Followers

Saturday, 22 May 2021

महाराणी येसूबाई

 महाराणी येसूबाई




संभाजी महाराज लिहिल्यावर प्रकर्षाने वाटलं राणी येसूबाईंबद्दल लिहावं . महाराणी येसूबाई यांची ओळख संभाजी राजांच्या पत्नी इतकीच बहुतांशी लोकांना माहिती आहे . त्यांच्याबद्दल इतिहासात फारश्या नोंदी आढळत नाहीत  . 


येसूबाईंच्या आयुष्याचा आढावा घेतांना त्यांचं आयुष्य roller coaster सारखं होतं हे जाणवतं . वयाच्या लहानपणी अगदी 6,7 वर्षांच्या असतांना त्यांचा शंभुराजांबरोबर  विवाह झाला .  जिजाऊंच्या मायेच्या सावलीत  त्यांची मानसिक , राजकीय जडण घडण झाली . 



 निरनिराळे लहान मोठे प्रसंग , वादळं त्यांच्या आयुष्यात येतच राहिले . त्यातून त्या शिकत गेल्या आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व फुलत गेलं . खरंच , काय आणि किती कंगोरे लिहावे या व्यक्तिमत्वाचे . 


संभाजीराजे आग्र्याहून सुखरूप गडावर परत येण्यासाठी त्यांच्या मृत्यूची सगळीकडे पसरवलेली बातमी खरी वाटावी म्हणून शिवाजीराजांनी त्यावेळी केलेलं हे  नाटक असलं तरी त्यात होरपळल्या येसूबाई . कोवळ्या वयात त्यांना तसं जीवन  अल्पकाळासाठी का होईना ,  जगावं लागलं . 



त्यांच्यातल्या कुशल ,कर्तृत्ववान स्त्रीला शिवाजी राजांनी ओळखल्या मुळेच   जिजाऊंनंतर शिक्के कट्यारीचा मान त्यांनी येसूबाईंना दिला .  मिळालेल्या शिक्के कट्यारीच्या आनंदावर  , शिवाजीराजांच्या विश्वासाला पात्र ठरल्याच्या अभिमानावर ,   कर्तृत्वावर मात्र सोयरबाईंच्या सवतेपणाच , असूयेच सावट नेहमीच राहिलं . याची जाणीव त्यांना होती तरी कधीही त्याबद्दल  तक्रार न करता त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं . 


कितीतरी वेळा त्यांना असंख्य  लोकांच्या टोचणाऱ्या नजरांचा सामना शांतपणे करावा लागला .  संभाजीराजे दिलेरखानाच्या गोटात जाणं असो अथवा सोयराबाईंनी राजरामांना झुकतं माप  मिळावं म्हणून  केलेल्या असंख्य छोट्यामोठ्या क्लुप्त्या . घरचे शाल जोडीतले अहेर आणि राजकीय डावपेच सर्वांचा सामना त्यांनी शांतपणे ,  धिटाईने तसेच चातुर्याने केला .  



संभाजीराजे  छत्रपती झाले . 9 वर्षांच्या कारकिर्दीतला त्यांचा  बहुतांशी  वेळ युद्धात , राजकीय डावपेच खेळण्यात आणि स्वराज्य मजबूत करण्यात गेला  . औरंगजेबाने शिवाजीमहाराज गेल्यानंतर स्वराज्य गिळण्यासाठी परत मुसंडी मारली होती . ती नेस्तनाबूत करण्यासाठी संभाजीराजे प्राणपणाने लढत होते . त्यात खूप मोठी साथ होती ती येसूबाईंची . ते गडावर नसतांना न्यायव्यवस्थेपासून ते महसूल गोळा करण्यापर्यंत , या सर्व बाजू येसूबाईंनी समर्थपणे सांभाळल्या . त्यांच्या कर्तुत्वाचा , गुणांचा सार्थ गौरव संभाजीराजांनी येसूबाईना    ' श्री सखी राज्ञी  जयति ' ही राजमुद्रा देऊन केला . 



औरंगजेबाच्या लोकांनी दगा करून संभाजीराजांना  पकडल्या  नंतरच्या दिवसात येसूबाईंची कसोटी लागली . इतक्या सगळ्या वाईट बातम्या गडावर येत असतांना धैर्याने परिस्थितीला सामोरं जाणं तसच संभाजीराजांना सोडवण्यासाठी जमतील ते प्रयत्न करण्याचे निर्णय घेण या सगळ्या दिव्यातून जातांना त्यांना मनाने किती कणखर राहावं लागलं असेल याची कल्पना न केलेलीच बरी . 


त्यावेळी येसूबाईंनी घेतलेले  महत्वाचे 2 निर्णय यांनी तर  इतिहासाला अस एक वळण दिलं जे कदाचित त्यांनी ते निर्णय घेतले नसते तर मिळालं  नसतं . 



 संभाजीराजांना आता सोडवून आणणं कठीण आहे हे लक्षात येताच त्यांनी राजरामांना छत्रपती म्हणून घोषित केलं . अगदी 3 , 4 वर्षे वयाच्या मुलांना गादीवर बसवून राज्यकारभार केल्याची कितीतरी उदाहरणे इतिहासात आहेत . असा निर्णय त्याही घेऊ शकल्या असत्या . त्यांच्या मुलाला गादीवर बसवून राज्यकारभार त्या करू शकल्या असत्या .  पुत्रप्रेमापोटी अथवा सत्ता आपल्या हातात कशी राहील हा विचार न करता राज्य रक्षणासाठी केलेला तो एक फार महत्वाचा निर्णय होता  .  हा निर्णय औरंगजेबाला ,  लढाई न करता संभाजीराजांना कैद करूनही हरल्याची भावना जाणवून देणारा होता .  याचा पडसाद असाही उमटला की  नविन छत्रपती घोषित केल्यामुळे जो औरंगजेबाच्या कैदेत आहे तो आता राजा नाही .   स्वराज्याचा राजा आजही राज्यात लोकांबरोबर आहे .  हा लोकांना दिलेला विश्वास तर होताच तसच स्वराज्याची मोगलांबरोबर लढाई संपलेली नाही , ती सुरूच राहणार , असा तो औरंगजेबाला इशारा आणि दिलेला  'शह '  होता.


आता चवताळून औरंगजेब रायगडावर जोरदार हल्ला करेल ही जाणीव असल्याने येसूबाईंनी  दुसरा निर्णय घेतला आणि अजून एक  ' शह  ' औरंगजेबाला दिला . येसूबाईंनी  राजासहित राजधानीच रायगडावरून हलवली . स्वराज्याच्या पार टोकाला              ' जिंजीला ' राजधानी हलवून स्वराज्याच्या राजांबरोबरच  राजधानीही मोगलांपासून सुरक्षित ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या . 


येसूबाईंनी बांधलेल्या अटकळीनुसार मोगलांनी रायगडाला धडक मारली . तब्बल 6 महिने मोजक्या लोकांसह त्यांनी गड झुंजवला . नंतर मात्र गडावर पांढरे निशाण लावून स्वतःच्या 7 , 8 वर्षाच्या मुलाला ' शिवाजींना घेऊन त्यांनी मोगलांच्या छावणीत प्रवेश केला . मोगलांनी गड काबीज केला तेव्हा त्यांना त्यात मिळाल्या त्या येसूबाई आणि शिवाजी . छत्रपती तर दुसऱ्या गडावरून , राजधानी जिंजीतून राज्यकारभार करत होते . 


येसूबाई या संभाजीराजांच्या पत्नी आणि शिवाजीराजांच्या स्नुषा होत्या . ज्यांनी नेहमीच पहिला विचार स्वराज्याचा  , हा आदर्श येसूबाईंसमोर ठेवला होता .  येसूबाईंनी घेतलेल्या या 2 महत्वाच्या निर्णयांनी इतिहासाला कलाटणी मिळाली आणि शिवाजी महाराजांच्या हिंदवी  स्वराज्याला पुढची वर्ष . 


येसूबाईंसाठी यानंतरची  वर्ष फार कठीण होती  . मोगलांच्या छावणीत  एका महाराणी आणि युवराजाला राहणं किती कठीण गेलं असेल ?   मुलाचं शिवाजी असलेलं नावं  औरंगजेबाने शिवाजीराजांवरच्या रागामुळे        ' शाहू '  केलं . मात्र संभाजीराजांच्या वेळी  केलेली चूक परत करण्याची हिंमत त्याने   केली नाही .  येसूबाई आणि शाहू महाराज यांची मोगलांच्या छावणीबरोबर फार फरपट झाली मात्र त्यांना हातही लावण्याची हिम्मत मोगलांनी केली नाही  . शाहू महाराजांना औरंगजेबाने सर्व प्रकारचे शिक्षण  दिले मात्र  संस्कार होते येसूबाईंचे . खूपवेळा शाहू महाराजांनी आणि येसूबाईंनी इस्लाम धर्म स्वीकारावा म्हणून प्रयत्नही झाले पण ते फार जिकरीचे करण्याची चूक मोगलांनी केली नाही . 


औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर वाटाघाटी होऊन  शाहू महाराजांना मोगलांनी स्वराज्यात परत पाठवले त्यासाठी ओलीस राहिल्या ,           ' येसूबाई ' . मुलगा स्वराज्यात जाऊ शकला या आनंदाच्या विचारावर पुढची वर्ष त्यांनी मोगलांच्या कैदेत काढली . 

पुढे अजून वाटाघाटी होऊन 10 वर्षांनी त्या स्वराज्यात परतल्या . येसूबाई तब्बल 29 वर्ष मोगलांच्या कैदेत होत्या . परत आल्यावर त्या राजकारणात जास्त सक्रिय नसल्या तरी  शाहू महाराज आणि ताराबाईंनी दत्तक घेतलेले राजे यामध्ये त्यांनी  स्वराज्याच्या कल्याणासाठी समेट घडवून आणला . थोडं सुख , शांती त्यांच्या आयुष्यात आली पण फारच थोड्या अवधीसाठी . जेमतेम एक वर्ष . 





येसूबाई या शिवाजीराजांना शोभणाऱ्या सून , संभाजीराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालणाऱ्या पत्नी होत्या . लहानपणापासून निरनिराळ्या कठीण तसच दुःखद  प्रसंगांना सामोरं जाण्यामुळेच की काय त्या मनाने कणखर होत गेल्या असाव्यात . त्यांनी  पूर्ण आयुष्य   स्वराज्यासाठी समर्पित केलं  . संभाजीराजांसारख्या   कर्तृत्ववान , वादळासारख्या झंझावाती व्यक्तीबरोबर संसार करणारी व्यक्तीही तेवढीच कर्तृत्ववान होती .  स्वराज्यासाठी  कर्तव्यनिष्ठा , समर्पण आणि त्यागाच्या परकाष्ठेची सीमा ओलांडणार हे  व्यक्तिमत्त्व .  ज्या व्यक्तीच्या गुणांना शिवाजी महाराजांनी ओळखलं , त्या व्यक्तीची , त्या गुणांची ,  त्या कर्तुत्वाची  इतिहासकारांनी मात्र  पुरेशी   दखल घेतल्याचं  इतिहास वाचतांना फारस जाणवतं नाही म्हणून केलेला हा अल्पसा लेखनप्रपंच . 

Sunday, 2 May 2021

संभाजीराजे

 संभाजीराजे



व्यक्ती आणि कृती या संदर्भातील हे दुसरं व्यक्तिमत्त्व ,  ज्याबद्दल लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न .

संभाजी राजे हा शब्द ऐकला की खरंच काय येतं मनात ? आदराची भावना , बरोबर ना ? त्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला नतमस्तक होतो आपण . त्यांचा जीवनपट डोळयांसमोरून झरकन जातो . त्यांचं आईशिवाय असणार बालपण , जिजाऊंनी त्यांच्यावर केलेली मायेची पाखरण , त्यांना निरनिराळ्या प्रसंगातून मिळालेले राजकारणाचे धडे . शिवाजी महाराजांनी लहानपणापासून त्यांना दिलेले शिक्षण ,  शारीरिक कवायती पासून ते घुड्सवारी पर्यंत . तसेच भाषा , अर्थव्यवहार  राजकारणी डावपेच आणि इतरही   . एक एक प्रसंग डोळ्यांसमोर जेव्हाही येतो , नेहमी असच वाटतं , इतक्या लहान वयात कस केलं असेल त्यांनी ? या वयात तर साधं भाजी आणायलाही आपण मुलांना पाठवत नाही त्या वयात संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगांकडे ओलीस म्हणून पाठवले ? धन्य ते वडील आणि धन्य तो पुत्र . 


  














संभाजीराजांचा पूर्ण जीवनपट हा आत्ताच्या भाषेत बोलायचं तर सुरुवातीपासून शेवट पर्यंत चित्तथरारक आहे . मिर्झा राजे जयसिंगांकडे ओलीस म्हणून राहणं असो की वडिलांबरोबर आग्राहुन सुटका अगदी शिवाजी महाराज गेल्यानंतर अण्णाजी पंत आणि बाकी लोकांनी केलेली बंडाळी मोडून काढणं . कुठलीही गोष्ट सहजासहजी न मिळणे हे जाणवतं . तस पाहिलं तर एका छत्रपती चा मुलगा  . मात्र छत्रपतींचा मुलगा असूनही प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी केलेली प्रामाणिक आणि जीवापाड धडपड .  ती करण्यातच त्यांचं खूप आयुष्य  खर्ची पडलं , मग ते त्यांच्यावर आलेलं 'गोदावरी' नावाचं बालंट असो की अपमानित झाल्यामुळे रागाच्या भरात घेतलेलं दिलेर खानाला जाऊन मिळण्याचा निर्णय  . यातले काही निर्णय हे शिवाजी राजांची रणनीती होती असंही सांगितलं जातं , असो तो ऊहापोह करणं या लेखाच उद्दीष्ट नाही . त्यांचं चरित्र  वाचतांना जाणवते ती प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा .  

असे कितीतरी प्रसंग आहेत की जे वाचतांना त्यांच्या मनाची होणारी तडफड जाणवते . मग ते दिलेर खानाकडून आल्यावर 'राजे तुम्ही चुकलात ' म्हणून शिवाजी राजांनी त्यांच्याकडे पाठ फिरवणं असो की त्यावेळेच्या परिस्थितीत नाईलाजाने  स्वतःच  स्वतःला राजा म्हणून घोषित केल्यावर सोयराबाईंना नजरकैदेत ठेवाव लागण .  ज्या पुतळाबाईंनी त्यांच्यावर अखंड , अविरत अशी माया केली त्या सती जातांना असहाय्य होऊन पाहणं अथवा राजरामांनी 'मलाही तुम्ही कैदेत ठेवणार का ' हे विचारल्यावर वाटणारं  दुःख   . प्रत्येक ठिकाणी जाणवते ती त्यांनी दुसऱ्यांच्या मनाला जपण्याची केलेली धडपड . स्वतःला त्रास झाला तरी तो न दाखवता कसोशीने केलेली अंमलबजावणी , मग ती वयक्तिक कर्तव्याची असो अथवा राजकीय . 



रणांगणात तसेच इतर प्रसंगात निरनिराळे  निर्णय घेतांना , घेतलेला निर्णय अंमलात आणतांना  जाणवलेली धडाडी आणि दृढनिश्चयी वृत्ती.   स्वतःच्या लोकांना प्रेरित करून जंजिऱ्याचा समुद्र बुजवुन सिद्धी पर्यंत पोहोचण्याची असो अथवा अवघे 9 वर्षाचे असतांना  कुणाला न कळत रायगडावर पोहोचण्यासाठी केलेली आग्रा ते रायगड ही  पायपीट .  बटूसारखे  नुसते वेषांतरच नाही तर संध्या , पूजा सगळं आत्मसात करून , त्याचं पालन करणं .  नाटक बेमालूम होणं  आवश्यक नाहीतर   पकडल्या जाण्याची भीती . काय आणि किती प्रसंग आहेत .  लिहावं तेवढं कमी . हे सर्व आठवतांना एक मात्र नेहमी जाणवतं , शिवाजीराजांना लोकांची जी साथ मिळाली ती मिळायला संभाजी राजांना फार कष्ट करावे लागले . शिवाजीराजांना घरची फारशी काळजी कधी करावी लागली नाही . ती बाजू जिजाऊंनी सांभाळली .  या बाबतीत मात्र संभाजींना घरचे कलह , राजकीय आंतरिक  बंडाळी तसेच बाहेरचे औरंगजेबाला सामील होणारे सरदार या सगळ्या बाजू सांभाळायला तारेवरची कसरत करावी लागली .


संभाजी राजांच्या हयातीत जी एकजूट साध्य झाली नाही ती त्यांच्या बलिदानाने साध्य झाली . त्यानंतर कितीतरी वर्ष महाराष्ट्र ने झुंज दिली , एकवेळ तर अशी आली की दिल्ली देखील काबीज केली . बरोबर ना ? पण हे सर्व होण्यासाठी संभाजी राजांना सर्वोच्च बलिदान द्यावे लागले . जर त्यावेळी एकजूट असती ,  छोट्या जहागिरीची इच्छा बाळगून त्यावेळच्या सरदारांनी औरंगजेबाला साथ दिली नसती  तर आज कदाचित महाराष्ट्राचा  इतिहास अजून काही निराळा असता . असो . 


दूरदर्शनवर मागे संभाजी serial झाली . ती फक्त त्यांच्या लढाया आणि रणनीती यावर आधारित नव्हती तर त्यांच्या आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगात त्यांना काय वाटलं असेल हेही त्यात शोधायचा , त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचाही प्रयत्न त्या serial मध्ये  केला गेला  .  त्यांच्या स्वभावाचे निरनिराळे कंगोरे दाखवण्याचाही तो एक प्रयत्न होता .  ती serial बघतांना पुष्कळदा जाणवलं की आपल्या प्रत्येकातही एक संभाजी असतो , ज्याला खूपदा आजूबाजूच्या आपल्याच लोकांबरोबर स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढा द्यावा लागतो . कधी स्वतःच चुकत नसल तरी ते  दुसऱ्याला पटवून देण्यात शक्ती  खर्च करावी लागते . कधी न आवडलेला निर्णय स्वीकारावा लागतो . आवडत नसतांनाही कुणा दुसऱ्याच्या चांगल्यासाठी ते करावं लागतं . कुणी दुय्यम वागणूक देत आहे हे जाणवून अपमानित वाटलं तरी ते नातेसंबंध टिकवण्यासाठी स्वतःला समजवाव लागतं . कधी कुठली व्यक्ती , तिचं वागणं हे चुकीचं आहे हे माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग अवलंबावा लागतो , एक ना अनेक . 


संभाजीराजांच व्यक्तिमत्त्व फार उत्तुंग आहे यात काही वादच नाही . त्याबद्दल वाचतांना , जाणते अजाणतेपणी जाणवलेला हा एक कोपरा  खूप जणांना त्यांच्या अजूनच जवळ घेऊन जातो . काही प्रसंग वाचतांना कधी कधी आपणही कुठेतरी अनुभवलेले , आपल्यावर आलेले छोटे मोठे प्रसंग आठवतात आणि त्यावेळी त्यांच्या मनाची झालेली घालमेल मनाला स्पर्शून जाते .  आपणही कधी स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी केलेली धडपड  त्यावेळी चटकन डोळ्यांसमोर येते आणि ते उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्या फार परिचयाचं आहे असं जाणवतं . तुमचा अनुभव काय सांगतो ? 



#संभाजीराजे#