Followers

Saturday, 31 August 2019

बँक

बँक



आज  बँकेत काम होतं म्हणून गेले होते ........गर्दी होती त्यामुळे थांबले .....वाट बघत होते माझा नंबर कधी येतो .....सहज येणाऱ्या जाणाऱ्यांकडे लक्ष गेलं .......येणारे आपापल्या हातातले  कागद बघत वेगवेगळ्या counter कडे चालले होते  ....कुणाचं फारसं कुणाकडे लक्ष नव्हतं ....  बाहेर जाणारे मात्र एकदा आपापले papers बघून नीट बॅग मध्ये ठेऊन मग जाता जाता आत येणाऱ्यांकडे आणि त्यांच्या हातात काय आहे याकडे बघत होते  .......counter वर बसलेले बँकेचे कर्मचारी या सगळ्या हालचालीं बरोबर काही संबंध नसल्या सारखे स्वतःच्या समोरचे पेपर्स , लोक , print outs आणि computer यात मग्न होते .......कुणी एखादी व्यक्ती ओळख दाखवून काही बोलत होती .....बाकी सगळं काही यंत्रवत सुरू होत ......आवाज होते पण सगळे एक तर विचारलेले प्रश्न , त्यांची उत्तर आणि सगळे व्यवहाराशी संबधित......बाकी आवाज होते ते ठप्प्यांचे , printer चे  , cash counting machine चे बस्स .......अस वाटत होतं की पूर्वी जेव्हा मी कधी बँकेत जायचे त्यावेळी थोडं तरी अवांतर बोलणं हे लोकांमध्ये किंवा तिथल्या कर्मचाऱ्याबरोबर होतांना दिसायचं ...एकतर आजकाल मी किंवा तस पाहिलं तर आपण सगळेच बँकेत फारसं जात नाही ......सगळी काम  online होतात .......मग जायची वेळच येत नाही .......आज माझा नंबर येण्याची वाट बघतांना  मनात विचार आला  की असंच आजकाल सगळ्यांच्याआयुष्यात देखील घडायला लागलाय .......कोण काय करतय याकडे फारस लक्ष नसत .....मी , माझ काम , माझं घर , माझं वेळ , माझं online social network ...... .......होतंय न अस .......जुन्या पिढीला आजही पुस्तकं हातात धरून वाचायला आवडतात  ......whatsapp वर chat करण्यापेक्षा फोन करून बोलायला आवडतं ......नवीन पिढीला मात्र online वाचणं , whatsapp वर chat जास्त सोयीचं वाटतं .....त्यात चूक काहीच नाही........तरी हे मात्र जाणवतंय की कुठेतरी भेटल्यामुळे , भेटायला जातांना केलेल्या प्रयत्नांची व त्यामुळे आलेल्या अनुभवांची भर मात्र आठवणीत पडत नाही ......असो जरा विषयांतर झालं...

बँकेत बसलेले असतांना कितीतरी वेगळे लोक दिसत होते .......कुणी हातात पिशव्या घेऊन आलेले लोक होते ....कदाचित शेतकरी , गावकरी असावेत  , छोटे मोठे व्यवसाय करणारे , काही बायका , काही पुरुष .....कुणी purse , कुणी sling बॅग घेतलेले , कुणी  कोट घालून आलेले तर कुणी मुलं मुली जीन्स टी शर्ट  ........त्यातले जे पिशव्या किंवा साध्या पेहेरावातले होते ते एकमेकांशी आरामात बोलत होते ,  एकमेकांचे नाव गाव विचारत होते , काय काम करतात हे विचारत होते, कुठल्या कामाने इथे आलात पासून थेट घरी कोण असतं इथपर्यंत गप्पा सुरु होत्या ........बाकीचे मात्र शांतपणे आपलं काम आणि आपण बस्स.......
याला कदाचित आजकाल नेहमी अनुभवाला येणारी फसवणाऱ्या लोकांची भीतीही कारणीभूत असू शकते ......

 बँक म्हंटल की त्यातले सगळे व्यवहार हे व्यवसाय आणि पैश्यांसंबंधी असले तरी जर अजून खोलात जाऊन विचार केला तर जाणवतं की जस आपल बँकेत खात असतं तसच खात आपल्या आयुष्याच सुद्धा आहे ........प्रवेश केल्यावर हळूहळू सगळे आपापल्या खात्यात कर्म जमा करत जातात ,  कधी गरज पडल्यास त्या जमा केलेल्या कर्माचा दुसर कुठलं कार्य करायला वापर करतात .......कर्म आणि त्याची देवाण घेवाण सुरू राहते , अगदी शेवटी बाहेर जाईपर्यंत ....जसे बँकेत निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळ्या काउंटर वर जावं लागतं तसंच इथेही सगळ्यांची काम एका ठिकाणी होत नाहीत .......प्रत्येकाच्या जन्माचा उद्देश निराळा ........जसा बँकेत बदल झालाय तसाच बदल इथेही झालाय ......बँकेतली सगळी काम फारसं न बोलता यंत्रवत होतात तसच काहीस आयुष्यात घडतंय ........आजूबाजूला कोण राहत त्यांच्या बरोबर फारसा संपर्क नसतो ......जो तो स्वतः मध्ये गर्क ........बँकेत जस कोण आपल्यासमोर आहे कोण आपल्यामागे आहे .....कोण बाजूला आहे त्याकडे लक्ष न जाता .......माझं काम पट्कन कसं होईल ......आणि मी माझ्या दुसऱ्या कामाला किंवा जिथे जायचं असेल तिथे लवकर कसा जाऊ शकेन हा विचार करण्यातच  वेळ जातो , हो न.

बँकेत आपण आपल्या खात्यात जसे पैसे जमा करतो तसे आयुष्याच्या खात्यात चांगले कर्म , चांगले मित्र , चांगल्या आठवणी .....चांगले विचार .......हीच खरी ठेव आणि संपत्ती .......हीच संपत्ती अडचणीत मदतीला येते. आपल्या आयुष्याच्या खात्यात चांगले कर्म आणि चांगले लोक जमवायचे तर वेगवेगळ्या लोकांबरोबर बोलल्याशिवाय ,  भेटल्याशिवाय ,  अनुभव घेतल्याशिवाय कोण चांगलं , कोण वाईट हे कळणार कसं ?  स्वतःची काळजी घ्यायला हवीच ......मात्र ते करत असतांना स्वतःभोवतीच कुंपण असही तयार करायला नको की आत काय आहे म्हणजे ती व्यक्ती , ते व्यक्तिमत्व , त्या व्यक्ती मधले गुण , दुर्गुण हे कुणाला दिसूच नयेत .

आपलं शरीर हा एक किल्ला आहे अस जर समजलं तर मेेंदू हा त्याचा किल्लेदार आहे जो  नाक ,  कान , डोळे , तोंड या  दारातून कुणाला आत येऊ द्यायचं , कुणाला बाहेर जाऊ द्यायचं आणि कुणाला नाही हे ठरवू शकतो......म्हणजे गांधीजींचे 3 बंदर जे ज्याचं प्रतीक आहे ते म्हणा हवं तर ...........तसच आत्तापर्यंत आलेल्या अनुभवाने किंवा लहानपणा पासून मिळालेल्या संस्काराने  ,  विचाराने आपल्या भोवती जो एक संरक्षक खंदक तयार झाला आहे त्यामुळे सुद्धा स्वतःच रक्षण करण्यास मदत होते .

आत्मरक्षणाच कुंपण जरूर असावं पण उंच भिंती मात्र नसाव्यात की ज्यामुळे ना त्या व्यक्तीला बाहेरच जग अनुभवता येईल ,  न बाहेरच्या लोकांना ही आतली व्यक्ती दिसेल .........अनोळखी लोकांशी बोलतांना  काळजी घेणं ही आजची गरज आहे मात्र विश्वासाची कमी असल्यामुळे लोक  एकमेकांच्या दूर चालले आहेत हे  नक्की .......... बँकेत  दिसणाऱ्या  अनोळखी लोकांबद्दल जसा संदेह वाटतो ,  विश्वास वाटत नाही तसाच तो रोज भेटणाऱ्या लोकांवरही उरला नाही ......प्रत्येक जण त्यामुळे आत्मकेंद्री होत जातोय .......ही कोंडी फोडण तेवढं सोपं नाही. आपल्या आयुष्याच्या बँकेत चांगले कर्म आणि चांगले लोक जमा करण्याचा प्रयत्न करत राहणं एवढं मात्र आपल्या हाती  आहे...तो तिकडे हिशोब ठेवणारा चित्रगुप्त बसलाय न ......त्याला जेव्हा सामोरं  जायचंय तेव्हा हा संचय तर असायलाच हवा .

 या जग नावाच्या बँकेत आपण सगळे आलो आहोत , प्रत्येकाच्या जन्माचं उदिष्ट निराळं , प्रत्येकाचं  काम निराळं , काउंटर ही निराळं , बाहेर जाण्याची वेळही निराळी ....... बाहेर जायच्या आधी सर्वांना आपापल्या आयुष्याच्या  खात्यात चांगल्या लोकांचा , आठवणींचा , विचारांचा आणि चांगल्या कर्मांचा संचय करता येवो हीच मनीषा .



#चित्रगुप्त

14 comments:

  1. वास्तवाचं अचूक वर्णन केलं आहे. खूप छान.

    ReplyDelete
  2. Khupach chan lihila aahe .aayoushyachi aani bankechi tulna khupach sunder keli aahe

    ReplyDelete
  3. रूचिर गोड़बोले1 September 2019 at 15:47

    छान

    ReplyDelete
  4. सर्वांचे आभार

    ReplyDelete
  5. किती छान लेख....अप्रतिम!
    बँक आणि त्यातील व्यवहार अगदी सहजतेने मानवी कर्मासोबत सांगड घातलीस!
    खुपच सुंदर.....

    ReplyDelete
  6. आयुष्यात आणि समाजात होत चाललेले बदल कसे प्रत्येक क्षेत्रात अनुभवायला मिळतात ह्याचाच एक उदाहरण बॅंकिंग... बॅंकिंग मधून आयुष्याचं दर्शन... छान लेख 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete