Followers

Sunday, 27 October 2019

सुगंध

सुगंध

 सुगंध म्हंटल की आठवतो निरनिराळ्या फुलांचा सुगधं , अत्तर , सुवासिक तेल, निरनिराळ्या साबणाचा सुगंध अजून जर विचार केला तर चंदन , कस्तुरी , केशर असे कितीतरी सुगंध आठवतात .

चंदनाचा जसा सुगंध असतो तसाच तो हळदीलाही असतो .....ओल्या हळदीचा सुगंध फार सुंदर येतो ......जसा कस्तुरी , केशराचा सुगंध सुंदर येतो तसाच जायफळ वेलचीचाही आवडतो ......विचार करायला सुरुवात केल्यावर लक्षात येतंय .....कित्ती प्रकारचे निरनिराळे सुगंध आहेत .

सुगधं म्हणजे आपल्याला आवडणारे जे गंध आहेत ते ......आणि जे आपल्याला आवडत नाहीत ते दुर्गंध ......पटत नाही ?  पहा साधं उदाहरण घ्यायचं तर ऑइलपेंट चा गंध काहींना आवडतो तर काहींना आवडत नाही , तसच पेट्रोल , रॉकेल किंवा सफेदी करतांना येणारा चुन्याचा गंध  कुणाला आवडतो कुणाला नाही . एखाद्याला लसणाच्या फोडणीचा गंध आवडतो , कुणाला शेपू च्या भाजीचा गंध आवडतो ,कुणाला नाही आवडत. प्रत्येकाची आवड निराळी ......व्यक्ती तितक्या प्रकृती , बरोबर न ....कुठल्या गंधाला सुगंध म्हणायच हे त्या त्या  व्यक्तीनुसार ठरतं .


मराठी किती मजेदार भाषा आहे न ......फुलांचा सुगंध , चहा कॉफीचा किंवा कुठला मंद सुगंध हा दरवळतो  , एखाद्या खाद्य पदार्थाचा  घमघमाट सुटतो  , दुर्गंधी पसरते , दर्प येतो . आपण ठरवून टाकलंय दरवळला म्हंटल म्हणजे मंद आवडणारा गंध असणार , घमघमाट सुटला म्हणजे खाद्यपदार्थशी निगडित काही असणार मग तो पूर्वी घरात मसाला कुटल्यानंतर घरभर पसरलेला सुगंध ही असू शकतो . दर्प म्हणजे कुठला तरी उग्र गंध असणार आणि न आवडणारा गंध हा आपली परवानगी न घेता पसरणार . काय ?


यावरून आठवलं ....एकदा मी एका माझ्या UP च्या मैत्रिणीकडे जेवायला गेले होते .....तिच्या घरात जाताच  तिने भाजीला घातलेल्या फोडणीचा सुंदर वास आला .....ती समोर दिसल्याबरोबर मी तिला आपल्या मराठी  हिंदीत म्हंटल ....." क्या बास आ रहा है ....वा " .......ती म्हणाली  "कैसा बास " म्हंटलं " सब्जी के बगारका " ती म्हणाली " आवडला नाही का " म्हंटल , "अग खूप छान आहे , आवडला म्हणून तर म्हंटल " ती म्हणाली " अग मग बास काय म्हणते , खुशबू  म्हण , सुगंध म्हण . खूप हसू येत आजही हे आठवलं की .

सुगंध फक्त फुलांचे , अत्तर किंवा सुवासिकच असतात का ? कधी बाहेर गेलो असतांना कुठेतरी कुणी वरणाला घातलेल्या फोडणीचा , तर कधी कढी चा , तर कुठे पुरणाच्या पोळीचा , कुठे मस्त पावभाजीचा , कुठे पहिल्या वाफेच्या भाताचा ......असे कितीतरी सुगंध येतात आणि त्या वरणाच्या सुगंधवरून आठवण येते एखाद्या आजीची , काकुंची ज्या अस वरण खूप छान करतात , कढीवरून , पुरणाच्या पोळीवरून कुणाला आठवते आई , भातावरून कुणाला आठवत लहाणपणी शेजारच्या काकुकडच जेवण , पावभाजीवरून आठवते एका पार्टीत केलेली धमाल ......अजून कितीतरी ........

प्रत्येक गंधाची आपली अशी एक आठवण  असते .... शिशिर ऋतु संपताना जो एक खाली पडलेल्या वाळलेल्या पानाफुलांचा गंध असतो , शुष्कता असली वातावरणात तरीही ती झाडांना नवीन येणाऱ्या पालवीची नांदी असते . मार्च एप्रिल मध्ये  टप्पू लागणाऱ्या झाडाच्या  त्या पिवळ्या , गुलाबी फुलांचा सुगंध आला की मला नेहमी परीक्षेचा सुगंध येतो . मोगऱ्याचा पहाटे येणारा सुगंध आता शाळेला सुट्टी आहे याची आठवण आणतात ......मग त्या लहानपणी आपल्या शाळा असोत की आत्ता मुलांच्या शाळा . जून जुलै मध्ये मृदगंध जसा पावसाची ,आणि पावसाबरोबर जोडलेल्या  निरनिराळ्या गोष्टींची , अगदी गरम कांदा भजीचीही , कितीतरी  चिंब चिंब भिजलेल्या आठवणीना उजाळा देतो , तसच त्यावेळी घरी आणलेल्या नवीन पुस्तकांचा सुगंध शाळा सुरू होण्याच्या वेळी झालेल्या कितीतरी मजेदार आठवणींची आठवण देतो . संध्याकाळी येणाऱ्या जाई, जुई, पारिजातक यांचे सुगंध गणपती महालक्ष्मी जवळ आल्याची आठवण देतात. नवीन कपड्यांचा  , घराघरातून येणारे चिवडा ,चकली , शंकरपाळे यांचे  सुगंध दसरा दिवाळीची आठवण देतात . बारूदीचा गंध काहींना आवडतो काहींना नाही .....तो गंध दिवाळीची आठवण तर देतोच पण त्याबरोबर जोडल्या असतात कितीतरी दिवाळीतल्या मजेदार आठवणी .  त्यावेळी ती बारूद गोळा करून मग ती पेटवल्यावर होणारा तो जाळ , तो जळका वास , तो भुस्स होणारा आवाज आणि ती करतांना आलेली मजा . काय ....आठवलं न ते बारूद गोळा करण्यासाठी पहाटे उठल्यावर आधीच्या रात्री अर्धवट जळलेले फटाके शोधणं ......

हिवाळ्यात येणारा तो जळक्या रबर tube चा वास कोणीतरी शेकोटी पेटवल्याची जाण देतो .....कुठे कधी त्यावर हलकेच तरंगत येणारा चहाचा सुगंध कुठल्यातरी ट्रिपवर गेलो असतांना पावसात , थंडीत कुडकुडत  टपरीवर घेतलेल्या त्या स्वादिष्ट चहाची आठवण आणि त्याबरोबर अजून काही त्या ट्रिपच्या आठवणी ताज्या करतो .



नुसत्या गंधाने आठवणी ताज्या होतात , जाग्या होतात म्हणू हवं तर ........मग तो आवडणारा गंध असो अथवा नसो , आठवणी जाग्या होतात हे मात्र नक्की .

 अत्तर जस  नेहमी छोट्या कुपीत ठेवलं असतं घट्ट बंद करून तशाच या आठवणी सुद्धा . जसं त्या कुपिच झाकण उघडल्या जातं तसा सुवास  पसरायला सुरुवात होते , झाकण बंद केलं तरी थोडा वेळ तो सुवास जाणवत राहतो , जर तो आपल्या कपड्यांवर लावला तर कितीतरी दिवस जाणवत राहतो . तसच तर आहे आपल्या आठवणींच्या कुपीचंही . प्रत्येक गंधाशी आपली एक आठवण जोडलेली असते . ती आठवण सुगंधी आहे की नाही हेही माहिती असत .  गंध येवो अथवा न येवो आपल्याला आपली ती कुपी कधीही उघडून  अनुभवता येते .

खरचं कित्ती अश्या गंधाच्या कुप्या जमल्या आहेत आपल्या सगळ्यांकडे . कुठली केव्हा उघडावी हेही आपल्या हातात आहे . कुठली उघडली तर मन सुखावणारी संवेदना मिळणार , कुठली मनाला त्रास देणार हेही माहिती आहे , कुठली कुपी मनाला प्रफुल्लित करेल , कुठली स्वर्गीय दुनियेत नेईल , कुठली धुंद करेल, कुठली उदास . कुठली कुपी उघडावी , कुठली सर्वत्र शिंपडावी , कुठली कुणाबरोबर वाटून घ्यावी , कुठली आपल्या एकांतात उघडावी , कुठली केव्हा उघडावी ........ सर्व सर्व काही आपल्याच हातात आहे ......हो न . ठरवा तर मग तुम्ही तुमच्या कुपीचा क्रम .

जाणतेपणी असो अथवा अजाणतेने.......आपण सर्व जी कुठली कुपी उघडू ती सुगंधाचीच असो हीच मनीषा .


#अत्तर  #सुगंध




Monday, 21 October 2019

नाव

नाव

What's in name ........shekespeare ने म्हटलंय...........पण खरंच असं आहे का ?

बाळाचा जन्म होतो न होतो त्याला आशीर्वाद दिल्या जातो .......नाव मोठं करेल हो हा/ ही घरांण्याचं .....बारसं झालं की अजून एक आशीर्वाद मिळतो .........नावाप्रमाणेच होईल  ......किंवा नाव उज्वल करेल ......

बारशाच्या वेळी आई , बाबा किंवा अजून कोणी साजेसं म्हणा किंवा त्यांना आवडतं ते नाव ठेवतात आणि मग त्या नावाने ते बाळ ओळखल्या जाऊ लागत .
काही खोडकर बाळांना जर नाव कृष्णाचं असेल तर लगेच नावातच कृष्ण आहे त्याच्या .....मग खोडकर तर राहीलच ना तो .....असं आईला म्हंटल जातं ......हे आणि असं अजून कितीतरी . आधी कृष्णाच्या बाल लीला जरी म्हणाल्या गेल्या तरी नंतर याच  लीलांना मग कधीकधी कुठेतरी आळा घालण्याचीही वेळ येते .


लहानपणी कौतुकाने नाव ठेवलं जातं आणि मोठं व्हायला लागलं की नावं ठेवली जातात .

एखाद्याला झेंडू म्हंटल जातं तर कुणाला येडपट तर कुणाला झाशीची राणी तर कुणाला hero तर कुणाला काही .........

यातही ठेवलेली नाव ही कधी कौतुक करण्यासाठी असतात तर कधी चिडवण्यासाठी तर कधी उपहास करणारी तर कधी इर्षेने दिली जातात .

सगळ्यात मोठी गंमत ही की कधीही .....म्हणजे अगदी कधीही नाव किंवा नावं ही दुसरी व्यक्तीच ठेवतात .....स्वतः आपण आपलं नाव किंवा आपल्याला नावं कधीच ठेवत नाही .......ना लहानपणी ना मोठेपणी

खरं तर आपण आपलं नाव affidavit करून बदलू शकतो 18 वर्षाचे झाल्यावर , मात्र फार कमी लोक याचा उपयोग करतात ......कदाचित तोपर्यंत एकतर आपण त्या नावाला आपलंसं केलं असतं किंवा ते आवडायला लागलं असतं . खूपदा त्या नावाशी आपलं खूप घनिष्ट असं नातं नकळत जुळलं असतं .......कारण काही असो.

ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली अशी गोष्ट आहे जी दुसऱ्यांनी दिलेली असली तरी ती आपली वाटते , त्यावर आपण प्रेम तर करतोच पण गंमत म्हणजे आपलं नाव आपल्यापेक्षा बाकीचेच जास्त वापरतात तरीही आपल्याला राग येत नाही.


लहानपणी ठेवलेली नाव .....म्हणजे छोटू ,चिंगी , बेबी , पिंकी, बाळू , मुन्नी , पिंटू ही आणि अजून अशा प्रकारची नाव तर अशी चिकटतात की ती व्यक्ती आजी , आजोबा झाले तरी बेबी आणि बाळूच राहतात . असं जेव्हाही आपण पाहतो आणि आपल्याला असं नाव नसेल तर फार हसू येत ......पण जर का आपलही असं नाव असेल तर मात्र खूप राग येतो , कोणाचा ?  तर अर्थातच आई बाबांचा , फार सोपं असतं न ते . असो.....
ज्याचं पोळत त्याला कळतं ......
कारण ही नावं चिडवण्याचं एक साधनही असतात .

शेक्सपिअर जर खरंच भेटला तर ,  तर खूप लोक त्याला तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या असं सांगायला  आंदोलन करतील . आजूबाजूला बघा , राजा नाव असलेला रंक दिसतो , जुई नाव ऐकलं की वाटत छोटी नाजूक मुलगी असेल , भ्रमनिरास होतो , आशा डिप्रेशन मध्ये गेलेली दिसते , तर कधी गणेश बुद्धू असतो , लक्ष्मी गरीब असते तर छोटू मोठ्ठा असतो .....ही विसंगती नेहमी दिसतेच अस नाही तरीही जाणवते खूपदा .

एक जाहिरात आली होती काही दिवसांपूर्वी की आता प्रत्येकाजवळ मोबाईल आहे त्यामुळे त्याला , तिला  त्या no. नी च संबोधण्यात येईल .  प्रत्येक no हा  अद्वितीय असतो , एकासारखा नसे दुसरा   ......नावच नसेल तर त्याबद्दचे अंदाजही बांधल्या जाणार नाहीत आणि भ्रमनिरासही होणार नाहीत , विसंगती आहे असंही वाटणार नाही . असं जर कधी खरंच झालं तर मात्र शेक्सपिअर च म्हणणं खरं होईल ........

नावात काय आहे ?


#williamshakespeare , #what'sinname 

Sunday, 13 October 2019

वाढदिवस

वाढदिवस

वाढदिवस कि जन्मदिवस ........

आपल्याकडे भारतात वाढदिवस साजरा केल्या जातो ......आपण जन्मदिवसाच्या शुभेच्छा कमी वेळा म्हणतो .

पूर्वीपासून  ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला ओवाळून त्या दिवसाची सुरुवात केली जाते ..... देवाचा , घरच्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या वर्षाची सुरुवात करायची पद्धत अजून सुरु असली तरी आता birthday , wedding anniversary या शब्दांनाही महत्व आलं आहे .......यावरून आठवलं , एक काकू होत्या , आमच्या घरी नेहमी यायच्या. एक दिवस येतांना केक घेऊन आल्या , कसला विचारलं तर म्हणाल्या , आज आमच्या लग्नाचा birthday आहे . आम्ही लहान होतो , खूप हसलो . आता अस वाटतं , किती निरागसता होती त्यात , लग्नाचा वाढदिवस म्हणायचं होत त्यांना . रम्य ते दिवस , त्यावेळी झालेल्या छोट्या गोष्टींची गम्मत कित्ती दिवस पुरते .


 कुठलीही प्रथा जेव्हा सुरु होते त्यावेळी नक्कीच त्यामागे काही विचार असतो , जो त्या त्या वेळेप्रमाणे , काळाप्रमाणे , त्यावेळेच्या गरजेप्रमाणे , आवडीप्रमाणे किंवा काही सामाजिक बांधिलकी प्रमाणे बरोबरच असतो ........परिस्थितीनुरूप त्यात थोडेफार नंतर बदल होतात .....कधी होतही नाहीत......कधी ते कोणी चालू ठेवतं ,  कुणी सोडून देतं ...........अशाही प्रथा आहेत ज्याचं काही वेळा प्रयोजन काय असावं हा अंदाज येत नाही कारण त्यात परिस्थितीनुरूप बदल झालेले नसतात  .

लहानपणी सगळ्या छोट्या मुलांना वाटतं आपल्या वाढदिवसाला केक आणावी . कुठे पाहिल्यामुळे म्हणा किंवा केक आवडते म्हणून किंवा सजवलेल्या केकच आकर्षण म्हणून म्हणा .....काही घरी मात्र हे केल्या जात नाही .....कारण हेच की ही आपली पद्धत नाही .....आपण दिवा विझवत नाही वगैरे वगैरे .....मुलं छोटी असल्यामुळे त्यांचा हिरमोड होतो.......खरतर प्रत्येक ठिकाणी काही तोडगा निघू शकतो जेणेकरून मुलांचा हिरमोड पण होणार नाही आणि जुन्या लोकांना पण वाईट वाटणार नाही .  जेवढे आयुष्यातले वर्ष संपले तेवढ्या मेणबत्त्या फुंकर मारून विझवून नविन वर्षाची सुरुवात करण्याची पाश्चात्य पद्धत आहे ...... हीच मेणबत्त्या लावण्याची पद्धत थोडी बदलली तर .......म्हणजे जेवढे वर्ष वयाचे संपले तेवढ्या मेणबत्त्या ठेवण्याऐवजी जे वर्ष सुरु होतंय तेवढया ठेवल्या तर ......फुंकर मारुंन विझवायच्या ऐवजी केक वर ठेवून पेटवल्या तर .... तर सगळेच खुश , हो न .

वाढदिवसच नाही तर अशा कितीतरी  ज्या दुसऱ्या धर्मातल्या किंवा प्रांतातल्या , देशातल्या प्रथा आहेत त्या आपण आवडल्या म्हणून आपल्या करू शकतो ......त्यात थोडेफार बदल करून ....... शेवटी प्रथा ही असते काय ......तर एखादा सोहळा , प्रसंग साजरा करण्याची पद्धत जी सारखी सारखी खूप लोकांनी  केली की ती प्रथा म्हणून ओळखल्या जाते .


वाढदिवस वर्षातून एकदा जन्मदिवशी साजरा करतात सगळे . बरोबर न  .  जन्मदिवस जरी वर्षातून एकदाच येत असला तरी वाढदिवस मात्र रोज असतो सगळ्यांचा . कसा ?  बघा ह, बाळ एक दिवसाच असतं , दुसऱ्या दिवशी 2 दिवसाच होत , मग 3 , मग 4 , अस वाढतच जात ......365 दिवसांनी एक वर्षाच होतं . बरोबर न . वाढ आपल्या सर्वांची रोजच होत असते . मग एक वर्षाने वाढदिवस साजरा करण्यामागे कारण काय असू शकेल ?

लहान बाळात होणारी वाढ , बदल हा दिवसागणिक लक्षात येतो नंतर ही वाढ हळू हळू व्हायला सुरुवात लागते . वाढ ही फक्त शारीरीकच नाही तर बौद्धिकही व्हायला सुरुवात होते .

कधी जुने फोटो जर पाहिले तर लक्षात येतो आपल्यालाही तो होणारा बदल . चेहऱ्यात  चेहऱ्यावरच्या भावात होणारा बदल , उंचीत , जाडीत  , वागण्यात होणारा बदल . कपड्यांच्या , वागण्याच्या , केसांच्या style मध्ये होणारा बदल . वाढ फक्त शरीराचीच होत नाही , तर वाढ होते   मित्रांच्या संख्येची , कराव्या लागणाऱ्या अभ्यासाची , विविध उपक्रमांची , मुलांच्या नखऱ्याची सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचारांची . छोटी मुलं सुरुवातीला सगळं सांगितलेलं ऐकतात नंतर सुरू होतात हट्ट ......शिंग फुटले यांना म्हणतो न आपण ...... त्यांचा मेंदू जसा जसा develop होत जातो तसे तसे ते तर विचार करतातच आणि मोठ्यांनाही विचार करायला भाग पाडतात . कधी प्रश्न विचारून तर कधी वाद घालून , कधी हट्ट करून तर कधी त्यांचे एखाद्या विषयावरचे तर्क सांगून . जो तर्क कधी सुचला नसतो ,  तो मुलांच्या सानिध्यात शिकतात आईबाबा . वाढ फक्त लहान मुलांचीच नाही तर मोठ्यांचीही होतच असते .

वाढदिवसाची लहानपणी जेवढ्या उत्साहाने वाट पहिल्या जाते तेवढी मग ती काही वर्षांनी पहिल्या जात नाही . कुठल्याही वयात वाढदिवस साजरा करायला आवडतोच मात्र मधल्या काही वर्षात हे वाट पाहणं कमी होतं . आपण मोठे होतोय , आयुष्यातली वर्ष कमी होतायत ,  अजून किती काय काय करायचं आहे , शिकायचं आहे ,  किती जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत ही जाणीव ते वाट पाहणं कमी करत . थोड्याच दिवसात लक्षात येत , अरे हा आनंद कित्ती छान आहे , मित्रांबरोबर , आपल्या लोकांबरोबर तो दिवस घालवायला किती मजा येते . बाकी सगळं तर सुरूच राहणार आहे त्यातुन मनाला विसावा म्हणजे यातल्या गंमतीचा मिळणारा आनंद. तो मनाला मिळणारा आनंद , ते समाधान परत सुरू  करतो वाढदिवस साजरे करणं .

लहानपणी कोण काय gift देईल याकडे लक्ष असत तर नंतर माझ्या लोकांच्या , मित्रांच्या वाढदिवसाला मी त्यांना कसा आनंद देऊ शकेन , तो त्यांचा दिवस मला किती सुंदर करता येईल या दृष्टीने विचार करणं सुरू होतं . कधी अचानक भेटीचा लाभ , तर कधी surprise पार्टी , कधी आवडता पदार्थ खायला करून घालणं, तर कधी कुठे तरी सहल , कधी नुसतं एकमेकांबरोबर असंख्य गप्पा , तर कधी अजून काही . पूर्वी लहानपणी आज मला काय मिळेल या विचारापासून जी सुरुवात होते ती मग आज मी काय देऊ , काय करू  माझ्या लोकांसाठी  पर्यंत जाते . हीच तर होणारी प्रत्येकाची वाढ आहे .


हाच तर खरा वाढदिवस . जो सगळ्यांचा रोज असतो . रोज भेटणाऱ्या लोकांकडून , मित्रांकडून , घरच्यांकडून , मुलांकडून तसच येणाऱ्या निरनिराळ्या प्रसंगातून आपण शिकत जातो , शरीराची वाढ तर आपोआप होत असतेच मात्र आयुष्यातले  निरनिराळे प्रसंग बुद्धीचा विकास घडवत जातात . बुद्धी जशी जशी विकसित होत जाते तसे तसे आपली विचारांवरची पकड घट्ट व्हायला लागते , विचारांना एक दिशा मिळते . विचार परिपक्व होतात , प्रगल्भ होतात . प्रगल्भ विचार मनाला  , आत्म्याला  उन्नत करायला मदत करतात .

शरीराची वाढ होते ,  बुद्धी विकसित  होते ,
विचार प्रगल्भ होतात आणि  आत्मा उन्नत होतो.

 ज्या ज्या दिवशी मनाला आतून अगदी मनापासून आनंद होईल ,  शांतता मिळेल , समाधान वाटेल तो तो दिवस वाढदिवस , तोच उत्सव .

आपल्या सर्वांना असे वाढदिवस  नेहमी अनुभवता येवो हीच मनीषा .


Saturday, 5 October 2019

खोकला

खोकला


सर्दी आणि खोकला दोघ मित्रच . एकमेकांना सोडून फारसे राहत नाहीत . फरक एवढाच की सर्दीचा त्रास फक्त ज्याला झालीय त्याला होतो मात्र खोकला हा सर्वांना त्रास देतो . ज्याला झालाय त्यालाही आणि ऐकणाऱ्यांलाही ...........दोन्ही साठी रुमाल हातात तयार असावा लागतो ........ जागा मात्र वेगवेगळ्या .

असं म्हणतात की जेव्हा आपण एकटे असतांना कधी हार्ट अटॅक येतोय अस जाणवलं तर खोकलण हा एक त्यावरचा तात्पुरता उपाय आहे .

आता भीती तर वाटत नाहीये न तुम्हाला की खोकल्यावरचे घरगुती उपाय मी सांगेन म्हणून?

खोकला हा काय ब्लॉग लिहिण्याचा विषय आहे  ? नसेलही कदाचित पण सध्या खोकला झालाय मला त्यामुळे तोच विषय म्हणून डोक्यात आला .

 सांगा बर  , खोकला ही एक कला आहे असं नाही वाटत  का तुम्हाला ?

छोटा नातू , आजोबा कसे खो करतात हे करून जेव्हा दाखवतो तेव्हा आजोबा सुद्धा न येणारा खोकला ,  आला आहे असं दाखवून परत खोकलतात आणि हसतात . त्यांची आणि नातवाच्या खोकलण्याची कला ते एकमेकांसमोर सादर करत दोघंही आनंद घेत राहतात आणि असेल आजी , आई , बाबा कुणी अजून तिथे तर सगळेच या खो कलेचा  आनंद घेतात .

कुठे बाहेर गेलो असताना , कुठल्या लग्नात , कार्यात किंवा अजून कुठे जर कुणाचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तेव्हाही ही खो कलाच कामात येते . येते न ?

कधी फोन वर बोलतांना थोडा वेळ हवा असेल विचार करून उत्तर द्यायला ,त्यावेळीही ही खो कला त्यात  मदत करते . कधी ऐकू आलं नाही हे दाखवायला सुद्धा ही खो कलाच मदतीला घेता येते .....त्याच क्षणाला एकदम जोरात खो कला सादर होते. फोन वर बोलणं थांबवायचं असेल तेव्हाही हीच खो कलेची उबळ पटकन प्रात्यक्षिक देते .

लहान मुलांना शाळेत जायचं नसेल तर पोटदुखी सारखच सांगता येणार हे एक हंमखास पचनी पडणार कारण . सकाळी उठल्यावर खो कला सादर केली की लगेच आई कपाळाला हात लावून बघते , मग थोडी कला अजून सादर केली हात गळ्यावर ठेवून , घसा दुखतोय अस दाखवलं की मोहीम फत्ते झालीच म्हणून समजा . अर्थात ती पण आईच असते , त्यामुळे तिच्या मुलाला ती छान ओळखत असते . खो कला जर या आधी सादर झाली असेल तर लगेच मोहीम फत्ते होत नाही .  काही दुसरा गनिमी कावा करावा लागतो . इतर कुणालाही खो कला फसवू शकते पण आईला नाही . काय ? बरोबर न .

हीच खो कला घरून ऑफिस मध्ये फोन करून , आज ऑफिसला यायला जमणार नाही हे सांगताना सादर करण ही तर आयुष्य जगण्याची एक आवश्यक कला होऊन जाते . हो , सुट्टी मिळणार कधी आणि कशी ? काम तर टेबल वर अमाप असतात , संपता संपत नाहीत , मग हीच कला अशावेळी आधार देते.
बरोबर न . काम आणि आयुष्य यांचा समतोल राखणं आजकाल फार कठीण होत जातंय , कदाचित सगळ्याच गोष्टींचा वेग फार वाढलाय , मग कुठेतरी सुट्टी नावाचा ब्रेक लावला की वेगावर नियंत्रण ठेवायला मदत होते . हो न .

खाकरण हे खोकल्याच पिल्लू .....काही लोकांना सारखं मध्ये मध्ये खांकरण्याची सवय असते . अस करण्यामागे कधी त्यांना होणारा त्रासही असू शकतो तर कधी लक्ष वेधून घेणं हेही असतं , कधी कधी जाणवतं ते   प्रामुख्याने तिथे असणाऱ्या लोकांना स्वतःच्या असण्याची , अस्तित्वाची जाणीव करून दयायचा प्रयत्न करत असतात . घरीसुद्धा कधी कधी आजोबा , बाबा किंवा कुणी वडीलधारी मंडळी मी घरी आलो हे सांगायला हा खाकरण्याचा मार्ग अवलंबतात , मग लगेच आजी किंवा कुणी त्यांना पाणी द्यायला जातात . दिसत न हे चित्र घराघरात . म्हणून तर मला वाटतं की ही एक कला आहे जी खूप वेळा , खूप ठिकाणी , निरनिराळ्या कारणांसाठी सादर केली जाते .

भाषण देतांना , कधी वादविवाद स्पर्धा सुरू असताना , तर कधी एखादया मीटिंग मध्ये विचारलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायच्या आधी थोडा विचार करायला वेळ घ्यायचा असेल त्यावेळीही ही खो कला मदत करते . पाणी पिता पिता थोडा विचार करायला वेळही मिळतो आणि काय बोलायचं हेही ठरवता येत, बरोबर न ? आपल्या पैकी पुष्कळांना या कलेने कधी न कधी नक्की मदत केली असेल.

आधी रणांगणावर मावळे लढायला जातात , त्यानंतर  थोडे मोठे सरदार , मग अजून मातब्बर सरदार ,  त्यानंतर मग शेवटी  राजा . अशी चढती , उतरती भाजणी कुठल्याही क्षेत्रात असते , मग ते कुठलंही ऑफिस का असेना . तसच ही खो कला सादर करतानाही असाच चढता क्रम वापरण्यात येतो , आधी खाकरण , मग साधा खो खो , मग थोडा मोठा आणि शेवटी खो कलेची उबळ .

असा हा की ही ...... खो कला .......केव्हाही , कुठेही , कधीही आपल्या दिमतीला हजर राहून आपलं उद्दिष्ट साध्य करायला नेहमी तत्पर राहो हीच मनीषा .