सगळ्या diagram काढणं हा माझा खूप आवडीचा अभ्यास .  एक वर्तुळ  ,  त्यात त्रिकोण तर कधी चौकोन , आयताकार , benzene रिंग , tangent , secant , वेगवेगळ्या अंशाचे कोन  , perpendicular , वा खूप दिवसांनी त्या सगळ्या ची आठवण झाली . 

भूमितीतच नाही तर चित्रकला शिकतांनाही सुरुवातीला  गोल , चौकोन , त्रिकोण हेच मूळ आकार काढून रंग भरायला आपण सर्व शिकतो . बरोबर ना ? प्रत्येक आकाराचा संबंध हळूहळू दिसणाऱ्या आजूबाजूच्या वस्तूंबरोबर जोडला जातो . 

त्रिकोण म्हंटल की दिसतो डोळ्यांपुढे डोंगर , एखादी मस्त पावसाळ्यात हिरवीगार झालेली टेकडी , पेपरचे तयार केलेले बाण जे दोन हातात धरून बरोब्बर नेम धरून वर्गात दूर बसलेल्या मित्रांवर झुउउऊ करून फेकायचे असतात ते . आठवले ? तर कधी आठवतात छान ग्रिल केलेले चीज sandwich , कधी बरमुडा ट्रँगल ही आठवतो . बरमुडा ट्रँगल बरोबर जोडल्या गेलेल्या गूढ आणि रम्य कथा हेही या आकर्षणाच मूळ असतं . प्रत्येक आकार हा निरनिराळी आठवण देऊन जातो . बरोबर ना ?  

चौकोन  म्हंटला की आठवतात शंकरपाळे ,  शाळेतला फळा . त्यावर  काढलेली चित्रही . शाळेतले डेस्क , त्यावर खडूने , पेनने काढलेली चित्र , नांव , हो ना ? त्यात खाली लपवून  वर्ग सुरू असतांना खाल्लेली चोकोनी डब्यातली भाजी पोळी .  चित्रकलेच्या वर्गात पहिल्यांदा काढलेलं घर देखील तर चौकोनीच काढतो आपण , त्यावर मग एक त्रिकोणी टोपीही घालतो कौलारू घर दाखवायला . त्या घराचं दार चौकोनीच असतं , असतं ना ? 

गोल शब्द म्हटला की आठवतो लहानपणीचा ' गोल गोल राणी ' हा खेळ . पृथ्वी गोल , चंद्र , सूर्य गोल देवांच्या डोक्यामागचं वलय गोल , 
ट्राफिक सिग्नल चे light गोल , कंचे , मणी , मोती गोल . इतकंच कशाला कुठल्या होंर्डिंग वर VIP लोकांच्या फोटोना गोल वलय असतं . पूर्वी दूरदर्शनवर संध्याकाळी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी दिसणारा , अंतराळात विलीन होत जाणारा तो गोल , ते संगीत आजही आठवतं .  कुठलीही लिपी लिहितांना गोल आकारचा खूप उपयोग केल्या जातो , कुठे अर्ध गोल , कुठे पूर्ण तर कुठे लंबोळका गोल.  

भूमितीत खरतर अजून भरपूर आकार  आपण शिकतो , काढतो , तरी खरी सुरुवात होते ती त्रिकोणापासून . कोन कुठलाही असो ,  त्रिकोण अथवा चौकोन असो , त्याला टोक हे असतंच  . टोक हे टोकदार असतं , हो ना ?  दृष्टिकोण देखील टोकाचा असेल तर टोचतोच. कोन आला की टोचलाच म्हणून समजा . यात एकप्रकारची बंदिस्त भावना जाणवते . त्रिकोण असो अथवा चौकोन , तो आखीव रेखीव असतो .  बंदिस्त असतो . त्याच्या बाहेर जाता येत नाही . जस एक छान नौकरी , घर , संसार , आपले छंद , मित्र  या काटकोन त्रिकोणात म्हणा अथवा चौकटीत आपण सगळे जगत असतो तस . चौकट म्हंटल की चार दिशा स्पष्ट असतात . काही वेळा या  4  न राहता त्या वाढत जातात , दशभुज म्हणा ना?  

चौकोनाच्या दाही दिशा सांगता येतात , पाहता येतात मात्र या चौकोनाच्या बाहेरही एक वर्तुळ आहे हे फार कमी लोकांना लक्षात येतं . 

भगवान बुद्ध हे एका वैभवशाली राजा शुद्धोधनाचे पुत्र होते . समृद्ध राज्य , बायको , मुलगा सगळं काही होतं . पुढे चक्रवर्ती राजेही  झाले  असते . एका वैभवशाली  चौकटीत राहत होते . ते ती वैभवशाली चौकट मोडून बाहेर न पडते  तर आज चक्रवर्ती राजा सिद्धार्थ म्हणून किती लोकांच्या आणि किती वर्षे लक्षात राहिले असते ? 

शहाजी राजे , जिजामाता यांची  त्यावेळी एक सरदार म्हणून समृद्ध चौकट होती . पुढच्या पिढया  बसून खाऊ शकतील इतकी संपत्ती होती . ती समृद्ध चौकट मोडून ते बाहेर पडले नसते  तर ? तर आज राजे शहाजी, जिजाऊं , त्यांनी घडवलेले शिवाजी महाराज  किती लोकांना माहिती असते ? 

संत तुकाराम सावकार होते . शेती विषयक ज्ञानी होते . प्रतिभावान कवी होते . त्यांच्या अभंगातून त्यांचे शेतीविषयक ज्ञान , प्रतिभा जाणवते .  ते देखील त्या समृद्ध चौकटीतच राहिले असते तर ?  त्यांनीही जे केले ते न करते तर ? सावकार तुकाराम म्हणून किती काळ लोकांच्या आठवणीत ते राहिले असते ? अशी एकापेक्षा एक सरस  उदाहरणे आपण सर्व जाणतो .

वर्तुळाचा  नियम आहे , जेथे आरंभ तेथेच समाप्ती. चौकटीत शिरून बहुतांशी सर्व तिथेच  वर्तुळाकार  गोल गोल फिरत राहतात .  चौकटीच्या बाहेर अजून  एक वर्तुळ आहे हे लक्षात येणारे कमी . खरतर वर्तुळाच्या अगणित दिशा आहेत .  मध्यबिंदू पासून हव्या त्या दिशेला कुठेही जाता येत .  त्याचा आवाका अमर्याद असतो .  

गाडगे बाबा , ज्योतिबा फुले ,  नेताजी सुभाषचंद्र बोस , बाबा आमटे अश्या कितीतरी लोकांची नाव आपल्या सर्वांना ज्ञात आहेत .  जुन्या वेळेचे लोक असोत अथवा नवीन . सामान्य लोकं चौकटीत जगतात आणि असामान्य लोकं त्या चौकटीला भेदून विश्वात्मक वर्तुळाचे प्रवासी होतात , महान होतात तर काही गौतम बुद्धांसारखे त्या वर्तुळालाही भेदून विश्वव्यापी होतात .



#वर्तुळ  , #विश्वव्यापी , #गौतमबुद्ध , #geometry 





Sunday, 16 August 2020

उपमा

उपमा

आज " श्रावणात घन निळा बरसला " हे गाणं रेडिओवर सुरू होतं , बाहेर पाऊसही पडत होता . ते ऐकतांना कदाचित मी शांत एकटी बसले होते म्हणून की काय , एकूणएक  शब्द अगदी लक्षपूर्वक ऐकत होते .  लहानपणापासून  हे गाणं ऐकतेय .  आज त्यातले शब्द न शब्द परत ऐकतांना जाणवलं , या गाण्यातून , आपण सर्व ,  श्रावण कित्ती वर्ष जगतोय , अनुभवतोय  . मंगेश पाडगावकरांचे शब्द ,  श्रीनिवास खळे यांच्या संगीत आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाने गुंफलेलं हे सुंदर गाणं ऐकल्यावर  असच वाटतं , हो न ? किती सुंदर शब्द ,  कित्ती सुरेख आणि आकर्षक उपमा . व्वा ! रिमझिम रेशीमधारा , पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे , स्वप्नांचे पक्षी , रंगांच्या रानात , थेंबाचे फुलपाखरू , अप्रतिम । अप्रतिम !  अगदी डोळ्यांसमोर  ते चित्र उभं राहतं .  साध्या सोप्या सहज भाषेतूनही मनापर्यंत पोहोचणारी , आजही पाठ असणारी शाळेतली कविता . ' श्रावण मासी हर्ष मानसी ' ही तर आजही  श्रावणाचा सुंदर अनुभव मनाला देते . हो न ?

उपमा हा भाषेचा एक अलंकार . अलंकार घातल्यावर मूर्ती असो वा मनुष्य , त्यांचं सौन्दर्य वाढतं . त्याचप्रमाणे वेगवेगळे अलंकार घातल्यावर भाषाही जास्त आकर्षक वाटते . जस ,  पुस्तकात वाक्य असेल "  मुख खूप सुंदर आहे ' तर सुंदर म्हणजे नक्की कसं याची कल्पना  येत नाही .  तेच जर वाक्य असेल ,  ' मुख म्हणजे जणू कमळच ' हे वाक्य वाचल्यावर ती व्यक्ती जरी काल्पनिक असली तरीही ती  किती सुंदर असेल याची  कल्पना उपमा वाचून ,  करून आपण पुढे वाचू लागतो . बरोबर न ?

जसा जसा अजून यावर विचार करू लागतो तस तस कित्ती लेखक , कवी , त्यांनी लिहिलेली पुस्तकं , त्यातली अलंकारिक भाषा , तर कधी मनाला भावणारी साधी , सोपी , सहज , तरीही सुंदर अशी वर्णन  आठवतात . ' जे न देखे रवी ते देखे कवि' याची वारंवार प्रचिती येते .

उपमा फक्त गद्य किंवा पद्म यातच दिल्या जातात अस नाही . आपल्या दैनंदिन जीवनातही आपण त्या ऐकत असतो . उपमा कधी मजेदार असतात , कधी उपरोधक असतात तर कधी लाडाने , प्रेमाने दिलेल्या असतात . उपमा ऐकल्यावर ती व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यासमोर उभी रहाते .

लहान मुलांचे पुऱ्यांसारखे गाल म्हंटले की तळताना टम्म फुगलेली पुरी आठवते . गाल अगदी रसगुल्ला आहे म्हंटलं की नक्कीच ते मूल खूप गोड असेल असं वाटतं , वाटतं न .

भोपळा , माठ ,  मिरची त्यातही लवंगी मिरची , कमची , काकडी , चवळीची शेंग , सुतासारखा सरळ , हरिश्चंद्र , भोळासांब , लक्ष्मी नारायणाचा जोडा हे आणि असे बरेच शब्द ऐकले की ती व्यक्ती कशी असेल याचा त्या व्यक्तीला न पाहताही अंदाज बांधता येतो . येतो न , आणि आठवले ही असतील आपल्याच आजूबाजूचे लोक , आठवले न ?

निरनिराळ्या उपमा निरनिराळ्या ठिकाणी अनपेक्षित , अचानक जेव्हा सुचतात किंवा ऐकू येतात त्यावेळी  हसू येतं . समोरून कुणी खूप हळू चालत येत असेल  तर ,  ' ' काच नाहीये खाली , ये पटकन धांवत ' अस चिडवल्या जात तर 'अगदी हळू ये  , जपून ये हं  ,  हे सांगायला ' खाली काच आहे असं समजून चाल ' अस सांगितल्या जात.  उपमा एकच मात्र एका वाक्यात मिश्किल भाव आहेत तर एकात काळजी . आहे न मजा ?

एक उपमा आणि त्यावरचा विनोद नेहमी वाचल्या आणि ऐकल्या जातो ,  ' प्रेमाला उपमा नाही ' का ?  तर म्हणे ' घरात रवा नाही ' . हा विनोद म्हणजे ' प्रेम ' आणि ' उपमा '  यातला बादरायण संबंध जरी असला तरी , जरा विचार करा  ,  की या रव्याच्या पदार्थाचं नाव उपमा कुणी ठेवलं असेल ?  आणि का ? 

बघा हं , रवा हे काही पीठ नाही , बरोबर  ? रव्याचा प्रत्येक कण वेगळा असतो  .  रवा जेव्हा भाजला जातो , तप्त होतो त्याचा रंग सुंदर तांबूस होतो . जास्त भाजला गेला तर जळतो , कमी भाजला तर उपमा खमंग होत नाही . त्यात कढीपत्ता , कांदा ,  मिरची , शेंगदाणे आणि आवडीप्रमाणे बरच काही यांची फोडणी घालुन आवश्यक तेवढं पाणी घातलं की झाला खमंग  उपमा तयार . पाणी कमी झालं तर तो घट्ट होणार , जास्त झालं तर पातळ , बरोबर न ? वरून सजवायला कोथिंबीर आणि जोडीला खोबऱ्याची चटणी  असेल तर मग , अहाहा !  तसच तर आहे न आयुष्यही. रव्याचा एकेक कण म्हणजे  जसा आयुष्यातला एक एक दिवस . रवा ज्याप्रमाणे भाजला जातो , खरपूस होतो त्याचप्रमाणे आयुष्याच्या उन्हात एक एक दिवस जगतांना ,  त्यात तावून सुलाखून निघतांना व्यक्तीवर परिपक्वतेचा  रंग चढायला लागतो . परिपक्व व्यक्तीच्या जीवनाला  सुख , दुःख  यांची  फोडणी असतेच .  त्यात शिक्षण , ध्येय , काम , सहनशीलता , जबाबदारी आणि बरंच काही  घातल्या जातं . त्यात घालायचं मेहनतीचं पाणी , ते मात्र आवश्यक तेवढं हवंच  की झाला खमंग आणि मऊसूत उपमा तयार . त्याला समाधानाची जोड असेल तर क्या बात है ।




#प्रेमालाउपमानाही, #श्रावणमासीहर्षमानसी, #श्रावणातघननिळाबरसला, 

Saturday, 8 August 2020

भाषा

 भाषा


भाषेची साधी व्याख्या म्हणजे  आपल्या अंतरंगातील मनोगत , भावना , विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन . थोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे . हो न ? या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली.

अक्षर अक्षर जोडलं की शब्द तयार होतात . शब्द शब्द जोडले की वाक्य तयार होतं . वाक्य वाक्य जोडत गेलं की तयार होते भाषा . 

अक्षर आणि शब्द जोडणं जेवढं महत्वाचं तेवढच तो बरोब्बर म्हणणंही . बरोबर न ? प्रत्येक अक्षराचा , शब्दांचा उच्चार कसा करावा याचं एक सुंदर प्रात्यक्षिक मी इतक्यातच पाहिलं , ऐकलं आणि लक्षात आलं की या आधी इतक्या महत्वाच्या गोष्टीकडे कधी मी लक्षच दिलं नव्हतं . कधी कुणी लक्षात आणूनही दिलं नव्हतं . त्यामुळे माझे उच्चार स्पष्ट  आहेत असा (गैर) समज होता माझा .


संत तुकाराम म्हणतात ,



आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शास्त्रे यत्न करू ।।1।।


                                                 
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जनलोका ।।2।।


तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देची गौरव पूजा करू ।।3।।





हे सगळं जाणवलं जेव्हा अनघा मोडक यांच्या संवादशाळेत मी गेले . शाळेच्या पहिल्याच दिवशी माझं स्वतःच्या स्पष्ट उच्चारांबद्दल असलेलं मत स्पष्ट बदललं . कोणताही  शब्द बोलतांना प्रत्येक अक्षर कस उच्चारावं , आद्याक्षरांपासून ते  ओष्ठव्य , कंठव्य , तालव्य अशी सगळी वेगवेगळी अक्षरं कशी उच्चारावीत याच प्रात्यक्षिक पाहिल्यावर जाणवलं , कित्ती शिकायचं आहे अजून आपल्याला .


भाषा म्हणजे फक्त अक्षर , शब्द , वाक्य , विरामचिन्हे इतकंच आहे का ?  अक्षरांचे तयार केलेले  शब्दरुपी मणी  एकसारखे  माळेत गुंफले गेले की ती मोहक वाटते . ते मणी जर चकाकते मोती असतील तर क्या बात है . या माळेत असूनही न दिसणारा आणि त्या सर्व मोत्यांना बांधून ठेवणारा भावरुपी धागा हा त्या मौक्तिक माळेच सौन्दर्य अजूनच वाढवतो . तो धागा साध्या दोऱ्याचा असो , रेशमी असो ,चांदीचा अथवा सोन्याचा . तो फक्त नाजूक , सुबक  असून चालत नाही . सर्व मोत्यांना एकत्र धरून ठेवण्यासाठी ,  हवं तिथे वळवण्यासाठी तो मजबूतही असावा लागतो आणि लवचिकही .  शब्द अर्थ जरी सांगत असले तरी ते बोलतांना त्यात उमटणारा भावही तेवढाच महत्वाचा असतो . वाक्य बोलतांना एखाद्या अक्षरावर , शब्दावर  उच्चारतांना दिलेला जोर त्या त्या शब्दाचं वजन वाढवतात ,  त्यातला भाव प्रकट करतात तर कधी एखाद्या अक्षरावर किंवा शब्दावर दिलेल्या चुकीच्या जोरामुळे त्या शब्दाचं वजन कमी करतात तर कधी त्यात चुकीचा भाव उतरवतात ,  जो काही वेळा बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातही नसतो . 

जगात  कुठल्या भाषा बोलल्या जातात अस  कुणी कधी विचारलं की लगेच मराठी , हिंदी , संस्कृत , उर्दू , तेलगू , कानडी ,  इंग्रजी , जर्मन , फ्रेंच , रशियन अशी उत्तरच पटकन मनात येतात . वेगवेगळ्या जाती ,  धर्मांच्या , देशांच्या , प्रदेशांच्या भाषा वेगवेगळ्या असल्या तरी कुणी जसं म्हंटलय तस  प्रत्येक 10 मैलांवर भाषा बदलत जाते . बरोबर न ?  प्रत्येक भाषेला स्वतःचा एक बाज असतो , एक नाद असतो , एक लय असते . ती भाषा ऐकतांना  लगेच लक्षात येते . अगदी एकाच मोठया शहरात राहणारे  लोक सुद्धा निरीक्षण केलं तर नक्की शहरातल्या कुठल्या भागात राहत असतील हेही ओळखता येत . अर्थात बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचही आपल्याला दिसून येत.

हे सगळं असलं तरी थोडा अजून विचार केला तर वाटतं , खरंच जगात इतक्याच भाषा आहेत का ? अजून कितीतरी भाषा आपण सगळे लहानपणापासून  ऐकतो , पाहतो आणि बोलतो .  टारझन आणि मोगली यांची भेट TV आणि पुस्तकांमधून झाल्यावर तर त्यांच्या त्या जंगलात राहण्याचं  , पशुपक्ष्यांशी बोलण्याचं  आकर्षण इतकं जास्त असतं की वेगवेगळे आवाज काढून भरपूर प्रयोगही केल्या जातात . बरोबर न ? 

स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी कित्ती भाषांचा प्रयोग आणि उपयोग सर्व प्राणिमात्र करतात . करपल्लवी , नेत्रपल्लवी ,  स्पर्शाची भाषा , नजरेची भाषा , प्रेमाची भाषा , देहबोली , शाळेत असतांना आपण सर्वांनी बोललेली पम ची भाषा , सांकेतिक भाषा , पशुपक्ष्यांची भाषा ,  सध्या प्रचलित असणारी संगणकाची भाषा या आणि अशा अजून खूप भाषा . काही भाषा या आपोआप येतात , काही निरीक्षण करून येतात तर काही शिकाव्या लागतात . काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी  विशिष्ट शब्द ,   विशिष्ट खुणा अथवा संकेत किंवा टाळ्या , शिट्ट्यांचे आवाज , प्राण्यांचे आवाज हेही वापरल्या जातात .  

छोटं बाळही भूक लागली की त्याच्या भाषेत बरोब्बर दूध हवं हे सांगत . इतकंच कशाला जर आपल्याघरी पाळीव प्राणी असेल तर तो आपले शब्द ,  भाषा थोड्याच दिवसात समजू लागतो .  तसच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव , त्याला काय सांगायचं आहे  मग ते म्याव म्याव  असो , भु भु असो ,  हंबा असो किंवा अजून काही आपल्यालाही त्याची भाषा हळूहळू समजू लागते .  प्रकाश आमटे किंवा अजून तत्सम लोक वाघाच्या , सिंहाच्या डरकाळ्या , माकडाचे चित्कार  तसच  अजूनही निरनिराळ्या प्राण्यांना काय म्हणायचंय हे त्यांच्या आवाजावरून , देहबोलीवरून , हालचालींवरून समजू शकतात . ते प्राणीही या लोकांची भाषा समजतात . एकमेकांशी बोलण्यासाठी दोघांची भाषा एकच असावी असा काही नियम नाही . हो न ?


हा विचार मनात आल्यावर हेही लक्षात येत की भाषा ही फक्त आवाजाने , खाणाखुणा करून किंवा स्पर्शानेच बोलली जाते असंही तर नाही . ती ओळखलीही जाते . आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे कळण्यासाठी भाषेची गरज भासत नाही . मनाने मनाशी बोलण्याची भाषा ही न शिकवताच येते  . आपल्या लोकांबरोबर ती बोलता यायला हवी , त्यांची  समजायला हवी , आणि त्यांच्या पर्यंत ती पोहोचवताही यायला हवी . काय ? वाटतं न असं ? 

मनापासून व्यक्त केलेली आपल्या मनाची भाषा लोकांच्या मनापर्यंत पोहीचवण्यात आणि त्यांनी बोललेली भाषा ओळखण्यात आपण सर्व यशस्वी होऊ हीच मनीषा .





#computerlanguage, #संवादशाळा, 

Thursday, 30 July 2020

मैत्री

मैत्री

Friendship is a sweet responsibility , never an opportunity .........

असं Khalil Gibran नी म्हटलंय

पूर्वी आपल्याला सगळ्यांना मित्र तर होते पण असा freindship डे साजरा करतात हे मात्र माहिती नव्हतं .....आजकाल सगळे अगदी शाळेतल्या मुलांपासून ते आजोबा आज्जी पर्यंत सगळे फ़्रेंडशिप डे celebrate करायला लागले .......हो न

मैत्री म्हंटली की सगळ्यात पहिल्यांदा आठवते ती शाळेतली मैत्री ......घराच्या आजूबाजूला राहणारे आपले मित्र मैत्रिणी .........त्यावेळी सगळ्यांनी मिळून केलेली मजा आणि कधी कधी त्यासाठी एकत्र भोगलेली किंवा कुणासाठी तरी आपल्याला मिळालेली सजा पण .

मजा असते नं त्या मैत्रीत .....त्यावेळी मैत्री फार पटकन होते .....अगदी काका मामा कुणाहीकडे गेल्यावर तिथे आजूबाजूला राहणाऱ्या मुलांबरोबर सुदधा मैत्री अशी
 यूsss होऊन जाते .......जसे जसे मोठे होतो आपण  .....कॉलेज मध्ये जातो ...... college मध्ये गेल्यावर मैत्री होते तरी तिथे भेटलेले मित्र मैत्रिणी यात थोडं अंतर असतं ......काही आपले शाळेतलेच मित्र असतात तर काही फक्त hi bye पुरते असतात तर काही हळूहळू जिवलग होतात.......काही नेहमी घरी येणारे तर काही फक्त college पुरते भेटणारे.......
त्यावेळी जर hostel मध्ये राहायची गरज पडली असेल तर तिथे झालेले मित्र , त्यांच्या बरोबर केलेली मस्ती , तिथल्या आठवणी हा  आयुष्यभरासाठी मिळालेला एक सुंदर ठेवा असतो ......मित्र देखील वेगवेगळे  असतात ........काहींनी आपल्याला अभ्यास करायला शिकवलं असतं तर काहींना आपण शिकवलं असत .... काहीं मित्रांनकडे पाहून कस वागायला नको हे आपण शिकलो असतो ......काही मित्रांबरोबर मस्ती मजा केल्या जाते तर काहींची मजाही घेतल्या जाते



त्यानंतर येतो तो नवीन नोकरीचा काळ .......कधी त्यात जुने मित्र भेटतात तर कधी पूर्ण नवीन वातावरणात अजून नवीन मित्र तयार होतात ........

वयाच्या या टप्प्यावर मात्र मैत्री पटकन होत नाही ......कुठेतरी जुन्या मैत्रीचा पगडा असतो आपल्यावर आणि खूपदा काही वेगळे अनुभव पण यायला सुरुवात झाली असते त्यामुळे पटकन कुणावर विश्वास ठेवल्या जात नाही .
एक नाव दिलं जातं या नात्याला .........सहकारी .....मित्र म्हणायला थोडं अवघड जातं .......सहकारी म्हंटल की कसं........ थोडं अंतर ठेवल्या जातं आणि आपल्या मित्रांकडून ज्या अपेक्षा असतात निर्भेळ मैत्रीच्या ......त्याही ठेवल्या जात नाही आणि मग अपेक्षाभंगही होत नाही .....ही मैत्री पुष्कळदा घट्ट होते .....मग सहकारी हे नाव मागे पडतं ......आजच्या या compitition च्या युगात हे थोडं कमी होतं ...... काही अपवाद असतात .......असो

मैत्री ही फक्त मित्रांबरोबर च असते का .......कि मैत्री या नात्याचा अर्थ अजून काही निराळा आहे .......म्हणजे बघा नं .......अगदी लहान असतांना मुलांचे मित्र हे त्यांचे आई बाबा असतात . भाऊ ,  बहिणी , आज्जी आजोबांशी ,आत्या , मावशी , काका , मामा बरोबर गट्टी असते .......जसे मुलं घराच्या बाहेर पडतात तसे मग मित्र या शब्दाची व्याख्या बदलत जाते .......किंबहुना खूपदा  घरातले ते आप्त आणि बाहेरचे मित्र असं काहीसं सांगितल्या जातं , शिकवल्या जातं किंवा कधी कधी ते आपोआप शिकल्या जातं ...... नंतर मात्र  ते मित्रच जास्त जवळचे होतात आणि त्यांच्याबरोबर जास्त वेळा सगळ्या गोष्टी share केल्या जातात  अगदी शाळेतल्या खाऊ च्या डब्ब्यापासून ते मनात छोट्या नवीन तयार झालेल्या गोड कोपऱ्या पर्यंत ...काय ? .....बरोबर नं  .........

जसे जसे मोठे होतो आपण ..... नोकरी करायला लागतो  , पुढच्या शिक्षणासाठी एकटे राहायला लागतो ...... शाळेतले मित्र हे फक्त फोनवर भेटणं सुरु होतं..... त्यावेळी परत आपण आपल्या लहानपणी च्या मित्रांना भेटणं कसं जमेल याच planning करू लागतो .........ज्या लग्न कार्यांना जातांना पूर्वी आई बाबा म्हणतात म्हणून जात असतो तिथे परत आपले आज्जी , आजोबा , मावशी ,  काका , मामा ,  बहीण ,  भाऊ भेटतील म्हणून जाऊ लागतो .......अर्थात कधी जाणं होतं .......कधी नाही ......पण मध्यंतरी शैक्षणिक काळात थोडे दूर गेलेले हे लहानपणीचे मित्र परत जवळ येतात .......जितकं महत्व शाळेतल्या , कॉलेज मधल्या get together ला दिल्या जात तेवढंच family get together ही दिल्या जातं ........शाळेतल्या कॉलेज मधल्या आठवणी आठवून एकमेकांना चिडवत परत कॉलेज life परत  अनुभवल्या जातं तसच  लहानपणीचे एक एक केलेले कारनामे , मस्ती सगळं आठवून लहानपण सुध्दा अनुभवल्या जातं .

आयुष्यात खरंच इतकेच मित्र असतात का आपले ........... कित्येक वर्षे रोज नेमाने newspaper देणारा , दूध आणून देणारा  , घरी पोळ्या करणारा किंवा करणारी, मुलांना शाळेत नित्यनेमाने पोहोचवणारा रिक्षावाला , माळी , घरकाम करणारी बाई इतकंच कशाला ज्या भाजीवाल्यांकडून आपण नेहमी भाजी घेतो ते , नेहमीच किराणा दुकान , आपले family doctor.......असे कितीतरी लोक ज्यांच्या शिवाय आपली रोजची काम होत नाहीत .......त्यांना काय नाव द्यायचं ......

तेही तर आपल्या आयुष्यात आनंद पेरत असतात ......आपल्याला आपलं घर नीट ठेवायला मदत करत असतात .......कधी बरं नसतांना ,  दुसरं कुणी जवळ नसतांना आपल्या जवळ थांबून सोबत करत असतात ..........या सगळ्या मध्ये पैश्यांची देवाणघेवाण जरी होत असली तरी देखील .....विचार करा .......आपण खूपदा हक्काने सांगतो नं त्यांना काम .......कधी पैसे नसले आपल्याकडे तरी ती वस्तू तो दुकानदार विश्वासाने आपल्याला देतो न .......कधी आपल्या घरी घडलेली आनंदाची गोष्ट देखील सांगतो आपण त्यांना .......पेढे देतो ......त्यांच्या बरोबर आपला आनंद वाटतो .......हो नं .......कधी त्यांच्या घरी काही problems असले तर ते पण आपल्याला सांगतात........आपल्यापरीने आपण त्यांना जमेल ती मदत करतो .......त्यांच्या घरच्या कार्यप्रसंगांना आवर्जून जातो ........त्यांनाही बोलावतो . इतकं सगळं करतो पण आपण त्यांना मित्र म्हणत नाही .......कुठेतरी थांबतो ......का ?.........

कदाचित जुन्या विचारांचा पगडा तर आपल्याला अडवत नाही ?



#friendshipday, #मैत्री,


Saturday, 25 July 2020

बंधन


बंधन

बंधन म्हंटल की बांधल्यासारखं वाटत न ....बंधन मग ते कुठलं का असेना .....बंधन खरंच चांगलं का वाईट ...... बंधनं खूप प्रकारची असतात ..... घरातल्या प्रत्येकावर कुठली न कुठली बंधन असतात ......मग ती कधी स्वतःहून ठरवून घेतलेली असतात तर कधी कुणी दुसऱ्याने सांगितलेली तर कधी कुणी लादलेली . साधंच पहा न ,  मुलांनी सात च्या आत घरात यायचं  बंधन . ते मुलांच्या चांगल्या साठी जरी असलं तरी त्यांना त्याचा जाच वाटतो कारण मित्रांबरोबर खेळणं किंवा गप्पा मारणं पूर्ण झालेलं नसत .  अर्थात लहानपणी खेळताना पूर्ण खेळणं झालं असं कधी वाटतच नाही आणि गप्पा तर कधी संपतच नाहीत . त्यामुळे मग आईबरोबर वाद होतो . ती पण तेवढीच खमकी असते आणि ते बंधन  ती पाळायलाच लावते .

समोर एखाद्या भांड्यात काही ठेवलेलं दिसत असेल तर त्यावर एखादी  नजर जाते पण त्याबद्दल फारसा विचार केल्या जात नाही .   तीच वस्तू जर झाकून ठेवली असेल तर मात्र त्यात काय आहे हे पाहण्याची इच्छा होते . एखाद्या घराची  कंपाऊंड wall उंच असेल तर आत कोण रहात ? इतकी उंच भिंत का बांधली असेल ? याबद्दल मनात कुतूहल निर्माण होतं . त्याचप्रमाणे एखादी गोष्ट का करायची नाही किंवा का करायची हे जर नीट समजावून सांगितलं तर ते बंधन न वाटता दुसऱ्यांनी आपली घेतलेली काळजी आहे असं त्या व्यक्तीला वाटत . हो न ? यासाठी  त्यांच्या प्रश्नांची समाधान कारक उत्तर मात्र द्यावी लागतात . अर्थात मोठे झाल्यावर मुलांना त्याच महत्व पटत ही गोष्ट अलाहिदा .

बंधन ही फक्त लहान मुलांसाठीच असतात का ? ती तर मोठ्यांनाही असतात . समाजात वावरतांना कसं वागावं ?  कसं वागू नये ? कुठे काय बोलावं , कस बोलावं ,  कुठल्या समारंभाला  काय कपडे घालावेत ? इतकंच कशाला ,  कुठे कसं खावं ? हाताने जेवाव की काटे चमचे वापरून ? एक ना अनेक ........हे सुद्धा एक प्रकारचं बंधनच आहे न ?  अर्थात ते खूपदा स्वतःहून पाळलेले असल्यामुळे ते बंधन न वाटता आपण त्याला जीवनशैली म्हणतो इतकंच . हेच जर दुसऱ्या कुणी करायला सांगत असेल तर  मात्र ते  झुगारून द्यायची इच्छा होते .  बरोबर न ?

बंधनं फक्त जाचकच असत का ? उदाहरणार्थ  , रक्षाबंधन , मैत्रबंध  या शब्दात किती आपुलकी जाणवते .....प्रेमबंधन , रेशीमबंध म्हंटल की प्रेम , सामाजिक बंधन म्हंटल की जबाबदारीची जाणीव , काळाचे बंधन म्हंटले की यातून वेगवेगळ्या परिस्थिती प्रमाणे वेगवेगळे अर्थ निर्माण होतात ,  बरोबर न ? बंधनकारक या शब्दात मात्र जबरदस्तीची भावना जाणवते ..... बंधनात अडकण हे कधी चांगलं तर कधी नाही ......त्यात अडकून कधी त्रास होतो तर कधी आनंद मिळतो ....... ते बंधन नेमकं कशाचं आहे ......दुसऱ्या कुणी घातलं आहे की त्या व्यक्तीची  ते पाळायला संमती आहे यावरही हे अवलंबून असत .

बंधन  लोकांमध्ये असलेली ग्राह्य मर्यादा , सहशीलता ठरवते आणि मग कुठे आणि काय बंधन घालता येतील याचा अंदाज बांधते . बंधन घालणार कोणीही असो , आप्त , स्वकीय असोत नाहीतर कोणी परके किंवा अगदी सरकार सुद्धा . आपल्या कृतीवर घातलेली बंधन ही पुष्कळदा पाळावी लागतात . कधी ती अपरिहार्य असतात तर कधी आपल्याच भल्यासाठी असतात .

लोकं एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावर जस बंधन घालू शकतात तसच एखादया व्यक्तीबरोबर बोलतांना त्या व्यक्तीच्या मनात स्वतः च्याच क्षमतेबद्दल , योग्यतेविषयी संदेह निर्माण करू शकतात . खरं तर हे त्यांच दुसऱ्या व्यक्तीबद्दल असणार वैयक्तिक मत असल तरीही कधी कधी ती व्यक्ती जे सांगतेय त्यावर ऐकणारी व्यक्ती विश्वास ठेवून त्या चौकटीत स्वतःला ठेऊनच स्वतःकडे पाहू लागते .  कुणी आपल्या कृतीवर घातलेले बंधन काही कारणास्तव मान्य करावे लागले तरी आपले विचार मात्र नेहमी स्वतंत्र असावेत . आपले असावेत .

थोडा अजून विचार केला तर लक्षात येत ,  बंधन म्हणजेच बंध , बंदी , निर्बंध ,  बांधिलकी , म्हणजेच मर्यादा , म्हणजेच restrictions म्हणजेच limits , curb , restraint , control , constraint , rein इत्यादी इत्यादी .  या सर्व शब्दांचा अर्थ थोडयाफार फरकाने सारखाच आहे , आहे न ?


अस म्हणतात  'self discipline is a form of restriction ' तसच हेही म्हणतात की  " All limits are self imposed " बरोबर न ?  मर्यादा  प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात . त्या स्वतःच स्वतःवर घातलेल्या असतात .  कुठल्या मर्यादांच पालन करावं ? कुठल्या नाही ? हादेखील एक वादातीत विषय आहे . ज्या भीतीला आपण सामोरे जात नाही त्या आपल्याच मर्यादा बनून जातात . होतं न अस ?  कुठलीही व्यक्ती आयुष्यात काय काय करू शकते , कुठपर्यंत जाऊ शकते , तिच्या शारीरिक , मानसिक , वैचारिक , आर्थिक मर्यादा काय आहेत हे त्या व्यक्तीने स्वतः  अभ्यासल्याशिवाय  कळत नाही .  कदाचित म्हणूनच , 

" Don't limit your challenges , challenge your limits " हे वाक्य मनाला  भावतं आणि आपलंसं करावस  वाटतं ?  तुमचं काय मत आहे ?






#challengelimits, 


Sunday, 19 July 2020

प्रश्न

प्रश्न


आता तुम्हाला वाटेल ,  प्रश्न हा काय विषय आहे ब्लॉग लिहीण्याचा ? खरतर आज प्रश्न पडला होता मला की लिहायला कुठला विषय निवडावा  ?  वाटलं प्रश्न पडणं हे तर ज्ञानवर्धनाच पहिलं पाऊल . पहिलं पाऊल पुढे पडलं की आपोआप दुसरं पडतच आणि मग ज्ञानवर्धनाकडे हळूहळू वाटचाल सुरू होते , बरोबर न . त्यामुळे आज म्हंटल करू या  आपणच आपलं ज्ञानवर्धन .

एक साधासा प्रश्नही कित्येक , अनेक  नवनवीन उत्तरे निर्माण करतो आणि त्यातूनंच मग पुन्हा अनेक वेगवेगळे प्रश्नही उभे रहातात.

प्रश्न का पडतात ? कुणाला पडतात ?  केव्हा पडतात ? हे प्रश्न जेव्हा मला पडले तेव्हा एक जुनं गाणं आठवलं ,

" ये क्या हुआ ? कैसे हुआ ? कब हुआ ? क्यू हुआ ? " इतकंच नाही तर प्रत्येक प्रश्न का पडतो याचे एक मजेदार उदाहरण ही आठवलं लगेच आणि आठवल्यावर असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे असंही वाटल .

एकदा काय झालं आमच्या बाजूला राहणाऱ्या 2,3 वर्षाच्या छोट्या मुलीचा रडण्याचा आवाज येत होता . आधी वाटलं काहीतरी हट्ट करत असेल पण ती सारखी काहीतरी सांगतेय अस वाटलं म्हणून पाहायला गेलो . ती रडत रडत सांगत होती की दुपारी तिनी बर्फ संपून जाईल . बाबांना मिळणार नाही या विचाराने दाराच्या मागे बाबांना ऑफिस मधून आल्यावर द्यायला वाटीत बर्फ लपवून ठेवला होता .  आता तो तिथे नाहीये . झालं असं की त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते . घरात  बर्फ सारखा सगळ्यांना हवा असायचा आणि त्यामुळे संपायचा  . आता त्या लपवून ठेवलेल्या वाटीतल्या  बर्फाच  झालं पाणी . तिची आई तिला हे सांगायचा आटोकाट प्रयत्न करत होती की अग बर्फाच पाणी झालं . बर्फ कसा राहील दिवसभर ?  आईच्या दृष्टीने ही साधी गोष्ट होती पण मुलीला  ते काही पटत नव्हतं . त्यामुळे हे असे प्रश्न  पडतात हे मला एकदम पटलं  ,  ये क्या हुआ ? कैसे हुआ ? गंमत अशी की तिच्या बालमनाला हे काही केल्या पटत नसल्याने  पुढचे प्रश्न तिला नक्की पडले असावेत , कब हुआ ? क्यू हुआ ? कारण मी तर इथे बर्फ ठेवला होता मग बर्फाच पाणी झालं केव्हा  ? आणि का ?  एकीकडे मजा वाटत होती तर दुसरीकडे तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला समजेल अशी देताही येत नव्हती .

बर तिला म्हंटल " ओ छोडो , ये ना सोचो " तर नाही  , तिला तोच बर्फ हवा होता तिने वाटीत लपवून ठेवलेला . शेवटी मग तिला बोलण्यात गुंतवून त्या वाटीत चुपचाप  दुसरा बर्फ परत आणून  ठेवला ,  तर स्वारी एकदम खुश , सगळे प्रश्न गायब आणि मग एकदम " मै चली मै चली" .

हा प्रसंग आठवला की आठवतो तो निरागस भाव . त्या निरागस पणाने विचारलेले प्रश्न की ज्यांची उत्तर सगळ्या मोठ्यांकडे असूनही तिचे प्रश्न अनुत्तरित होते .

असेच कित्ती प्रश्न लहानपणी पडतात . जस sodawater च्या बॉटल मध्ये आधी सोडा घालतात की कंचा ? रेडिओ किंवा TV त गायक किंवा actor आत कसा आणि कुठून जातो ? सगळ्या वस्तुंना रंग असतो मग  पाण्याला रंग का नाही ? चंद्र , तारे रात्रीच का दिसतात ? आरशात आपल्या गालाची पापी का घेता येत नाही ?  इतके प्रश्न पडतात की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता देता आईबाबांची दमछाक होते . घरात आजी आजोबा असले की  ते मात्र अशा सगळ्या प्रश्नांना बरोबर हाताळतात .

आपल्या प्रश्नांची उत्तरे देणारी माणसे अनेक भेटतात पण आपण हा प्रश्न का विचारतोय यामागचं कारण समजणारी माणसे क्वचितच भेटतात .

अस म्हणतात ,

" A child is an island of curiosity surrounded by sea of questions "

खरंच , मूल हे कुतूहलाच एक बेट आहे ,  ज्या बेटाच्या चारही बाजूला प्रश्नांचा सागर आहे . किती समर्पक दिलेली उपमा आहे .

प्रश्न फक्त लहानपणी च पडतात का ?  ते तर मोठे झाल्यावरही  पडतात . ज्ञानवर्धन हे तर आयुष्यभर सुरूच असतं . नंतर   त्या प्रश्नांना आपण अडचणी , समस्या , संकट वगैरे वगैरे नावांनी  ओळखतो .

 लहानपणी प्रश्न मनात आल्याबरोबर  कुणालातरी  विचारून त्याची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला जातो , अगदी लगेच , ताबडतोब . जोपर्यंत प्रश्नाच उत्तर मिळत नाही किंवा शोधत नाही तोपर्यंत मुलांची जिज्ञासा त्यांना शांत बसू देत नाही .  मोठं झाल्यावर मात्र तस केलं जातं नाही . शक्यतोवर स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याकडे कल वाढलेला असतो . ते बरेचदा सोडवल्या जातातही . एखादेवेळी दुसऱ्या कुणाची मदत लागते . ती मदत कधी मिळते तर कधी मिळत नाही . कधी कधी ती मिळणारच नाही असं गृहीत धरून  मदत मागितल्या जात नाही .  कदाचित पूर्वी आलेले अनुभव त्या व्यक्तीला मदत मागण्यापासून परावृत्त करतात . काही प्रसंगी माणसाला फक्त सोबत हवी असते . तुझे प्रश्न तू सोडव म्हणण्यापेक्षा सगळे प्रश्न आपण सोडवू या शब्दांची गरज असते .


आयुष्यातल्या काही प्रश्नांची आवर्जून उत्तर शोधायचा प्रयत्न केला जातो तर काही प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केल्या जात नाही . कधी कधी उत्तर मिळाली तरी ती सांगितल्या जात नाहीत  तर काही प्रश्न अनुत्तरित ठेवण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करते . अस कधी कधी स्वतःच्या फायद्यासाठी केलं जातं तर कधी आपल्या लोकांच्या काळजीने केलं जातं.

प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं  ?  का नसतं ? कदाचित असतंही आणि नसतंही . काही प्रश्नांच्या उत्तराने चांगला परिणाम साधण्याऐवजी जर वाईट परिणाम साध्य  होणार असेल तर ते टाळलेल केव्हाही चांगलं याकडे मोठ्या लोकांचा कल वाढलेला जाणवतो  .  काही अनुत्तरित प्रश्न हे काही वेळेला प्रश्न विचारणाऱ्या आणि उत्तर देणाऱ्या  दोन्ही व्यक्तीचा मार्ग सुकर करतात म्हणूनही असेल कदाचित . 

प्रश्नांना उत्तरे ।
उत्तरांना कारणे ।
कारणांना विश्लेषणे ।
विश्लेषणांना संदर्भ  ।

खरं तर प्रवास , प्रश्न ते उत्तर एवढाच असतो
पण पुष्कळदा प्रश्न आणि संदर्भ यांची अशी काही गुरफट होते की पुन्हा उरतो तो प्रश्न च .


मागे एक गोष्ट वाचली होती मी .   बालकमंदिरात असतांना एका मुलीने सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी मुखोद्गत केली . आईने म्हंटल ,  मी तुला प्रश्न विचारते ,  तू उत्तर सांग. आपण उजळणी करू .  मुलगी म्हणाली , आई मला सगळं पाठ झालंय , आता नको न विचारू . मी लिहीन उद्या सगळं बरोब्बर . दुसऱ्या दिवशी पेपर हातात घेतल्यावर तिच्या लक्षात आलं , " अरे मला उत्तर तर सगळी पाठ  आहेत पण प्रश्न तर मी वाचलेच नव्हते . त्यामुळे कुठल्या प्रश्नाला काय उत्तर लिहायचं हे  माहितीच नाही ". याच काहीसं उलट  मोठं झाल्यावरही तर होतं न ? प्रश्न माहिती असतात . प्रश्नाकडे इतकं जास्त लक्ष दिलं जातं की उत्तर शोधायचा प्रयत्नच केल्या जात नाही . ये क्या हुआ ? कैसे हुआ ? कब हुआ ? क्यू हुआ ? यावरच सगळं लक्ष केंद्रित होतं . उत्तरच सुचत नाही . त्या ऐवजी जर  " वो छोडो , ये ना सोचो " अस म्हणून  उपाय शोधण्याचे प्रयत्न  लवकर सुरू केले  तर  प्रश्न, प्रश्न राहतच नाही .

कधी कधी मनात खळखळून वाहणाऱ्या प्रश्नांचा प्रवाह असह्य पेचात पाडणारा भासतो. जसा शांत दिसणाऱ्या पाण्याचा न दिसणारा तळ त्यात दिसणाऱ्या प्रतिबिंबच्या आड लपलेला असतो तशीच प्रश्नांची उत्तरही कुठेतरी त्या गोंधळलेल्या मनाच्या प्रतिबिंबा आडच दडलेली असतात .

कोणत्याही सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर " वेळ" हेच आहे .


❓उभा धरला तर प्रश्न दिसतो आणि तोच जर आडवा धरला तर किल्ली 🔑 .  त्याकडे कोण कस बघेल यावर हे अवलंबून असत .  प्रश्नातच उत्तर दडलेलं असत अस जे म्हणतात ते या वरूनच  कदाचित आलं असेल .
काय वाटतं तुम्हाला  ?




#कुतुहल, #जिज्ञासा, 

Saturday, 11 July 2020

संगीत

संगीत



संगीत हा शब्द ऐकला की बहुतेक सगळ्यांना गाण्याची आठवण येते बरोबर न . संगीत आणि गाणं हे एकमेकांचे अभिन्न अंग आहेत . संगीताशिवाय गाणं आपण ऐकतो किंवा गाण्याशिवाय संगीतही. तरीही आपल्या मनात ते इतके खोलवर रुजले आहेत की त्यांचा वेगवेगळा विचारच केल्या जात नाही .  संगीताने  गाण्याची आणि गाण्यामुळे संगीताची लज्जत अजूनच वाढते हेही तेवढंच खरं .



लहानपणी कुणी तरी माझी फिरकी घेत सांगितलं होतं मला की chinese मुलांच्या बारशाच्या वेळी नाव ठरवतांना एखाद्या उंच ठिकाणावरून  काचेची किंवा चिनीमातीची भांडी ,  कप  ,  प्लेट्स खाली पाडतात आणि जो आवाज येईल ते नाव ठेवतात बाळाचं . तेव्हा गंमत वाटायची , वाटायचं कधी तरी आपणही पाडून बघावा वरून एखादा glass किंवा कप खाली , कसा आवाज येतो पाहायला पण ती हिम्मत कधी झाली नाही . 



कप , ग्लास यावर टिचकी मारून आवाज कसा येतो हे पाहायचा प्रयत्न केला . दोन कप किंवा ग्लास , साधे स्टील चे रोजचे वाट्या चमचे , छोट्या ताटल्या आणि चमचे , कप आणि चमचा असे सगळे काही प्रयोग झाले .  ठराविक लयीत वाजवल्यावर त्यातून निर्माण होणारा नाद , ती किणकिण आणि ताट वाजवल्यावर त्यातून होणारा झंकार करून पाहिले . ते सगळं इतका आनंद होतो की मग त्यापुढे आईचं , ' आता पुरे करा रे आवाज ' हे रागावणं फारसं काही मनाला लागत नाही . कधी कधी मात्र हे उद्योग जास्त वेळ चालले तर  कानाखाली आवाज ऐकू येतो आणि त्यानंतर गाणंही . काय ? केले आणि ऐकलेही असतील न असे आवाज तुम्हीही ?



लहानपणी संगीतकार म्हंटल की खरंतर फारसं कळत नव्हतं .  जसजस कळायला लागलं तसतस हेही लक्षात आलं की कुठलही वाक्य गाण्यासारख गाता येऊ शकतं आणि संगीत तर अगदी आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंमधूनही निर्माण होऊ शकतं .



संगीत  इतक्या ठिकाणी ऐकू येत की यादी करू म्हंटल तर कित्ती तरी मोठ्ठी तयार होईल . म्हणजे बघा निरनिराळी वाद्य तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत . संगीत फक्त त्यातूनच निर्माण करता येत का ?  थोडं कान देऊन ऐकलं तर प्रत्येक ठिकाणी #संगीत # ऐकू येत . प्रत्येक वस्तू मध्ये संगीत दडलेलं असतं .





पानांची सळसळ  , सोसाट्याने सुटलेल्या वाऱ्याचा सु सु आवाज ,  भांडी पडल्यावर होणार आवाज ,  कोल्हापुरी चपलांचा कुरकुर आवाज , पावसाचा आवाज ,  रिपरीप पडतांना वेगळा ,  मुसळधार पावसाचा आवाज अजून निराळा आणि गारा पडत असतील पावसाबरोबर तर अजून वेगळा . त्याचवेळी जर कडकन् वीज चमकली तर त्यानंतर ऐकू येणारा गडगडाट , जोरात आवाज झाल्याने खळकन फुटलेल्या खिडकीचा आवाज  , पैंजण किंवा छल्ला यांचा #आवाज # ,  टाळ्या , चुटकी किंवा पायाने धरलेला ठेका , शाळेत किंवा कॉलेज मध्ये मित्रांच्या  पार्टीत टेबल वर tap करून दिलेली तबल्याची साथ , ओठांनी केलेला चक चक आवाज , दातात तार पकडून त्यावर बोटाने काढलेले # झंकार # स्वर # , गाण्याला शिट्टीने  दिलेलं संगीत किंवा शिट्टी वाजवतच गायलेलं गाणं , 
काढलेले विविध प्राण्यांचे आवाज , शाळेची घंटा , बसने दाबलेला कर्कश्य ब्रेक ,  नळाच टप टप कशावर तरी पडणार पाणी , पाणी बादलीत अथवा  मग्यात पडतांना होणारा आवाज , लयीत  वाजवलेल्या ताटवाट्या यांचा आवाज ,  ग्लास मध्ये किंवा बादलीत उंचावरून पाणी घालतांना होणारा आवाज , बांगड्यांची किणकिण , दुधात किंवा सरबतात साखर घोळतांना होणारी टीणटीण ,  शाळेची बस , घरच्या गाडीचा रोज लयीत  वाजणारा हॉर्न ,  gate चा आवाज ,  हिंजीस गंजल्यामुळे होणारा करकर आवाज , पंख्याचा चा फिरतांना होणारा गर्रर्रर्र गर्रर्रर्र असा आवाज , शंख कानावर ठेऊन त्यातून ऐकू येणारा समुद्राचा आवाज . कित्ती कित्ती ठिकाणी निरनिराळे आवाज ऐकू येतात . बापरे , मीच थकले आता विचार करून करून .



एखादा आवाज लयीत ऐकू येत असला किंवा केला तरी  त्यातून संगीत निर्माण होतं . हे आणि असेच अनेक आवाज जेव्हा कुठल्या शब्दांबरोबर चपखल बसतात तेव्हा तयार होत अर्थपूर्ण संगीत आणि गाणं .  





आपण सगळ्यांनी '#पडोसन# ' सिनेमातल ' #मेरी सामनेवाली खिडकी में# ' हे गाणं ऐकलंय . त्यात #R D Burman# यांनी कंगवा  घासल्यावर येणाऱ्या आवाजाच संगीत दिलंय . पंचमदांनी दिलेलं संगीत खरंच अफलातून आहे . ही # सृजनशीलता # गाणं पाहतांना , ऐकतांना  अचंबित तर करतेच त्याबरोबर नतमस्तक होतो आपण या सृजनशील संगीतकारासमोर .  उदाहरण द्यायचं झालं तर '#होगा तुमसे प्यारा कौन #' या गाण्यात sand paper एकमेकांवर  घासून आणि बांबू एकमेकांवर आपटून होणाऱ्या आवाजाचा  संगीत म्हणून उपयोग केला आहे . '#चुरालिया है तुमने जो दिलको# ' या गाण्यात , काचेचे ग्लास आणि चमचे यांनी निर्माण होणारा आवाज संगीत म्हणून वापरला आहे . कुठल्या गाण्यात Mike समोर गुळण्या करून तो आवाज तर कुठल्या गाण्यात डब्बे तर कुठे अजून काही .  अजून कितीतरी वेगवेगळ्या वस्तू वाद्य म्हणून वापरून त्यांचा आवाज संगीत म्हणून दिलाय त्या अवलीयाने . त्या बद्दल बोलावं , लिहावं तेवढं कमी आहे . कधी कधी वाटत जर त्याकाळात synthesizer असता तर त्यांनी आपल्यावर केलेली ही संगीताची जादू अजून कुठल्या उंच स्तरावर  नेऊन ठेवली असती . हे विचार करण्याच्या पलीकडे आहे .



जसा शब्दांना अर्थ , भाव  असतोच तसाच संगीतातही तो भाव निर्माण करण्याची ताकद असते  . कुठल्या संगीताने  मनात भीती निर्माण होते तर  कुठल्या संगीताने शहारे येतात .  कुठल्या संगीतात प्रसन्नता असते तर कशाने आनंद मिळतो .  कशाने  करुणा , दया निर्माण होते  तर कुठल्या संगीताने अजून कुठला भाव . नेमका  भाव तयार व्हावा यासाठी निरनिराळ्या साधनांचा लयबध्द आवाज  करण्यासाठी उपयोग केला जातो .  असो .



आवाज हा कानांवर पडतो मात्र संगीत ही ऐकण्याची चीज आहे .  संगीत हे ऐकलं तरच ऐकू येत . ते सगळ्या ठिकाणी आहे . झाडाच्या पानांची सळसळ असो की बासरीवर वाजवलेले #सूर# . आवाज सगळीकडे होतच असतात पण  याच आवाजांना जेव्हा सूर गवसतो  तेव्हा संगीत निर्माण होत .



जसे आवाजातले सूर गवसले की संगीत निर्माण होतं  तसच जीवनात सूर गवसले की आयुष्यही #सुरेल # संगीत होतं . खरंच असे जीवनातले सूर सर्वांना गवसले तर ? तर प्रत्येकाचे #जीवनगाणे # हे सुरेल संगीत होईल . होईल न ? असेच होवो हीच मनिषा .




#meresamnewalikhidkime, #RDBurman, #जीवनगाणे, #पडोसन, 







Sunday, 5 July 2020

फुलपाखरू

फुलपाखरू

पावसाळा सुरू झाला तशी सगळी झाडं कशी आनंदून गेली . प्रत्येक पानांवरून ओघळणारे थेंब जणू त्यांचे आनंदाश्रूच .  तप्त उन्हाळ्यात तापल्यावरही सर्वांना सावली देणाऱ्या झाडांनी पावसाने भागलेल्या तृष्णेनंतर व्यक्त केलेला आनंदच तो .  ती टवटवीत झालेली झाडं आणि त्यावर आता नव्याने फुललेली फुल . बागेत अगदी आनंदोत्सव साजरा होतोय असंच  वातावरण निर्माण झालय .


कुठलाही आनंदोत्सव साजरा होतांना त्यात आजूबाजूचे सगळे सामील होणारचं , हो न . यात प्रामुख्याने दिसायला लागली आहेत फुलपाखर . काही पिवळ्या रंगांची , काही पोपटी , काही काळी त्यावर रंगीत ठिपके असलेली , काही राखाडी रंगांची , काही निळी आणि त्यावर पिवळे ठिपके असणारी , अशीच आणि अजून कितीतरी . काही लहान काही मोठी . कित्ती कित्ती प्रकार आणि रंग . सगळेच सुंदर .  जेव्हा ते पानांवर किंवा फुलांवर बसतात तेव्हा फुलपाखरू तर सुंदर दिसतच तसच ते त्या पानांचही सौन्दर्य वाढवत .  


या फुलपाखरांच  या फुलांवरून त्या फुलांवर  उडत जाण पाहतांना कस सगळं विसरल्या जातं , वेळ , काळ आणि आपलं वयही  . त्यांचं सौन्दर्य , त्यांचे नाजूक पंख , त्यांची ती भिरभिर उडणारी आकृती , छोटी पतंगच जणू. त्यांना मांजा बांधलेला नसतो इतकंच . त्यांना दोरी बांधून स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे  उद्योग लहानपणी करायचा प्रयत्न केल्याचं आठवतंय सगळ्यांना , हो न . फुलपाखराला हातात घेण्यासाठी किमान त्याच्या मखमली पंखांना जवळून पाहायला मिळाव म्हणून अगदी  दगड , काटे बोचण्याची पर्वा न करता त्याच्यामागे जाणं हे त्यावेळचे छंद . त्यावेळी अस वाटत की हे फुलपाखरू माझा मित्र असावं .  त्याने माझ्या खांद्यावर बसून राहावं . त्याने मला सोडून कुठेही जाऊ नाही , हो न . केलेत
आपण सगळ्यांनीच असे उपद्व्याप . असो .

फुलपाखरू पाहतांना मला नेहमी शाळेतली श्री ग . हा . पाटील यांची फुलपाखरू ही #कविता# आठवते

फुलपाखरू । छान किती दिसते ।फुलपाखरू।। 
 
या वेलींवर । फुलांबरोबर गोड
किती हसते । #फुलपाखरू #।

पंख चिमुकले । नीळेजांभळे ।
हलवूनी झुलते । फुलपाखरू ।

डोळे बारीक । करिती लुकलूक ।
गोल मणी जणू ते । फुलपाखरू ।

मी धरू जाता । येई न हाता ।
दूरच ते उडते । फुलपाखरू ।

अगदी असच वाटत न फुलपाखरु पाहिले की . या कवींनी कित्ती साध्या , सोप्या शब्दात लहानपणी मुलांना जे वाटतं  त्याच वर्णन केलंय , व्वा .

फुलांवर असतांना फुलपाखराने पंख उघडझाप करत तिथे बसून राहणं आणि आपण जवळून पाह्यला गेल्यावर पटकन उडून दुसऱ्या फुलावर जाऊन बसणं , सगळंच कस मोहक . हा मोहकपणा तर मनाला भावतोच त्याच बरोबर भावतं त्याच स्वछंदी बागडणं . काय होत न असं .  त्याच बागेत बागडणं पाहून मनाला खरंच खुप निखळ आनंद मिळतो .

आत्ता आपल्याला दिसतात आहेत ती फुलपाखर . त्या आधी काही दिवसांपूर्वी आपल्याला अळी किंवा #सुरवंट# म्हणू आपण , जेव्हा आपल्या बागेत एखाद्या झाडावर दिसला / ली तेव्हा ? तेव्हा आपली प्रतिक्रिया काय होती ? 
" अरे बापरे आता ही अळी झाडांची पान खाऊन टाकेल सगळी " अस म्हणून मग आपण त्या अळीला काडीवर किंवा पानावर उचलून बाहेरच्या कुठल्याश्या साध्या झाडावर ठेऊन देतो , ज्या झाडापासून आपल्याला काही नकोय . करतो न अस आपण सगळे ?  यात काही चूक आहे असं म्हणत नाही मी . अळी आवडत नाही आपल्याला हे मात्र खरं  . पानं खाते म्हणूनही आणि तीच त्यावेळेच रूपही आपल्या मनाला फारसं भावतं नाही .

 फुलपाखराच्या आयष्यात चार अवस्था असतात . सुरुवातीला अंडी मग अळी त्यानंतर #कोष# आणि शेवटी फुलपाखरू . बरोबर ? पानांमागे कधी अंडी दिसली तरी ते पान आपण झाडावरून काढून दुसरीकडे नेऊन ठेवतो . अळी दिसली कधी पानांवर तरी तेच करतो . कोष दिसला तर मात्र आपण त्याला काही करत नाही . का ? तर आपल्याला माहिती असतं की याचा आपल्या झाडांना आता काही त्रास होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून आज न उद्या फुलपाखरू बाहेर येणार . जे पाहायला आपल्याला नक्कीच आवडत  . बरोबर न . मग तर आपण अगदी वाट पाहू लागतो . रोज तो कोष कसा आहे , फुटला का ? त्यातून कुठल्या रंगाचं फुलपाखरु बाहेर येतंय याकडेही आपलं लक्ष असतं , हो न .

succcess आवडतो सगळ्यांना मात्र त्यामागची मेहनत , धडपड  नजरेआड करतो आपण . कुणीतरी म्हटलंय न " there is no shortcut to success "

फुलपाखरांच्या  अंड ते फुलपाखरू हा प्रवास खरंतर फार खडतर असतो . त्याच्या सगळ्या अवस्था पाहायला आपल्याला आवडत नाही  , आवडतं ते फक्त फुलपाखरू. त्याच्या जवळ  गेलं की ते उडून दुसरीकडे जाऊन बसत .  हातात येत नाही .  हात लावू देत नाही . जवळ येऊ देत नाही . त्याला आठवत तर नसेल त्याच्या आधीच्या अवस्थेत त्याला आपण दूर केलेलं ?

हेच आणि कदाचित असच आपण दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या  लोकांशी  वागतांना तर करत नाही  ना ?  आपलं लक्ष असतं फक्त यशस्वी लोकांकडे . फुलपाखरांच्या बाकी अवस्था जशा आपण दूर ठेवायचा प्रयत्न करतो तसच  आपण दैनंदिन जीवनात  करतोय का ?
काय वाटतं तुम्हाला  ?




#butterfly, #फुलपाखरूकविता, 

Sunday, 28 June 2020

वाद संवाद

वाद संवाद

The real in us is silent , acquired is talkative ...Said khalil Gibran

हे वाक्य एका ठिकाणी लिहिलेल वाचलं , आवडलं .  खूप छान वाटतं न वाचायला पण बोलल्याशिवाय राहवत नाही आपल्या सगळ्यांना . बर जे बोलायचं असतं ते पटकन बोलतो का आपण ? तर नाही ,  जो मुद्दा मांडायचा आहे त्यावर पोहोचायला पण खूप मोठी प्रस्तावना केल्याशिवाय सांगण्यात काय गम्मत असही वाटतं , हो न .

बोलता येणं हे मनुष्याला मिळालेलं वरदान आहे . स्वतःला काय वाटत , काय म्हणायचं आहे हे  दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हाही एक मनाला विसावा देणारा व्यायाम आहे . व्यायाम म्हंटलं न मी ? हो व्यायामच . जसं शारीरिक  व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहायला मदत होते तशीच मदत बोलल्याने , आपल्याला काय म्हणायचं आहे हे दुसऱ्यांना सांगितल्याने होते , खरं न ? कुणी बोलायला नसेल , किंवा कुणी आपलं ऐकणारा नसेल , कुणाला आपण सांगितलेलं काही  पटतच नाही , कुणी आपलं ऐकतच नाही अस त्या व्यक्तीला वाटत असेल तर  त्याच मन तेवढ सुदृढ राहत नाही ,  बरोबर .

कुणाबरोबर तरी संवाद साधावा अस वाटणं ही सर्वांची गरज आहे आणि संवादात वाद समाविष्ट आहे हे तर आपण सगळ्यांनी गृहीतच धरलंय त्यामुळे वाद जास्त वेळा होतात , संवाद कमी वेळा . होत न अस . चारजण जमले असतांना सगळे बोलू लागतात आणि मग सुरू होते आधी माझं ऐक ची race . मी बोलतो तू फक्त हु म्हण . असो तर ही race जशी सुरू होते तस मग सुरू होतं तुझं बरोबर की माझं बरोबर ही race .

वादे वादे जायते तत्वाबोध: ।

वाद केल्याने चांगले तत्वविवेचन होऊन ज्ञानवर्धन होते

 यातला वाद आणि आपण सगळे एकमेकांबरोबर घालतो तो वाद फार निराळे आहेत  हो न ?




कधी छोट्या मुलांनी त्यांना न पटलेली गोष्ट का करायची अस विचारलं की मोठे म्हणतात जास्त प्रश्न विचारू नको , जे सांगितलं ते कर , वाद घालू नको .  त्यामुळे त्यांची जिज्ञासा तर मारली जाते आणि त्याबरोबर लुप्त होतं ज्ञान . प्रत्येक गोष्ट करण्यामागे काही कारण असतं .  ते ज्ञान जर पुढे गेलंच नाही तर लोप पावणारच . असो  .

कुठलीही व्यक्ती वाद घालतांना तिला काय वाटतंय ते दुसऱ्यांना सांगत असते  कान बंद करून . मात्र संवाद करतांना कान , डोळे आणि मेंदू या सगळ्यांचा उपयोग त्या व्यक्ती करत असतात . संवाद करतांना Eye contact ही तेवढाच महत्वाचा असतो . बरोबर न .

संवाद करता करता गाडी कधी वादाच्या दिशेकडे जाते हे लक्षात येत नाही .

संवाद म्हणजे विविध प्रकारचे विचार, माहिती, कल्पना, भावना आणि जाणिवांचे आदान- प्रदान . तसेच संवाद म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे किंवा अनेकांकडे आपले म्हणणे अनुरूप माध्यमांव्दारा पोचवणे.

संवाद म्हणजे अशा आदान- प्रदानाची, अनुरूप माध्यमांव्दारे आपले म्हणणे पोहचविण्याचे कलाशास्त्र आणि कौशल्य .

वाद घालण्याचे कौशल्य लवकर आत्मसात होत मात्र संवाद करण्याचं कौशल्य हे शिकावं लागतं . ते आत्मसात करण्यासाठी मेहनत करावी लागते . संगीतातही वादी संवादी स्वर असतात . तिथे मात्र वाद जास्त महत्वाचा असतो , राजाच म्हणा न आणि संवादी हे त्याचे मंत्री . एखाद्या रागाची चाल स्पष्ट करण्यासाठी संवादी स्वर वादी स्वरांना मदत करतात याउलट बोलतांना वादापेक्षा संवाद जास्त महत्वाचा असतो .  जसे संगीतात राग शिकतांना वादी संवादी स्वर लिहून , लक्षात ठेवून , पाठ करून , संगीत शिकायला सुरुवात केली जाते तशीच सुरुवात बोलण शिकतांना वाद आणि संवाद यांचेही स्वर लिहून मिळाले , पाठ करता आले आणि शिकता आले तर ?

तर वाद , संवाद कसा छान होईल  याची दिशा स्पष्ट करतील . हो न ? मंत्र्यांच काम राजाला मदत करणं हेच तर आहे , काय वाटतं तुम्हाला ?





##वादसंवाद, #वादेवादेजायतेतत्वाबोध:,






Saturday, 2 May 2020

खरं

खरं


संध्याकाळी छान वारा होता म्हणून बाहेर बसले होते . आकाशात चंद्रकोर दिसत होती .  खरं तर खूप शांत वाटत होतं , सहज एक लहानपणीची गोष्ट आठवली ...... चांदोबाचा अंगरखा . चांदोबाची आई त्याच्यासाठी एक अंगरखा शिवते , चांदोबा रोज थोडा थोडा मोठा होतो आणि अंगरखा लहान . तसच काही दिवसांनी याउलट होतं .

 आकाशात कधी चंद्र मोठा दिसतो , कधी लहान हे पाहिल्यामुळे लहानपणी ती गोष्ट खरी वाटते . हळूहळू जेव्हा अमावस्या , पौर्णिमा , दिवस , रात्र  कसे होतात हे कळल्यावर तो लहानपणीचा बलिशपणा आठवून हसू येतं . खर तेही असतं आणि हेही.

लहान मुलं सुद्धा जेव्हा एखादा प्रसंग किंवा काही माहिती मोठ्यांना देतात तेव्हा सांगितल्या नंतर म्हणतात .....खरंच .
किंवा कुणी त्यांना काही सांगितलं तर विचारतात ......खरंच ?

या सांगण्यात , विचारण्यात निरागसपणा असतो ......कधी त्यांना ते नक्की तसंच आहे नं असं विचारायचं असतं कारण हीच माहिती मग ते लक्षात ठेवतात किंवा कधी त्यांना ते मित्रांमध्ये सांगायचं असतं आणि मिरवायचं असतं .......पहा , मला माहिती आहे , तुम्हाला नाही असं चिडवायचं असतं मित्रांना...
हो नं .

खरं सांगायचं तर .......अशी सुरुवात बोलतांना खूपदा केली जाते ..... त्या प्रसंगाच वजन वाढावं म्हणून असेल कदाचित .

खरं तर ,  खरं आणि सत्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत .

सत्य हे कुठल्याही परिस्थितीत बदलत नाही .......पण खरं मात्र परिस्थिती नुसार , कधी वेळेनुसार , कधी व्यक्ती नुसार हे बदलू शकतं .

जसं मुलं सांगतात , मी बाहेर खेळायला गेलो खूप मज्जा येत होती आम्हा सगळ्या मित्रांना , पण ते काका रागावले . आवाज करू नका म्हणाले . ते म्हणाले तुम्ही मुद्दाम आम्हाला त्रास व्हावा म्हणून इथें खेळता , पण खरंतर त्यांच्या घरासमोर ग्राउंड आहे मोठ्ठ खेळायला म्हणून खेळतो आम्ही तिथे . यात मुलांना आणि काकांना वाटणार त्यांचं त्यांचं ,  त्यांना वाटणारं खरं असतं .

एक joke वाचला होता काही दिवसांपूर्वी , संध्याकाळी lights गेल्यावर होणाऱ्या प्रसंगांचे नवरा बायकोने केलेले वर्णनं ......नवरा सांगतो , lights नसल्यामुळे TV , news काही पाहता आला नाही , मेणबत्तीत जेवण करावं  लागलं , कंटाळा आला  तर बायको म्हणते काय मस्त वातावरण होतं , छान candle light dinner घेतलं ,  कित्तीतरी दिवसांनी आम्ही नवरा बायकोने इतक्या गप्पा मारल्या. खरं तर दोन्ही वर्णनं खरीच आहेत , ते त्यांच त्यांचं त्यांना जाणवणार खरं आहे . खरं न .

खूपदा आपल्याला जाणवतं , एकाला वाटणार खरं , दुसऱ्याला तसंच वाटेल असं नसतं .

खरं हे कितपत खरं असतं , हे त्या सांगणाऱ्या वर , कुणाला सांगतोय या वर पण अवलंबून असतं .


जसं खरं आणि सत्य निराळे आहेत तसंच खरं आणि बरोबर हे पण निराळे आहेत . जे खरं आहे ते बरोबर असेलच असं नाही आणि जे बरोबर आहे , तेच खरं असेल असही नाही .

प्रत्येकाचं खरं हे त्याचं त्याचं खरं असतं . काय खरं आहे हे प्रत्येक व्यक्ती स्वतः च्या अनुभवानुसार , त्या त्या व्यक्तीच्या विचारानुसार , कुवतीनुसार ठरवते .

एकाच प्रसंगाच्या वेळी उपस्थित असणारे लोकं जेव्हा तो प्रसंग दुसऱ्याला सांगतात त्यावेळी त्यात थोडा थोडा बदल होत जातो , कारण त्या प्रसंगा बरोबर जोडले जातात , त्या प्रसंगात असणारे लोकं , पाहणाऱ्यांचे पूर्वीचे अनुभव  किंवा कधी कधी ......त्या व्यक्तीं बरोबर असलेले किंवा नसलेले संबंध , कधी राग , कधी द्वेष , कधी ईर्षा , कधी प्रेम ,  कधी मैत्री , कधी नातं , कधी अजून काही . त्यामुळे त्या प्रसंगाकडे पाहण्याचा आणि त्या प्रसंगाचा अर्थ काढण्याचा दृष्टिकोन ही वेगळा होतो आणि मग तयार होतं प्रत्येकाचं खरं , खरं नं .

खरं हे नेहमी खरं असतं का ? की आपल्याला जे बरोबर वाटतं ,  जे मनाला पटत , कधी जे आपल्या फायद्याच असतं , कधी आपले पूर्वग्रह असल्याने जे आपण मनाने ठरवतो त्याला आपण खरं म्हणतो ?  कि जे समोर दिसतं , अनुभवता येतं ते खरं असतं ?

आता मी लिहितेय ते खरं असेलही कदाचित , पण ते मला जाणवणार खरं आहे ......तुमंच खरं हे अजून निराळं असू शकतं ......खरं नं ?




#चांदोबाचाअंगरखा