Followers

Sunday, 8 September 2019

प्रवास

प्रवास


प्रवास शब्द जरा जड वाटतो न ......म्हणजे पहा ....भटकंती म्हंटल की मजेशीर किंवा उत्साहपूर्ण वाटत पण प्रवास शब्दात एक वजन आहे ......गावाला पोहोचल्यावर किंवा परत आल्यावर जेव्हा कुणी विचारत .....कसा झाला प्रवास .....या एका वाक्यात सगळं येतं म्हणजे अगदी बसायला जागा मिळाली का पासून  ते थेट थकले तर नाही न , काही त्रास तर झाला नाही पासून ते अगदी जेवण नीट झालं न पर्यंत .

आता प्रवास म्हटला की , तो  कधी बस तर कधी आगगाडी तर कधी विमानाने होतो......पूर्वी पायी प्रवास करत तेव्हाचे परत आल्यानंतरचे प्रश्न वेगळे असत  . पायी प्रवास हा कितीतरी दिवस होत असे . त्यात येणाऱ्या अडचणी वेगळ्या असत .....मग झाले प्राण्यावरून प्रवास सुरु ....नंतर जहाज  , बोटी आणि आज विमानापर्यंत मानव येऊन पोहोचला आहे .....आता तर अंतराळात प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे . भारताचे चंद्रायान चंद्रावर पोहोचले. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे .....तोही होईल .  यावर लिहिलं तर लेखाच्या प्रवासाची दिशा बदलेल.

लहानपणी प्रवास म्हंटल की मजा वाटायची . कुठेतरी जायला मिळणार यातच खूप आनंद व्हायचा . आपण कसे जाणार पासून ,  काय तयारी करायची ,  कशी ..... केव्हा पासून तयारीला सुरुवात करायची यात सगळे अगदी मनापासून हिरीरीने भाग घ्यायचे . ते सगळं ठरवताना सुद्धा एक प्रकारची मजा यायची . हळूहळू जसे आपण मोठे होत गेलो तसे मात्र या प्रवासाचे संदर्भ बदलत गेले.....लहानपणी सुट्ट्यांमध्ये मजेसाठी प्रवास करणारे आपण आधी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी प्रवास करू लागलो आणि मग तो प्रवास म्हणजे मजा हे वाटणं हळूहळू कमी व्हायला लागल आणि हाच जर मुंबईच्या लोकल मधला रोजचा प्रवास असेल तर ......तर तो एखाद दिवशी काही कारणामुळे केला नाही तर जास्त बरं वाटत . त्यातही काही जणांना छान मित्र मिळतात या प्रवासात ......अगदी 2 स्टेशन पर्यंत भेटणारे , किंवा एखाद्या स्टेशन वर किंवा कधी एखाद्या वेळेच्या ट्रेन मध्ये भेटणारे.....कधी कधी तर त्यांची फक्त तोंड ओळख असते पण भेटलं की छान वाटत .......काही जण मात्र अशा प्रवासात देखील भजन गाणी गाऊन .....अशा लोकांचा एक छान ग्रुप तयार करून त्यातही आनंदी राहतात आणि तो प्रवास स्वतःबरोबर दुसऱ्यांचाही तेवढाच आनंदी करतात .

प्रवास हा फक्त वाहनानेच होतो का ? प्रवास हा खूपदा मनाने  करून त्यात सुदधा आनंदी होतो माणूस . बघा तुमचं लहानपण आठवा . त्यावेळी atlas वर वेगवेगळ्या जागा शोधण्याचा खेळ खेळतांना कधी कधी समुद्रातून , पहाड , डोंगरातून , दऱ्यांमधून , नद्यांमधून , रस्त्यांवरून आपल्या बोटांनी केलेला प्रवास........आठवला ? किती वेळा असा प्रवास लहानपणी केलाय. कधीकधी तर अगदी या गावातून त्या गावात ......जिथे जिथे आपले कुणी काका , मामा किंवा अजून कुणी आहे म्हणून तर कधी अगदी कुठे काय छान मिळत , कुठे कशाचा कारखाना आहे हे भूगोलात वाचल्यामुळे वाटणारी उत्सुकता तर कधी कुठे असणाऱ्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात जावसं वाटल्यामुळे ते पाहण्याची तीव्र इच्छा ......असा पूर्ण जगाचा प्रवास हा मनाने आणि बोटाने मित्र मैत्रिणी बरोबर कितीतरी वेळा atlas वर लहानपणी केला असेल सगळ्यांनी  ......यातलं वाहन आपलं मन असत , ते बोट आणि मित्र धरून छान प्रवास करून येतं ....काय आठवलं का ?  भूगोल हा विषय फक्त यासाठी च तर जास्त आठवतो .

प्रवास आणि वेग हे दोन शब्द हातात हात घालूनच फिरतात...... मित्रांसारखे . कुठलाही प्रवास असो त्याला वेग हा असतोच , मग तो बैलगाडीतला असो की space shuttle मधला , तरी सगळ्यात जास्त वेग मात्र मनाने केलेल्या प्रवासात असतो .....घरापासून ते चंद्रापर्यंत पोहोचायला एक क्षण पुरेसा असतो .

प्रत्येक प्रवासाला वेग असला तरी तो निरनिराळा असतोच . कुणी पायी येणार असेल तर त्या व्यक्तीला यायला वेळ लागेल हे आपण गृहीत धरतो ....कुणी आगगाडीने , विमानाने किंवा अजून कशाने येणार असेल तर त्या त्या वाहनांनुसार  त्या व्यक्तीला पोहोचायला किती वेळ लागेल हा अंदाज आपण बांधतो . तो अंदाज नेहमी बरोबर येतोच अस मात्र नाही कारण प्रवासात येणाऱ्या आणि माहिती नसणाऱ्या अडचणी , कधी traffic jam तर कधी पाऊस तर कधी अजून काही . हे आराखडे कधी कधी चुकतात.  ते स्वीकारून पुढे जातो माणूस .

थोडा  अजून विचार केला तर जाणवतं , आयुष्य हा सुद्धा तर एक प्रवासच आहे . लहानपणापासून मोठे होईपर्यंतचा प्रवास . कधी निवांत वेळ मिळाल्यावर आठवून बघा . किती दूर आलोय आपण सगळेच . लहानपणी ज्यावेळी हा आयुष्याचा प्रवास सुरु होतो त्यावेळी किती आनंदाने प्रवास सुरु असतो. प्रत्येक नवीन गोष्ट करताना , शिकतांना आनंद मिळतो . हळूहळू या प्रवासात मित्र मिळत जातात . काही दुसरीकडे जातात , काही वेगळ्या वाटेवरून जातात, काहींचा वेग जास्त असल्याने ते पुढे जातात ,काहींचा वेग कमी असल्याने आपण त्यांच्या  पुढे जातो......काही जणांच्या बरोबर जायला आवडत म्हणून वेग वाढवायचा प्रयत्न केला जातो तर काही वेळेला काही जणांसाठी व्यक्ती स्वतःचा वेग कमी करते , बरोबर न . आपल्याबरोबर जे आहेत त्यांच्या बरोबर जाण्यात कधी आनंद मिळतो तर कधी पुढे जाण्याची किंवा वेगळ्या वाटेने जाण्याची इच्छा होते . लहानपणी प्रवास करताना मिळणारा आनंद नंतर मात्र हा आयुष्याचा प्रवास करतांना ........कुणाचा वेग किती आहे ? मग माझा वेग कसा हवा ? किती हवा ?  मी काय केलं तर अजून पुढे जाईन ? कसा जाईन ? कसा पटकन पोहोचेन यावरच मन  विचार जास्त करू लागत आणि प्रवासात पूर्वी लहानपणी मिळणारा आनंद हा नंतर नंतर त्या वेगावर अवलंबून राहू लागतो........ त्यातली मजा कमी होऊन त्यात त्रास जाणवायला लागतो आणि कधी कधी थकवा सुद्धा जाणवतो . अर्थात जो त्यावेळी कधी कधी कळत नाही किंवा पोहोचण्याच्या घाईत .....अस तर होईलच म्हणून त्याकडे खूपदा दुर्लक्ष केल्या जात ....... खूपसे नेहमी बरोबर असणारे लोक मागे पडतात ........त्या वेगाने धावता धावता ज्यावेळी कधी मग बाजूला लक्ष जातं त्यावेळी आपल्या बाजूला अनोळखी लोकं दिसतात ........कधी कोण्या व्यक्तीला ओळखीच्या लोकांसाठी थांबावस वाटतं  तर कधी कुणी एकटच वाटचाल पुढे चालू ठेवत.........त्यावेळी ते आवडत असतं किंवा हवं असतं .......ते त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असत  . आयुष्याचा प्रवास हा सुरू तर राहतो पण त्यातला आनंद मात्र कधी कधी वेगाला बळी जातो . प्रत्येकाचा प्रवास निराळा , प्रवासाचा वेग निराळा .......प्रवासाच्या वाटा निराळ्या ......प्रत्येकाचं शेवटचं ठिकाण ही निराळं .....ते  कधी ,  केव्हा ,  कुठे येईल हे  माहिती नसलं तरी प्रवास हा सुरूच असतो ........चैरेवती चैरेवती  हा संदेश तर सर्वश्रुत  आहे .......माकड ते माणूस हा प्रवास त्याशिवाय साध्य होऊ शकला नसता . थांबला तो संपला .........मात्र कधी कधी नुसता प्रवास करणं हे जास्त समाधान देत . कुठे जायचंय हे ठरलेलं नसताना जेव्हा कधी बाहेर पडते व्यक्ती , त्यावेळी प्रवासात येणाऱ्या सगळया  प्रसंगांना सामोरं जाण , येणाऱ्या अडचणींवर मात करणं हे जास्त सोपं जातं ......याच कारण आपणच स्वतःला देतो .......सगळं ठरवून निघालो नाही न , आता करू adjust. त्यात खरी मजा येते   . सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावेळचे सर्व प्रसंग एक सुंदर आठवण म्हणून आपल्याबरोबर नेहमी राहतात . ते आठवून कधी हसू येत , कधी झालेला त्रास आठवून परत कुठे जातांना काय लक्षात ठेवायचं याची मनातल्या मनात उजळणी करतो तर कधी स्वतःचा सार्थ  अभिमान वाटतो त्यावेळी आलेल्या  सर्व अडचणीतून मार्ग काढल्याबद्दल ,  त्यातून काय काय शिकलो हे देखील आठवतं ........म्हण आहे न , प्रवासाने शहाणपण येतं , खरंय .  प्रत्येकाने हे मात्र लक्षात ठेवायला हवं  की या आयुष्याच्या प्रवासात जिथे कुठे जायचंय ते नक्की माहिती असो वा नसो  , तिथे पोहोचेपर्यंतचा प्रवास , त्या प्रवासात मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत ,  कुणाच्या बरोबर तर कधी गरज पडल्यास एकट्याने  , स्वतःला पेलणाऱ्या वेगाने करण्याचा प्रयत्न केला तर पोहोचल्यावर मिळणारं  समाधान हे जास्त आनंददायी ठरेल . सर्वांचा हा प्रवास आनंदी , सुखकर आणि समाधानी होवो हीच मनीषा.

11 comments: