Followers

Saturday, 22 May 2021

महाराणी येसूबाई

 महाराणी येसूबाई




संभाजी महाराज लिहिल्यावर प्रकर्षाने वाटलं राणी येसूबाईंबद्दल लिहावं . महाराणी येसूबाई यांची ओळख संभाजी राजांच्या पत्नी इतकीच बहुतांशी लोकांना माहिती आहे . त्यांच्याबद्दल इतिहासात फारश्या नोंदी आढळत नाहीत  . 


येसूबाईंच्या आयुष्याचा आढावा घेतांना त्यांचं आयुष्य roller coaster सारखं होतं हे जाणवतं . वयाच्या लहानपणी अगदी 6,7 वर्षांच्या असतांना त्यांचा शंभुराजांबरोबर  विवाह झाला .  जिजाऊंच्या मायेच्या सावलीत  त्यांची मानसिक , राजकीय जडण घडण झाली . 



 निरनिराळे लहान मोठे प्रसंग , वादळं त्यांच्या आयुष्यात येतच राहिले . त्यातून त्या शिकत गेल्या आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व फुलत गेलं . खरंच , काय आणि किती कंगोरे लिहावे या व्यक्तिमत्वाचे . 


संभाजीराजे आग्र्याहून सुखरूप गडावर परत येण्यासाठी त्यांच्या मृत्यूची सगळीकडे पसरवलेली बातमी खरी वाटावी म्हणून शिवाजीराजांनी त्यावेळी केलेलं हे  नाटक असलं तरी त्यात होरपळल्या येसूबाई . कोवळ्या वयात त्यांना तसं जीवन  अल्पकाळासाठी का होईना ,  जगावं लागलं . 



त्यांच्यातल्या कुशल ,कर्तृत्ववान स्त्रीला शिवाजी राजांनी ओळखल्या मुळेच   जिजाऊंनंतर शिक्के कट्यारीचा मान त्यांनी येसूबाईंना दिला .  मिळालेल्या शिक्के कट्यारीच्या आनंदावर  , शिवाजीराजांच्या विश्वासाला पात्र ठरल्याच्या अभिमानावर ,   कर्तृत्वावर मात्र सोयरबाईंच्या सवतेपणाच , असूयेच सावट नेहमीच राहिलं . याची जाणीव त्यांना होती तरी कधीही त्याबद्दल  तक्रार न करता त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं . 


कितीतरी वेळा त्यांना असंख्य  लोकांच्या टोचणाऱ्या नजरांचा सामना शांतपणे करावा लागला .  संभाजीराजे दिलेरखानाच्या गोटात जाणं असो अथवा सोयराबाईंनी राजरामांना झुकतं माप  मिळावं म्हणून  केलेल्या असंख्य छोट्यामोठ्या क्लुप्त्या . घरचे शाल जोडीतले अहेर आणि राजकीय डावपेच सर्वांचा सामना त्यांनी शांतपणे ,  धिटाईने तसेच चातुर्याने केला .  



संभाजीराजे  छत्रपती झाले . 9 वर्षांच्या कारकिर्दीतला त्यांचा  बहुतांशी  वेळ युद्धात , राजकीय डावपेच खेळण्यात आणि स्वराज्य मजबूत करण्यात गेला  . औरंगजेबाने शिवाजीमहाराज गेल्यानंतर स्वराज्य गिळण्यासाठी परत मुसंडी मारली होती . ती नेस्तनाबूत करण्यासाठी संभाजीराजे प्राणपणाने लढत होते . त्यात खूप मोठी साथ होती ती येसूबाईंची . ते गडावर नसतांना न्यायव्यवस्थेपासून ते महसूल गोळा करण्यापर्यंत , या सर्व बाजू येसूबाईंनी समर्थपणे सांभाळल्या . त्यांच्या कर्तुत्वाचा , गुणांचा सार्थ गौरव संभाजीराजांनी येसूबाईना    ' श्री सखी राज्ञी  जयति ' ही राजमुद्रा देऊन केला . 



औरंगजेबाच्या लोकांनी दगा करून संभाजीराजांना  पकडल्या  नंतरच्या दिवसात येसूबाईंची कसोटी लागली . इतक्या सगळ्या वाईट बातम्या गडावर येत असतांना धैर्याने परिस्थितीला सामोरं जाणं तसच संभाजीराजांना सोडवण्यासाठी जमतील ते प्रयत्न करण्याचे निर्णय घेण या सगळ्या दिव्यातून जातांना त्यांना मनाने किती कणखर राहावं लागलं असेल याची कल्पना न केलेलीच बरी . 


त्यावेळी येसूबाईंनी घेतलेले  महत्वाचे 2 निर्णय यांनी तर  इतिहासाला अस एक वळण दिलं जे कदाचित त्यांनी ते निर्णय घेतले नसते तर मिळालं  नसतं . 



 संभाजीराजांना आता सोडवून आणणं कठीण आहे हे लक्षात येताच त्यांनी राजरामांना छत्रपती म्हणून घोषित केलं . अगदी 3 , 4 वर्षे वयाच्या मुलांना गादीवर बसवून राज्यकारभार केल्याची कितीतरी उदाहरणे इतिहासात आहेत . असा निर्णय त्याही घेऊ शकल्या असत्या . त्यांच्या मुलाला गादीवर बसवून राज्यकारभार त्या करू शकल्या असत्या .  पुत्रप्रेमापोटी अथवा सत्ता आपल्या हातात कशी राहील हा विचार न करता राज्य रक्षणासाठी केलेला तो एक फार महत्वाचा निर्णय होता  .  हा निर्णय औरंगजेबाला ,  लढाई न करता संभाजीराजांना कैद करूनही हरल्याची भावना जाणवून देणारा होता .  याचा पडसाद असाही उमटला की  नविन छत्रपती घोषित केल्यामुळे जो औरंगजेबाच्या कैदेत आहे तो आता राजा नाही .   स्वराज्याचा राजा आजही राज्यात लोकांबरोबर आहे .  हा लोकांना दिलेला विश्वास तर होताच तसच स्वराज्याची मोगलांबरोबर लढाई संपलेली नाही , ती सुरूच राहणार , असा तो औरंगजेबाला इशारा आणि दिलेला  'शह '  होता.


आता चवताळून औरंगजेब रायगडावर जोरदार हल्ला करेल ही जाणीव असल्याने येसूबाईंनी  दुसरा निर्णय घेतला आणि अजून एक  ' शह  ' औरंगजेबाला दिला . येसूबाईंनी  राजासहित राजधानीच रायगडावरून हलवली . स्वराज्याच्या पार टोकाला              ' जिंजीला ' राजधानी हलवून स्वराज्याच्या राजांबरोबरच  राजधानीही मोगलांपासून सुरक्षित ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या . 


येसूबाईंनी बांधलेल्या अटकळीनुसार मोगलांनी रायगडाला धडक मारली . तब्बल 6 महिने मोजक्या लोकांसह त्यांनी गड झुंजवला . नंतर मात्र गडावर पांढरे निशाण लावून स्वतःच्या 7 , 8 वर्षाच्या मुलाला ' शिवाजींना घेऊन त्यांनी मोगलांच्या छावणीत प्रवेश केला . मोगलांनी गड काबीज केला तेव्हा त्यांना त्यात मिळाल्या त्या येसूबाई आणि शिवाजी . छत्रपती तर दुसऱ्या गडावरून , राजधानी जिंजीतून राज्यकारभार करत होते . 


येसूबाई या संभाजीराजांच्या पत्नी आणि शिवाजीराजांच्या स्नुषा होत्या . ज्यांनी नेहमीच पहिला विचार स्वराज्याचा  , हा आदर्श येसूबाईंसमोर ठेवला होता .  येसूबाईंनी घेतलेल्या या 2 महत्वाच्या निर्णयांनी इतिहासाला कलाटणी मिळाली आणि शिवाजी महाराजांच्या हिंदवी  स्वराज्याला पुढची वर्ष . 


येसूबाईंसाठी यानंतरची  वर्ष फार कठीण होती  . मोगलांच्या छावणीत  एका महाराणी आणि युवराजाला राहणं किती कठीण गेलं असेल ?   मुलाचं शिवाजी असलेलं नावं  औरंगजेबाने शिवाजीराजांवरच्या रागामुळे        ' शाहू '  केलं . मात्र संभाजीराजांच्या वेळी  केलेली चूक परत करण्याची हिंमत त्याने   केली नाही .  येसूबाई आणि शाहू महाराज यांची मोगलांच्या छावणीबरोबर फार फरपट झाली मात्र त्यांना हातही लावण्याची हिम्मत मोगलांनी केली नाही  . शाहू महाराजांना औरंगजेबाने सर्व प्रकारचे शिक्षण  दिले मात्र  संस्कार होते येसूबाईंचे . खूपवेळा शाहू महाराजांनी आणि येसूबाईंनी इस्लाम धर्म स्वीकारावा म्हणून प्रयत्नही झाले पण ते फार जिकरीचे करण्याची चूक मोगलांनी केली नाही . 


औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर वाटाघाटी होऊन  शाहू महाराजांना मोगलांनी स्वराज्यात परत पाठवले त्यासाठी ओलीस राहिल्या ,           ' येसूबाई ' . मुलगा स्वराज्यात जाऊ शकला या आनंदाच्या विचारावर पुढची वर्ष त्यांनी मोगलांच्या कैदेत काढली . 

पुढे अजून वाटाघाटी होऊन 10 वर्षांनी त्या स्वराज्यात परतल्या . येसूबाई तब्बल 29 वर्ष मोगलांच्या कैदेत होत्या . परत आल्यावर त्या राजकारणात जास्त सक्रिय नसल्या तरी  शाहू महाराज आणि ताराबाईंनी दत्तक घेतलेले राजे यामध्ये त्यांनी  स्वराज्याच्या कल्याणासाठी समेट घडवून आणला . थोडं सुख , शांती त्यांच्या आयुष्यात आली पण फारच थोड्या अवधीसाठी . जेमतेम एक वर्ष . 





येसूबाई या शिवाजीराजांना शोभणाऱ्या सून , संभाजीराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालणाऱ्या पत्नी होत्या . लहानपणापासून निरनिराळ्या कठीण तसच दुःखद  प्रसंगांना सामोरं जाण्यामुळेच की काय त्या मनाने कणखर होत गेल्या असाव्यात . त्यांनी  पूर्ण आयुष्य   स्वराज्यासाठी समर्पित केलं  . संभाजीराजांसारख्या   कर्तृत्ववान , वादळासारख्या झंझावाती व्यक्तीबरोबर संसार करणारी व्यक्तीही तेवढीच कर्तृत्ववान होती .  स्वराज्यासाठी  कर्तव्यनिष्ठा , समर्पण आणि त्यागाच्या परकाष्ठेची सीमा ओलांडणार हे  व्यक्तिमत्त्व .  ज्या व्यक्तीच्या गुणांना शिवाजी महाराजांनी ओळखलं , त्या व्यक्तीची , त्या गुणांची ,  त्या कर्तुत्वाची  इतिहासकारांनी मात्र  पुरेशी   दखल घेतल्याचं  इतिहास वाचतांना फारस जाणवतं नाही म्हणून केलेला हा अल्पसा लेखनप्रपंच . 

20 comments:

  1. हा इतिहास दुर्लक्षिला गेला आहे हे खरंच. धन्यवाद

    ReplyDelete
  2. खुप छान.... लेख आवडला....ईतिहासातील एका दुर्लक्षित व्यक्तीमत्वाचे नवीन पैलू अनुभवायला मिळाले.👌👌👍👍

    ReplyDelete
  3. अभ्यास पूर्वक लेखन !👍

    ReplyDelete
  4. वाह मैथिली...
    खूप छान... येसुबाईंवर या आधी इतकं विस्तृत कधीच वाचलं नव्हतं...��

    आनंद

    ReplyDelete
  5. Kavita Kamalapurkar

    Khupach chan lihilat vahini .khup chan mahiti milali

    ReplyDelete
  6. फार सुंदर लेख! इतिहासाची ही दुर्लक्षित पानं प्रकाशात आणण्याचं महत्त्वपूर्ण काम केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏 👌👌👏👏

    ReplyDelete
  7. Khup chhan lihilay. Yesubai hyanchya baddal mala phar kami mahiti ahe pan aata prerna milali. Phar chhan upakram

    ReplyDelete
  8. खूप छान
    माझ्या आवडीचं व्यक्तिमत्त्व महाराणी येसूबाई
    सखीराज्ञी जयती मला फार आवडत म्हणायला

    ReplyDelete